AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा समाजाच्या दोन मोठ्या नेत्यांचं मनोमिलन, प्रकाश सोळंकेंकडून जरांगेंना भेटून चूक मान्य

"माझ्याकडून चूक झाली होती. मी त्या व्यक्तीला सांगत होतो की तू रिकॉर्डिंग करु नकोस. तुझं आणि माझं बोलणं हे वैयक्तिक आहे. पण त्याने रेकॉर्डिंग केलं आणि अर्धवट बोलणं व्हायरल केलं. हो, माझ्याकडून बोलण्याच्या ओघात चूक झाली होती", असं सोळंके यांनी मान्य केलं.

मराठा समाजाच्या दोन मोठ्या नेत्यांचं मनोमिलन, प्रकाश सोळंकेंकडून जरांगेंना भेटून चूक मान्य
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 04, 2023 | 6:45 PM
Share

दत्ता कानवटे, Tv9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 4 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात जावून मराठा नेते मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. त्यांनी व्हायरल ऑडिओ क्लिपमधील संभाषणाची चूक मान्य केलीय. आपल्याकडून बोलण्याच्या ओघात काही गोष्टी निघाल्या असतील. पण आपला मनोज जरांगे यांना कमी लेखण्याचा अजिबात उद्देश नव्हता, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच मनोज जरांगे यांनी खूप कमी वेळात समाजाचं मन जिंकलं आहे, असं म्हणत त्यांनी कौतुक केलं. तसेच त्यांनी मनोज जरांगे यांना कधीही हाक मारा. मी आपल्यासाठी येईन, असं आश्वासन दिलं. जरांगे यांना भेटून खूप मोकळं आणि हलकं झाल्यासारखं वाटतंय, अशीदेखील प्रतिक्रिया सोळंके यांनी दिली.

“मनोज जरांगे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचा काही गैरसमज झाला असेल तो मी दूर करेन, असं सांगितलं होतं. मी पहिल्यापासून मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी पुढाकार घेऊन आंदोलन केलेलं आहे. मी त्याच समाजाचा आहे. त्यामुळे विरोध असण्याचं कारण नाही”, असं प्रकाश सोळंके म्हणाले. प्रकाश सोळंके यांना यावेळी ऑडिओ क्लिपबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “माझ्याकडून चूक झाली होती. मी त्या व्यक्तीला सांगत होतो की तू रिकॉर्डिंग करु नकोस. तुझं आणि माझं बोलणं हे वैयक्तिक आहे. पण त्याने रेकॉर्डिंग केलं आणि अर्धवट बोलणं व्हायरल केलं. हो, माझ्याकडून बोलण्याच्या ओघात चूक झाली होती”, असं सोळंके यांनी मान्य केलं.

“माझं आधीपासून एकच म्हणणं होतं की, शासनाला पुरेसा वेळ द्यावा. बाकी काही माझी भूमिका नव्हती. घाई गडबडीत काही निर्णय होऊ नये. कारण तो निर्णय कोर्टात टिकणार नाही, अशी माझी भूमिका होती. ते मी समजवून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. पण तरुण पिढी आहे. वेळ दिला होता तर आता आरक्षण द्या, अशी त्यांची भूमिका होती”, अशी प्रतिक्रिया प्रकाश सोळंके यांनी दिली.

‘मला गैरसमज काय हेच कळालं नाही’, जरांगेंची प्रतिक्रिया

यावेळी मनोज जरांगे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “मी प्रकाश सोळंके यांची क्लिप ऐकली नव्हती. मला गैरसमज काय हेच कळालं नाही. आम्ही सर्व समाज सर्वसमावेशक धरलेला आहे. काम करत असताना माझ्याकडून द्वेष भावनेने कोणतीही गोष्ट झालेली माझ्या लक्षात नाही. मी तर झोपून होतो तर ती क्लिप ऐकणार कशी? मला तर आताही उठता येत नाही. याला आपणही साक्षीदार आहात. नऊ दिवसांत उपोषण सुरु होतं. मला माझाच फोन बघता आला नाही. मी सर्व समाज मायबापाच्या भूमिका घेऊन चालतो”, असं मनोज जरांगे म्हणाले.

