राज ठाकरेंनी भर महायुतीच्या मंचावर राज्यातील पुढाऱ्यांना रोखठोक सुनावलं
"महाराष्ट्र असा नव्हता. या सर्व गोष्टी बाहेरच्या राज्यात चालू शकतात. असा महाराष्ट्र कधीच नव्हता. महाराष्ट्रातील काही पुढाऱ्यांनी वेगळ्याच विषयात तुम्हाला गुंतवून ठेवलं आहे", अशा शब्दांत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील नेत्यांचे कान टोचले.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज पुण्यात महायुतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आलीय. विशेष म्हणजे या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील उपस्थिती लावली. राज ठाकरे यांनी स्वत: यावेळी भाषण केलं. राज ठाकरे या सभेत काय बोलतील? याबाबात अनेकांच्या मनात उत्सुकता होता. अखेर राज ठाकरे यांनी या सभेत रोखठोकपणे भाषण केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील नेतेमंडळींना खडेबोल सुनावलं. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर त्यांनी अतिशय मार्मिकपणे बोट ठेवत नेतेमंडळींना सुानवलं.
“मी मध्यंतरी मुलाखत दिली होती, त्यामध्ये मी म्हटलं होतं की, मला राजकारणाची उमज नाही असा १९७५ चा काळ होता, ज्यावेळेला आणीबाणी लागली होती. त्यावेळेला सर्व देश घुसळून निघत होता. मी शाळेत होतो. आजूबाजूचं वातावरण पाहत होतो. त्यानंतर १९७७ साली निवडणूक झाली. मी १९५२ सालापासून सर्व निवडणुका पाहत होतो. मग ती १९७१ ची गरिबी हटाव वाला नारावाली निवडणूक असेल. १९७७ च्या निवडणुकीवेळी आणीबाणी होती. जनता पक्ष हा आतल्या आत पराभवी ठरला. १९८४ साली इंदिरा गांधी यांची हत्या झाली. तो इशू होता”, असं राज ठाकरे म्हणाले.
“१९८९ साली बोफोर्स इशू होता, १९९१ साली राजीव गांधी यांची हत्या झाली हा इशू होता, १९९३ साली बाबरी मशिद पडली, बॉम्बस्फोट हा विषय होता. १९९८ ला कांदा हा विषय होता. १९९९ ला कारगील हा विषय झाला. त्याचबरोबर विदेशी बाई म्हणून काँग्रेसमधून बाहेर पडले आणि परत आतमध्ये गेले. मग २००४ ला इंडिया शायनिंग आलं. २०१४ ला नरेंद्र मोदींची लाट आली. २०१९ ला पुलवामा झाला, तो इशू होता. ही मी पहिली निवडणूक बघतोय जिला विषयच नाही”, असा दावा राज ठाकरे यांनी केला.
राज ठाकरेंनी नेतेमंडळींना सुनावलं
“विषयच नसल्यामुळे प्रत्येकजण आई-बहिणीवरुन काढतंय. महाराष्ट्र असा नव्हता. या सर्व गोष्टी बाहेरच्या राज्यात चालू शकतात. असा महाराष्ट्र कधीच नव्हता. महाराष्ट्रातील काही पुढाऱ्यांनी वेगळ्याच विषयात तुम्हाला गुंतवून ठेवलं आहे”, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील नेत्यांचे कान टोचले.
“मी आजची सभा का घेतोय? मुरलीधरजी आज पुण्यासारख्या मोठ्या शहरात, ज्या शहराने इतके विद्वान दिले, अशा एका पुणे शहरात तुम्हाला एका पुन्हा सत्तेत बसणाऱ्या खासदाराची उमेदवारी मिळाली आहे म्हणून मी आलेलो आहे. आपण विमानतळ आणि ट्रेनमध्ये सोडायला जातो तेव्हा बाहेरचं काही खाऊ नको, असे सल्ले देतो. आपल्या नियोजनशून्य गोष्टींमुळे शहरं डोळ्यांदेखत बरबाद होत आहेत”, असं राज ठाकरे म्हणाले.
“आपल्याकडची मुलं परदेशी का जात आहेत? ते एकाच गोष्टीसाठी जात आहेत. ते म्हणजे सभोतालचं वातावरण. त्यांच्या सभोतालचं वातावरण त्यांना आनंदी ठेवत नाही. आपल्याकडे राजकीय मुद्दे काढले जातात ते खालपर्यंत जातात. ते वातावरण त्यांना आवडत नाही. अशा घाणेरड्या वातावरणात त्यांना राहायची इच्छा नाही. आपले खासदार-आमदार असतील, सर्वात पहिली जबाबदारी हे सभोतालचं वातावरण तयार करणं आहे”, असं राज ठाकरे म्हणाले.