रावेरमध्ये शरद पवार गटात बंड, तर पालघरमध्ये ठाकरे गटाला खिंडार; दिवसभरात काय घडलं?

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महाविकास आघाडीत मात्र शिमगा सुरू झाला आहे. महाविकास आघाडीतील शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला आज मोठा फटका बसलाय. या दोन्ही पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी इतर बंड केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ऐन निवडणुकीत पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याने दोन्ही गटाची मोठी अडचण झाली आहे.

रावेरमध्ये शरद पवार गटात बंड, तर पालघरमध्ये ठाकरे गटाला खिंडार; दिवसभरात काय घडलं?
Sharad Pawar group
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 13, 2024 | 9:51 PM

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची नावे जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी जाहीर केली आहे. त्यात काहींचे तिकीट कापण्यात आलंय तर नव्या लोकांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराजी नाट्य सुरू झालं आहे. इच्छुकांनी नाराजी व्यक्त केल्याने त्यांचे समर्थकही रस्त्यावर उतरून नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटात मोठी धुसफूस झाली आहे. आपल्या नेत्याला उमेदवारी न दिल्याने शेकडो समर्थकांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. तर पालघरमध्ये ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे.

जळगाव जिल्ह्यातील वरण गावातील शरद पवार गटातीील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज राजीनामे दिले आहेत. माजी आमदार संतोष चौधरी यांना शरद पवार गटाने उमेदवारी नाकारली. ऐनवेळी श्रीराम पाटील यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे चौधरी समर्थक प्रचंड नाराज झाले आहेत. चौधरी यांच्या भुसावळ, रावेर आणि वरणगाव तालुक्यातील सहकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. त्यानंतर या समर्थकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. हातात राजीनामा पत्र घेऊनच हे पदाधिकारी निदर्शने करत होते.

राजीनामे देत आहोत

यावेळी संतोष चौधरी समर्थकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. तीन महिन्यात तीन पक्ष बदलणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिली. त्यामुळे पक्षात नाराजी आहे. संतोष चौधरी यांची लोकप्रियता आहे. त्यांना तिकीट मिळणार म्हटल्यावर उत्साह निर्माण झाला होता. पण त्यांचं तिकीट कापल्याने आम्ही सामूहिक राजीनामे देत आहोत, असं या संतप्त आंदोलकांनी सांगितलं,

चौधरी बंड करणार?

दरम्यान, ऐनवेळी आपली उमेदवारी कापण्यात आल्याने संतोष चौधरी प्रचंड नाराज आहे. चौधरी हे शरद पवार गटात बंड करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चौधरी हे अपक्ष उमेदवार म्हणून रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे चौधरी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. चौधरी यांनी बंड केल्यास रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे यांचा विजयाचा मार्ग मोकळा होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

ठाकरे गटाचे पदाधिकारी बविआत

दरम्यान, आज महाविकास आघाडीतील आणखी एका पक्षाला मोठा धक्का बसला. ठाकरे गटाला पालघर जिल्ह्यात मोठं खिंडार पडलं आहे. ठाकरे गटाला डहाणूमध्ये मोठे खिंडार पडलंय. डहाणूच्या तालुकाप्रमुखासह शेकडो कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला आहे. डहाणूचे शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख अशोक भोईर यांचा शेकडो समर्थकासह हितेंद्र ठाकुरांच्या बहुजन विकास आघाडीत जाहीर प्रवेश झाला. बविआच्या कामावर प्रेरित होऊन शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला असल्याचे भोईर यांनी म्हटलंय. आमदार हितेंद्र ठाकूर, माजी महापौर राजीव पाटील, आमदार क्षितिज ठाकूर, आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत विरारमध्ये बविआच्या कार्यालयात ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बविआमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

Follow Us