देवेंद्र फडणवीसांनी भारत-पाक सामन्याचा निषेध करायला हवा कारण… संजय राऊतांचा घणाघात
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. हा सामना म्हणजे भाजपचा केवळ एक खेळ असून, सट्टेबाजीच्या माध्यमातून हजारो कोटींची माया जमवली जात असल्याचा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला आहे.

T20 विश्वचषकातील २७वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार असून क्रिकेटप्रेमींना या लढतीची उत्सुकता लागली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा केवळ खेळ नसून जगभरातील चाहत्यांसाठी तो एक मोठा उत्सव असतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना कोलंबो इथे होणार आहे. आता याच मुद्द्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून भाजपवर घणाघाती टीका केली. भारत-पाकिस्तान सामना म्हणजे भाजपचा खेळ आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी हल्लाबोल केला.
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. एकीकडे टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून राजकारण करायचे आणि दुसरीकडे पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळून सट्टेबाजीच्या माध्यमातून हजारो कोटींची माया जमवायची, असा दुटप्पी चेहरा भाजपचा उघड झाला असल्याची टीका राऊत यांनी केली.
भारत-पाकिस्तान सामना आम्ही पाहतच नाही. हा सामना म्हणजे भाजपचा खेळ आहे. इथे निवडणुका आल्या की भारत पाकिस्तान, हिंदू मुसलमान, राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती लोकांना शिकवायची, त्यावर मत मिळवायची आणि पाकिस्तानवर बहिष्कार टाकायचा. बांग्लादेशींना हकलायचं हे त्यांचे कार्यक्रम सुरु असतात. पण जेव्हा पैशांचा विषय येतो, बेटींग, सेटींग आणि जुगाराचा विषय येतो, तेव्हा भारत पाकिस्तान सामने खेळायला जय शाहांना परवानगी दिली जाते. जय शाह हे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे सुपूत्र आहेत, अशा शब्दात संजय राऊतांनी घणाघात केला.
कालच देवेंद्र फडणवीसांनी टिपू सुलतानचा विषय काढला. टिपू सुलतान किती क्रूरकर्मा होता असं सर्व म्हणाले. पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानीला हिरो मानलं जातं. मग अशा देशासोबत भारत जर क्रिकेट खेळत असेल तर देवेंद्र फडणवीसांनी त्याचा धिक्कार आणि निषेध केला पाहिजे, पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानचे धडे आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी धिक्कार करायला हवा, पण ते करत नाहीत कारण ते ढोंगी लोक आहेत. कारण या क्रिकेटमधून सर्वांना पैसे मिळतात. किती पैसे मिळतात, तर शेकडो कोटी मिळतात, असा आरोप संजय राऊतांनी केला.
तुमची ढोंग उघडी पडतात
भारत पाकिस्तान सामन्यावर जुगार खेळला जातो. मागच्या सामन्यातून पाकिस्तानला बेटींगद्वारे २५ हजार कोटी गेले. सरकारपेक्षा माझ्याकडे जास्त माहिती आहे. कारण यातील काही वाटा सरकारमधील काही लोकांनाही जातो. २५ हजार कोटी मागच्या सामन्यात गेले, आता त्याच्यापेक्षा जास्त जातील. सर्वात जास्त बेटींग ही याच सामन्यावर लागली आहे. हाच पैसा मग पुलवामा, पहलगाम या ठिकाणी पोहोचतो. कारण हे पाप भाजपचे आहे. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अमित शाह यातून तुमची ढोंग उघडी पडतात. भाजपने निषेध करावा. एकही भाजपचा नेता पाकिस्तानबरोबर खेळू नका असे सांगत नाही, अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केली.
