अजितदादा गटाला ट्विटरचा धक्का, ट्विटरकडून मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट सोशल मीडियावर अधिकच सक्रिय झाले आहेत. दोन्ही गटांकडून सोशल मीडियावरून आक्रमक प्रचार करण्यात येत आहे. त्यासाठी दोन्ही गटाचे ट्विटर अकाऊंट अत्यंत सक्रिय आहेत.
पुणे | 13 सप्टेंबर 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर सवतासुभा मांडला आहे. राष्ट्रवादीत दोन पडल्यानंतर दोन्ही गटाकडून पक्षावर दावा सांगण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अजितदादा गटाने थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्यानंतर आता शरद पवार गटानेही निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन आपलं म्हणणं मांडलं आहे. पक्ष आणि चिन्हासााठी दोन्ही आघाडीत दावे प्रतिदावे सुरू आहेत. दोन्ही गटांमध्ये चढाओढ सुरू असतानाच अजितदादा गटाला ट्विटरचा मोठा दणका बसला आहे. ट्विटरने अजितदादा गटावर कुरघोडी केली आहे.
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आलं आहे. ट्विटरचे नियम न पाळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अजितदादा गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार गटाकडून ट्विटरचे एक नवीन अकाऊंट NCPspeaks_official असे तयार करण्यात आले होते. अनेक जणांनी या अकाऊंटला विविध ट्विटमधून टॅग देखील केले होते. मात्र हे अकाऊंट आता ट्विटरने सस्पेंड केल्याचे दिसत आहे. दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाच्या ट्विटर अकाऊंट @NCPSpeaks हे ॲक्टिव आहे.
तक्रार गेली, कारवाई झाली
शरद पवार गटाकडून या ट्विटर हँडलवर दावा केल्यानंतर आणि तक्रारीनंतर ते निलंबित करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर अजित पवार गटाने ट्विटरला मेल केलाय, या मेलमध्ये आपली भूमिका मांडली आहे. लवकरच त्यांचे हँडल पुन्हा सक्रिय होईल, अशी अजित पवार गटाला आशा आहे.
सोशल मीडियावर सक्रिय
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही गट सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाले आहेत. दोन्ही गटाकडून कार्यक्रमाची बातमी तात्काळ सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे. दौऱ्याची माहिती दिली जात आहे. सभा आणि पत्रकार परिषदेतील मुद्दे असोत, व्हिडीओ असोत किंवा फोटो असोत तात्काळ दिले जात आहेत. सोशल मीडियातून अधिकाधिक चर्चेत राहण्यावर दोन्ही गटाने भर दिला आहे. राज्यात भाजपनंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय आहेत.
दोन्ही गट निवडणूक आयोगात
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. आपलाच पक्ष खरा असल्याचा दावाही दोन्ही गटाकडून केला जात आहे. दोन्ही गटाने निवडणूक आयोगात धाव घेऊन पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. अनेक कागदपत्रही जोडण्यात आली आहेत. तर अजितदादा गटाकडून निवडणूक आयोगाला थेट ठाकरे आणि शिंदे गटातील वादाचा हवालाच दिला आहे. त्यामुळे निवडणूक चिन्ह आणि पक्ष कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.