‘ते चूक मान्य करत आहेत’, मनोज जरांगेंची भूमिका

“कुठे काही घडलंही असेल तर त्यावर मी स्वत:हून प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत. पण काहींच्या सांगण्यावरुन बोलण्यातही आलं असेल. पण आता सर्व समाज आहे. एकमेकांना सहकार्य करावं”, असं जरांगे म्हणाले. “ते चूक मान्य करत आहेत”, असंही जरांगे यावेळी म्हणावे. यावेळी जरांगेंना तुमचं मन मोकळं झालं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “आधीच मोकळं आहे ना. मी त्यांना फोन लावला नाही. तुम्ही असं का बोलले? असं म्हणालो नाही”, असं उत्तर मनोज जरांगेंनी दिलं.व

‘मोकळं झाल्यासारखं वाटतंय’

“मनोज जरांगे यांच्या भेटीनंतर मोकळं झाल्यासारखं वाटतंय.मी तुमच्या आंदोलनाबरोबर आहे. मला कधीही वैयक्तिक हात द्या. मी तुमच्यासोबत कधीही यायला तयार आहे”, असं प्रकाश सोळंके म्हणाले. यावेळी मनोज जरांगे यांनी प्रकाश सोळंके यांनी एक महत्त्वाची विनंती केली. “दादांनी एवढंच करावं की, पोरांच्या पाठिशी उभं राहावं. ते तुमचेच पोरं आहेत. त्यांनी समाजात मोठं मन दाखवलं आहे. त्यांच्यावर हल्ला करणारे पोरं कोणाची आहेत ते सुद्धा त्यांचेच आहेत”, असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं.

“मला माहिती आहे की, त्यात आंदोलक नव्हते. त्यात राजकीय विरोधक होते. अवैध धंदा करणारे आणि इतर समाजाचे होते. 21 पैकी 8 इतर समाजाचे होते. मी मराठा समाजाला कशाला दोष देऊ? मला माहितीय कोण आहे, कोणी कट शिजवला, हे राजकीय विरोधक आहेत. त्यांनी या आंदोलनातून डाव साधलाय. ते तपासातून उघड होईल”, असं प्रकाश सोळंके म्हणाले. त्यावर मनोज जरांगेंनी भूमिका मांडली. “कोणासोबतही असं घडू नये. त्यांच्या शहरातील ती घटना असल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं असेल. या गोष्टींचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार तशा गोष्टी असू शकतात”, असं मनोज जरांगे म्हणाले.

व्हायरल क्लिपवर प्रकाश सोळंके काय म्हणाले?

“मी म्हटलं, ते फार मोठी माणसं झाली आहेत. त्यांना देवासमान समाज मानतो. ग्रामपंचायत निवडणूकचं बोललो ते मी मान्य केलं. पण ते आता खूप वरच्या स्तरावर गेले आहेत. सरकारला वेळ हवा आहे. ते सरकारला वेळ देतील”, असं प्रकाश सोळंके म्हणाले. त्यावर मनोज जरांगे यांनी भूमिका मांडली. “एकप्रकारे निवडणूक लढले नाही, असं त्यांचं म्हणणं बरोबर आहे. छत्रपतींचे मावळे केव्हा निवडणूक लढले? आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. आम्ही कशाला निवडणूक लढवू?”, असं मनोज जरांगे यांनी केलं. त्यावर प्रकाश सोळंके यांनी लगेच स्पष्टीकरण दिलं.

“माझा त्यांना दुखवण्याचा किंवा हिणवण्याचा प्रयत्न नव्हता. मी सांगितलं फार मोठा माणूस आहे. एवढ्या कमी वेळात एवढ्या मोठ्या समाजावर ठसा उमटवणं ही सोपी गोष्ट नाही. जे आम्हाला 40 वर्षात जमलं नाही ते त्यांनी थोड्या काळात मिळवलं आहे, असा माझा म्हणण्याचा उद्देश होता”, असं प्रकाश सोळंके यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....