Sachin Ahir : ठाकरे गटातील असंतोष पुन्हा दिसला – सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिरसाटांचं मोठं विधान
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय, सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या बंडखोरीमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, अहिर यांनी शिंदे गटाकडून विधान परिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. एकनाथ शिंदे यांच्या या धक्कातंत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

6 खासदारांनी बंडखोरी करत शिंदे सेनेत प्रवेश केला, त्यामुळे ठाकरे गटाला बसलेल्या धक्क्याचा जोर अजूनही कमी झालेला नसताना मंगळवारी सकाळी उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा झटका बसला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिनअहिर हे फुटले. एकनाथ शिंदे यांनी अवघ्या 8 दिवसांत ठाकरेंना हा मोठा धक्का दिला. विधान परिषदेचे आमदार असलेले सचिन अहिर हे ठाकरे गाटतून बाहेर पडले आणि त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. सचिन अहिर यांनी विधानपरिषद उपसभापतीपदासाठी शिंदे गटाकडून उमेदवारीअर्ज भरला. एकनाथ शिंदे यांच्या धक्कातंत्रामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून सर्वत्र याच ऑपरेशनची चर्चा सुरू आहे.
दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया देताना मोठं विधान केलं आहे.
आज उबाठामध्ये असलेला असंतोष पुन्हा एकदा दिसला
विधान परिषदेच्या उपसभापतीपदाचा अर्ज दाखल करण्याची वेळ होती. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि आम्ही सर्वजण उपस्थित होतो. आज कोणाचा फॉर्म भरणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा उबाठाचं एक ऑपरेशन केलं आणि त्यामध्ये सचिन अहिर यांचा उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. सचिन अहिर मूळ शिवसैनिक, त्याने शिवसेनेतच प्रवेश केला आहे. म्हणून त्यांचं स्वागत एकनाथ शिंदे यांनी केलं. आणि आज उबाठामध्ये असलेला असंतोष पुन्हा एकदा आपल्याला पहायला मिळला आहे. याला उबाठाचे नेते काय नाव देतात हे पाहणं उत्सुकतेचं असेल असा टोला शिरसाट यांनी लगावला.
कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न, त्याचाच हा स्फोट
आम्ही ऑपरेशन करण्याच्या आणखीन मानसिकतेत नाही, हे जे येतात, त्या ठिकाणी त्यांची मानसिकता ढासळललेली आहे. पक्ष नेतृत्व काय करतोय, कार्यकर्त्यांना तिथे काय सन्मान मिळतोय हे त्यांनी पाहिलं आहे. सचिन अहिर हे काही काल परवाचे कार्यकर्ता नाहीत . ते राज्यमंत्री राहिले आहेत, वरळी भागात त्यांचं एक वजन राहिलं आहे. आणि अशा कार्यकर्त्यांनाही दाबण्याचा जो काही प्रयत्न झाला होता, त्याचा हा स्फोट झाला आहे,अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी सचिन अहिर यांच्या बाहेर पडण्याचं कारण स्पष्ट केलं.
आता सचिन अहिरांला या पक्षात येण्यासाठी काय ऑफर्स दिल्या, त्याच्यावर (ठाकरे गटाकडून) काय टीका होते, सचिन अहिर विकला गेला असं म्हणतील का, हे सगळं आता आम्हाला पहायचं आहे, असंही शिरसाट म्हणाले.
