ठाकरेंच्या नेतृत्त्वाबद्दल विचारताच राऊतांचे सडेतोड उत्तर, म्हणाले, त्या खासदारांना…सोक्षमोक्ष लावला!
उद्धव ठाकरे जर फिरले नसते तर ते आमदार, खासदार निवडून आले नसते. लोकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून या आमदार, खासदारांना मतदान केले आहे. ठाकरे परिवाराकडे पाहून हे मतदान झालेले आहे, असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या एकूण सहा खासदारांनी बंडखोरी केली आहे. या सहा खासदारांमधील ओमराजे निंबाळकर यांनी मात्र मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच माझा निर्णय जाहीर करणार आहे, अशी भूमिका घेतली आहे. ओमराजे यांच्या या निर्णयानंतर मात्र शिवसेनेच्या दोन्ही गटामध्य हालचालींना वेग आला आहे. कोणी परत येणार असेल तर आम्ही स्वागत करू, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. ओमराजे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जात आहे. दरम्यान, ही बंडखोरी झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. उद्धव ठाकरे आमच्यासाठी उपलब्ध नसतात, असा दावा या खासदारांकडून केला जात असल्याचे सांगितले जातेय. यावरच आता ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदारांनी त्यांच्या मतदारसंघात फिरायला हवे
संजय राऊत यांनी टीव्ही 9 मराठीला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्चचिन्हांबाबत विचारण्यात आले. यावर बोलताना खासदारांनी त्यांच्या मतदारसंघात फिरायला हवे. उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांचे आम्ही नंतर बघू. परंतु हे जे आरोप केले जात आहेत, ते चुकीचे आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
ते काही एवढे महान नाहीत
तसेच, उद्धव ठाकरे जर फिरले नसते तर ते आमदार, खासदार निवडून आले नसते. लोकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून या आमदार, खासदारांना मतदान केले आहे. ठाकरे परिवाराकडे पाहून हे मतदान झालेले आहे. हे मतदान नागेश पाटील आष्टीकर, संजय दिना पाटील, ओमराजे निंबाळकर, भाऊ वाकचौरे यांना मतदान झालेले नाही. ते काही एवढे महान नाहीत, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
उद्धव ठाकरेच पाहिजेत, हा अट्टहास कशासाठी
मतदान हे पक्षाला आणि उद्धव ठाकरे यांना झालेले आहेत. उद्धव ठाकरे हे गेल्या काही काळापासून एसआयआर संदर्भात जिल्ह्या-जिल्ह्यात जात आहेत. बैठका घेत आहेत. हे पक्षाचेच काम आहे. आदित्य ठाकरे याच कामासाठी अगोदर नाशिकमध्ये होते. पुण्यात होते, असे राऊत यांनी आवर्जून सांगितले. तसेच खासदारांना निवडून दिलेले आहे. अख्खा जिल्हा त्यांना सांभाळायचा आहे. प्रत्येक वेळेला उद्धव ठाकरेच आले पाहिजेत, हा अट्टहास कशासाठी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
