Sanjay Raut : विधान परिषदेच्या निवडणुका रद्द करा… भाजपच्या बड्या नेत्याची मागणी, संजय राऊत यांचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले, ही वेळ…

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेच्या निवडणुका रद्द करण्याची मागणी केली आहे. यावर ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी भाजपवर 'घोडेबाजार' केल्याचा आरोप केला. निवडणुकांमध्ये पैशांचा वापर होत असल्याने ही वेळ आल्याचे राऊत म्हणाले. त्यांनी विधान परिषद निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची किंवा खुल्या करण्याची मागणी केली.

Sanjay Raut : विधान परिषदेच्या निवडणुका रद्द करा... भाजपच्या बड्या नेत्याची मागणी, संजय राऊत यांचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले, ही वेळ...
संजय राऊत
| Updated on: Jun 06, 2026 | 10:49 AM

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेच्या निवडणुका रद्द करण्याची मागणी केली आहे. या निवडणुकीतून कोणताही फायदा होत नाही, असं सांगतानाच या संदर्भात मी केंद्र सरकारला पत्र लिहिणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही वेळ का आली? तुम्ही घोडेबाजार सुरू केला म्हणूनच ही वेळ आली ना? अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला सुनावलं आहे. राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते.

संजय राऊत काय म्हणाले?

विधान परिषद बरखास्त करा असं सुधीर मुनगंटीवार यांना का वाटतं ? त्यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह पत्रकार परिषद घ्यावी. हे त्यांचं व्यक्तीगत मत असू नये. आज विधान परिषद बरखास्त करा असं का वाटतं. कारण तुम्ही जो घोडेबाजार केला आहे, या निवडणुकीत, तुम्ही लोकांनी… एका दिवसात दीडशे कोटी कुणी खर्च केले. आमच्याकडे नाही पैसे. पैसे मिंधे गटाकडे आहे, भाजपकडे आहे, अजितदादांच्या गटाकडे आहे, अदानीकडे आहे. त्याचा वापर तुम्ही निवडणुकीत करता. त्यामुळे लोकांना निवडणूक नको आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

विधान परिषदही राज्यसभेप्रमाणे ओपन करा. तुमच्या प्रतोदाला मत दाखवा. आम्ही मागणी केली आहे. देशाच्या निवडणुका बॅलेटपेपरवर घ्या. या मागण्या तुमच्या नेतृत्वाकडे रेटून न्या, असं मी मुनगंटीवारांना सांगेन. महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका बॅलेटपेपरवर घ्या. राज्यसभा ओपन आहे. तिथे मत दाखवावं लागतं. त्याप्रमाणे विधान परिषदेच्या सर्व निवडणुका ओपन करा. तुमचं मत माझ्या पक्षाच्या व्हीप नुसार दिलं की नाही हे प्रतोदला दाखवा अशी मागणीही संजय राऊत यांनी यावेळी केली.

काय म्हणाले होते मुनगंटीवार ?

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना विधान परिषदेच्या निवडणुका रद्द करण्याची मागणी केली होती. सहा राज्यात हे फुकटचे धंदे केले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रद्दच केल्या पाहिजे. कारण नसताना नगरसेवकांना अस्थिर मनाचं करण्याचं काम या निवडणुका करतात. देवेंद्र फडणवीस आणि मी या संदर्भात विधानसभेत विषय उचलला होता. आता मी केंद्र सरकारला या संदर्भात पत्र पाठवणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बंद करा म्हणून सांगणार आहे. काहीच कारण नाही या निवडणुका घेण्याचं. जनतेतून निवडून येऊ द्या. या निवडणुकीतून फायदा कोणता होतो?, असा संतप्त सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता.

राज ठाकरे यांची भेट का घेतली ?

काल संजय राऊत यांनी शिवतीर्थ येथे जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अचानक भेट घेतली. त्याच्या या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या, राऊत-ठाकरे भेटीमुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगू लागली. राज ठाकरेंची भेट कशासाठी घेतली, काय बोलणं झालं हेही राऊतांनी स्पष्ट केलं.

मी राज ठाकरेंशी गप्पा मारल्या, आ्ही बऱ्याच अराजकीय गप्पा मारल्या. राज ठाकरे यांच्याकडे साहित्य, संस्कृती पर्यटन याची माहिती असते. त्यांच्याशी या विषयावर उत्तम संवाद साधू शकतो, त्या विषयावर आम्ही बोललो, असं राऊत म्हणाले.

आमची आणखीही एका विषयावर चर्चा झाली. बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही, तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाका, असं राज ठाकरे म्हणाले. मला ते पटलं. मी याबद्दल उद्धव ठाकरेंना सांगितलं. त्यावर चर्चा झाली पाहिजे, निर्णय झाला पाहिजे असं उद्धवजींनाही वाटतं. आमदार फोडले जात आहेत. त्यामुळे जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकावा असं आम्हाला वाटतं. हा विचार देशभर पोहोचेल, असं संजय राऊत यांनी नमूद केलं.

 

Follow Us