तुमचा खासदार गेला… गेला म्हणजे गेला… आपण दुखवट्याला आलोय, दहावं बारावं…; संजय राऊतांचा यवतमाळमध्ये घणाघात
sanjay raut news : ठाकरे गटाच्या यवतमाळमधील संजय राऊत यांनी फुटीर खासदारांवर जोरदार टीका केली.

६ खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. फुटीर खासदारांच्या मतदारासंघातच ठाकरे गटाने जाहीर सभा आयोजित केल्या आहेत. ठाकरे गटाने पहिलीच सभा फुटीर खासदार संजय देशमुख यांच्या यवतमाळमधील लोकसभा मतदारसंघात घेतली. या पहिल्याच आयोजित सभेत संजय राऊत यांनी फुटीर खासदारांवर जोरदार निशाणा साधला. तुमचा खासदार गेला… गेला म्हणजे गेला… आपण दुखवट्याला आलोय, असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली.
संजय राऊत यांनी यवतमाळकरांना संबोधित करताना फुटीर खासदारांवर जोरदार टीका केली. फुटीर खासदारांवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, आम्ही शिवसेनेसोबत राहतो म्हणून उपकार करत नाही. बाळासाहेबांनी खूप दिलं. निष्ठावंत शिवसैनिक आहेत म्हणून ही शिवसेना वादळात, संकटात उभी आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत सभा सुरू आहे. इथे शेतकऱ्यांचा माल येतो. विकला जातो. त्याला फार भाव मिळत नाही. १५ दिवसांपूर्वी एक माल आला आणि ५० कोटीला विकला गेला. तुमचा खासदार. खासदार गेले. गेले म्हणजे गेले. आपल्यासाठी ते गेले. त्या दुखवट्याला आपण आलो आहोत. आता दहावं बारावं करू आणि पुढच्या कामाला मोकळे होऊ. फार दुखं करायचं नाही. गाडा पाडा आणि शेवटी भगवा झेंडा फडकवा. ५० कोटी भाव झाला त्याचा. या बाजारात त्याला कोणी ५०० रुपयात घेतलं नसतं. तो शिवसेनेत आला. त्याला उद्धव ठाकरेंनी खासदार केला. म्हणून त्याची किंमत ५० कोटी झाली. उद्याच्या निवडणुकीत त्याची पाच रुपयेही किंमत ठेवू नका’.
‘मला आश्चर्य वाटतं, विकास निधीसाठी गेले. माझ्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. अरे कसला विकास करणार तुम्ही. १२ वर्षात मोदी देशाचा विकास करू शकले नाही. त्या मोदींच्या वाराणासीत जा, रस्ते नाही, पाणी नाही, पूल नाही, ज्या मोदींचे बुट चाटायला गेला, ते विकास करू शकले नाही, तुम्ही काय विकास करणार. कुणाकडे गेले तर ज्यांनी राम मंदिराच्या पेटीतून २ हजार कोटी मोदींच्या लोकांनी चोरले. त्या मोदींचे बुट चाटायला गेले, असं म्हणत राऊतांनी जहरी टीका केली.
‘देशमुखला सांगा ही शिवसेना आहे. ही शिवसेना संपत नाही. ठाकरे संपत नसतात. ते पुन्हा पुन्हा राखेतून उभे राहतात आणि महाराष्ट्रावर पकड मजबूत ठेवतात. तुम्ही मशालीच्या चिन्हावर निवडून आला. म्हणजे उद्धव ठाकरेंना लोकांनी मते दिली. तुम्हाला गद्दारी करायची तर राजीनामा द्या आणि मग कळेल लोक कुणासोबत आहे. पण एकनिष्ठ राहण्यासाठी आई नेक आणि बाप एक असावा लागतो. आम्ही सर्व एकनिष्ठ आहोत. हा एकनिष्ठांचा सागर महासागर लाटा या गद्दारांना तडाखे देऊन तुडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
‘काल उद्धव ठाकरेंचं नागपूरला आगमन झालं. प्रचंड गर्दी झाली. एकनाथ शिंदे आणि गद्दारांनी पाहिलं असेल तर कळलं असतं शिवसेना जागेवर आहे. जागेवर राहिल. तुमच्या छाताडावर पाय ठेवून लोकसभा आणि विधानसभेला जाईल. यवतमाळ हा कायम बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणारा जिल्हा आहे. शिवसेनेचा भगवा झेंडा यवतमाळवर कायम राहिला आणि कायम राहील, असे राऊतांनी सांगितले.
