महाराष्ट्र काँग्रेस उद्या ठाकरे गटात विलिन झाली तर आश्चर्य नको; काँग्रेसच्या बंडखोर नेत्याचं मोठं विधान

| Updated on: Apr 27, 2024 | 4:37 PM

काँग्रेसने पहिल्यांदाच राज्यात एकाही मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे मुस्लिम समाजात प्रचंड नाराजी असल्याचं सांगत काँग्रेस नेते नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रचार समितीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेसच्या एकाही उमेदवाराचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी समजूत काढल्यानंतरही नसीम खान आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

महाराष्ट्र काँग्रेस उद्या ठाकरे गटात विलिन झाली तर आश्चर्य नको; काँग्रेसच्या बंडखोर नेत्याचं मोठं विधान
congress
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

काँग्रेसने राज्यात एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलं नाही. त्यामुळे काँग्रेसमध्येच धुसफूस सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी काँग्रेसच्या या धोरणावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. नसीम खान केवळ नाराजी व्यक्त करूनच थांबले नाहीत तर त्यांनी पक्षाच्या प्रचार समितीचा राजीनामा दिला आहे. तसेच आपण यापुढच्या टप्प्यासाठी काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसमध्ये ही धुसफूस सुरू असतानाच काँग्रेसच्या एका बंडखोर नेत्याने थेट काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. उद्या महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलिन झाली तर आश्चर्य वाटायला नको, असा हल्लाच या नेत्याने चढवला आहे.

काँग्रेसने मुस्लिमांना निवडणुकीतून डावलल्याने काँग्रेसमध्येच धुसफूस सुरू झालेली असतानाच माजी खासदार आणि काँग्रेसचे बंडखोर नेते संजय निरुपम यांनी या वादात उडी घेतली आहे. निरुपम यांनी ट्विट करून जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातील दीड कोटी मुस्लिम समाज केवळ आणि केवळ काँग्रेसलाच मतदान करतो. पण आता हा समाज काँग्रेसवर प्रचंड नाराज आहे. कारण काय? कारण एवढ्या वर्षापासून एकनिष्ठ राहिल्यानंतरही काँग्रेसने या निवडणुकीत एकाही मुस्लिमांना तिकीट दिलेलं नाही. हे पहिल्यांदाच झालं आहे, असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.

मुस्लिम धडा शिकवण्याच्या तयारीत

उत्तर मध्य मुंबईतील एक नेता आपल्याला तिकीट मिळेल म्हणून आशेवर होता. त्यालाही पार्टीने नाराज केलं आहे. काँग्रेसच्या मुस्लिम मतांवर डोळा ठेवून असलेल्या ठाकरे गटाने या नेत्याचा पत्ता कट केल्याची चर्चा आहे. राज्यात उबाठा गटासमोर काँग्रेस पूर्णपणे लिन झाला असल्याचं मी मागेच म्हटलं होतं. आता पुढे जर महाराष्ट्र काँग्रेसचं ठाकरे गटात विलिनिकरण झालं तर आश्चर्य वाटून घेऊ नका, असं सांगतानाच आता मुस्लिम समाज काँग्रेसशी दोन हात करण्याच्या तयारीत आहे, असा दावाही संजय निरुपम यांनी केला आहे.

भाऊ म्हणून उभे राहतील

दरम्यान, काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आज नसीम खान यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी नसीम खान यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी मीडियाशी संवाद साधला. नसीम खान हे मला भावासारखे आहेत. नसीम भाई आणि माझ्या वडिलांचे जवळचे संबंध होते. मी त्यांचे आशीर्वाद मागायला आले आहे. नसीमभाई हे राहुल गांधी आणि पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. मी आज लहान बहीण म्हणून भेटायला आले होते. आमचे पारिवारिक संबंध आहेत. ते भाऊ म्हणून माझ्याबरोबर उभे राहतील याची मला खात्री आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

 

वर्षा गायकवाड माझी बहीण

दरम्यान, नसीम खान यांनी वर्षा गायकवाड या माझ्या बहीण आहेत. त्यांच्याबद्दल काहीच नाराजी नाही. आमचे कार्यकर्ते काँग्रेसच्या सर्वच उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. पण मी प्रचारात नसेल, असं नसीम खान यांनी सकाळीच म्हटलं होतं. एकाही अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली नाही. महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच घडलं आहे. त्यामुळे समाजात काँग्रेसवर नाराजी आहे. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं.