
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. आज शिवाजी पार्कवर महाययुतीच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला भाजप, शिवसेना आणि आरपीआय आठवले गटाचे सर्वच नेते उपस्थित आहेत. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अमित साटम, आशीष शेलार, रामदास कदम यांच्यासह इरतही महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. रामदास कदम नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.
रामदास कदम यांनी आपल्या भाषणात म्हटले की, ‘निवडणुका येतात आणि जातात. एका गोष्टीचं वाईट वाटतं. काल उद्धवजी तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हिंदुत्वावर संशय घेता. तुम्हाला नेमकं म्हणायचं काय. शिवसेना प्रमुखांच्या विचारांना तिलांजली देणारे तुम्ही. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचं वाटोळ करण्याचं काम केलं तुम्ही. त्यांच्या विचारांचे बेईमानी करणारे तुम्ही.’
पुढे बोलताना कदम यांनी म्हटले की, ‘दिल्लीत जाऊन सोनिया गांधींच्या पायावर डोकं ठेवणारे तुम्ही. तुमच्या सभेत पाकिस्तानचे झेंडे फडकतात. तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर टीका करता. दोन दिवस निवडणुका होतात. त्यानंतर तुम्ही आणि तुमचं पिल्लू फुलाचा गुच्छ घेऊन मंत्रालयात जाता. देवेंद्र फडणवीस भोळे आहेत. कुणाला भेटावं कुणाला नाही हे ठरवावं. सल्ला देणारा मी मोठा नाही. पण ज्याचं लग्न झालं नाही ते पिल्लू तुमच्यावर बोलतं. त्याची औकात काय आहे.
आपल्या भाषणात पुढे कदम म्हणाले की, ‘शिवाजी महाराजांचा भगवा घेऊन मोगलांविरोधात लढणारे हे शिंदे. त्या शिंदेंना काय म्हणता मिंधे. याच मिंधेच्या पायाशी तुम्हाला यावं लागेल. तुम्हाला हाजी हाजी करावी लागेल. या देशात जेवढे शिंदे आहेत त्या सर्वांचा अवमान करण्याचं काम करत आहात. दोनदा फक्त मंत्रालयात गेला. तुम्हाला जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे. गेल्या 25 वर्षापासून महापालिका तुमच्याकडे आहे. उद्धवजी तुमची भाषणं बघा. प्रत्येक भाषणात एकच मुद्दा असतो मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आहे. मराठी माणूस जागा हो. मुंबई गुजरातला जोडणार आहे, असं सांगता. कुणाचे बाप खाली उतरले तरी मुंबई तोडता येणार नाही.’