Maharashtra ZP Election Results 2026 : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत ठाकरे गटाची कामगिरी काय?
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला सर्वात वाईट कामगिरीचा सामना करावा लागला. त्यांना जिल्हा परिषदेत फारसं यश मिळवता आलं नाही, तर पंचायत समितीतही त्यांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. भाजपने या निवडणुकीत नंबर एकचा पक्ष ठरत मोठे यश मिळवले, तर शिंदे गट आणि अजित पवार गटही ठाकरे गटापेक्षा सरस ठरले.

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निकालाला सुरुवात झाली आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. काही ठिकाणी निकालेचे कल समोर येत आहेत. तर काही ठिकाणी निकाल हाती येत आहेत. या निवडणुकीत भाजप हाच राज्यातील नंबर वन पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजपची राज्यात पाळंमुळं किती खोलवर रुजली आहेत, हे स्पष्ट होत आहे. तर त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची कामगिरीही चांगली झाली आहे. मात्र, ठाकरे गटाला जिल्हा परिषदेत फारसं यश आलं नाही.
राज्यातील 12 जिल्हा परिषदांपैकी सात जिल्हा परिषदांवर भाजपचं वर्चस्व निर्माण झालं आहे. तर शिंदे गटाला एक आणि अजितदादांच्या गटाची प्रत्येकी एक जागा आघाडीवर आहे. तर काँग्रेसने दोन जागांवर आघाडी घेतली आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटाला फारसं यश मिळवता आलेलं नाही. ठाकरे गटाच्या एकाही बड्या नेत्याने यावेळीही निवडणूक प्रचार केला नाही. कार्यकर्त्यांना बळ दिलं नाही. त्याचाचा हा परिणाम दिसत असल्याचा चिमटा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी काढला आहे.
पंचायत समितीत कसंबसं सावरलं
125 पंचायत समितीच्या निवडणुकीचे कलही हाती आले आहेत. पंचायत समितीत भाजप 37, शिंदे सेना 22, अजितदादा गट 20, काँग्रेस आणि पवार गट प्रत्येकी 8 आणि ठाकरे गट 5 जागांवर आघाडीवर आहे. इतरांना एका जागेवर आघाडी मिळाली आहे. एकूण 95 जागांचे कल हाती आले आहेत. अजून 30 जागांचे कल हाती येण्याचे बाकी आहेत. दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे. त्यावेळी नेमकं चित्र स्पष्ट होणार आहे.
दानवे काय म्हणाले?
या निवडणूक निकालावर ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निकाल अजून यायचे बाकी आहेत, हे सत्य आहे की भाजप पुढे आहे, हे सत्य नाकारता येणार नाही. पैसा आणि प्रशासनाचा वापर भाजपने या निवडणुकीत देखील केला आहे. त्यामुळेच भाजपच्या हाती विजयाची माळ आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
यावेळी त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली. आघाडी जर एकत्र राहिली तर आम्ही आमचा उमेदवार निवडून आणू. कोणीही धाडस वगैरे म्हणून नये. आम्ही निवडणूक लढवणार आणि जिंकणार, असा दावा दानवे यांनी केला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप नंबर वन आणि शिंदे गट नंबर दोन वर राहील. तर ठाकरे गट चौथ्या पाचव्या स्थानी जाईल, अशी टीका उदय सामंत यांनी केली होती. त्याला दानवे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
