Maharashtra News LIVE Updates : टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर करणे योग्य नाही – गोपाळ शेट्टी
महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रातील बारा ज्योतिर्लिंगांसह सर्व शिवमंदिरांमध्ये भक्तांची अलोट गर्दी उसळली असून, आकर्षक सजावट आणि शासकीय महापूजांनी संपूर्ण राज्य शिवभक्तीत तल्लीन झाले आहे.

आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमून गेला आहे. वेरूळचे घृष्णेश्वर, परळीचे वैद्यनाथ आणि त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगांसह राज्यातील कानाकोपऱ्यातील शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच लांबच लांब रांगा लावल्या आहेत. मुंबईचे ऐतिहासिक बाबुलनाथ मंदिर असो वा अंबरनाथचे प्राचीन शिवालय, सर्वत्र भक्तांचा अलोट उत्साह पाहायला मिळत आहे. भीमाशंकर येथे विकासकामामुळे मंदिर बंद असले तरी प्रशासकीय पूजा थाटात पार पडली. तर पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिरात शंखनादाने वातावरणात चैतन्य भरले आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि भक्तिमय वातावरणामुळे आजचा दिवस खऱ्या अर्थाने शिवमय झाला आहे. यासह देश विदेश, महाराष्ट्र, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्य घडामोडी जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
अब्दुल सत्तार यांनी महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर गोमूत्र शिंपडले
माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरात चक्क गोमूत्र शिंपडल्याचा प्रकार घडला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथे घटना घडली आहे.
-
पिंपरी-चिंचवड : प्राचीन अशा धनेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी
चिंचवड गावातील एक हजार वर्षेपूर्वी प्राचीन अशा धनेश्वर महादेव मंदिरात कालरात्रीपासून ते आतापर्यंत भाविकांनी दर्शन घेतले असून तब्बल तीन दिवस महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. महान साधू मोरया गोसावी यांनी या ठिकाणी ध्यान केल्याची आख्यायिका आहे
-
-
पुण्यातील काँग्रेस भवनला अद्याप देखील मोठा पोलीस बंदोबस्त…
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान आणि शिवरायांची तुलना केल्याबद्दल दुपारी भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते आणि दगडफेकीची घटना झाली होती. त्यानंतर दुपारी पासूनच पुण्यातील काँग्रेस भवनाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
-
टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर करणे योग्य नाही – गोपाळ शेट्टी
टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर करणे मला योग्य वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराज ची तुलना कोणाही बरोबर होऊ शकत नाही, टिपू सुलतान तर खूप लांबची व्यक्ती आहे अशी प्रतिक्रीया भाजपाचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली आहे.
-
हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा आमदार संग्राम जगताप यांच्याकडून निषेध
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा आमदार संग्राम जगताप यांच्याकडून निषेध
सपकाळ यांना मावळ्यांनी जागेवर उत्तर द्यावं – आमदार संग्राम जगताप
टिपू सुलतानची विचारधारा भारतात पेरण्याचा प्रयत्न खेदजनक” – आमदार संग्राम जगताप
हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात भाजप देखील आक्रमक
-
-
सोलापुरात भाजप आक्रमक, हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात आंदोलन
सोलापुरात भाजप आक्रमक, हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात आंदोलन
हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन
सोलापुरात वातावरण तापलं
-
गेवराई तालुक्यातील चोपड्याचीवाडी येथील चार घरांवर 30 जणांकडून हल्ला
बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, गेवराई तालुक्यातील चोपड्याचीवाडी गावात चार घरांवर 30 जणांकडून हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत तीन महिला जखमी झाल्या असून, साहित्याची तोडफोड करण्यात आली आहे. जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
.
-
जामनेरमध्ये भाजप आक्रमक, हर्षवर्धन सपकाळ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
जामनेरमध्ये भाजप आक्रमक, हर्षवर्धन सपकाळ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानबद्दल बोलताना केलं होतं मोठं विधान
त्यानंतर राज्यभरात भाजप आक्रमक, अनेक ठिकाणी सपकाळ यांच्याविरोधात आंदोलन
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, भाजपकडून मागणी
-
भंडारा : महाशिवरात्रीनिमित्त श्री बहिरंगेश्वर मंदिरात उसळली भाविकांची गर्दी
भंडारा जिल्ह्यातील खामतलाव येथील श्री बहिरंगेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. भाविकांनी भगवान शिवाला दुग्धाभिषेक, बिल्वपत्र अर्पण करत पूजा-अर्चना केली. मंदिर समितीच्या वतीने दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. गर्दी लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
-
बाळासाहेब थोरातांकडून हर्षवर्धन सपकाळ यांची पाठराखण
छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे समकक्ष असल्याचे विधान केल्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका होत आहे. आता बाळासाहेब थोरातांकडून हर्षवर्धन सपकाळ यांची पाठराखण करण्यात आली. थोरात म्हणाले की, सपकाळ यांच्या बोलण्याचा विपर्यास केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन टिपू सुलतान लढल्याचे सपकाळ म्हणालेत.
-
पालघर : एमआयडीसीमधील कंपनीला लागली भीषण आग
पालघरच्या एमआयडीसीमध्ये एका कंपनीला भीषण आग लागल्याचे समोर आले आहे. गणेश नगर येथील परफेक्ट कंटेनर कंपनीला भीषण आग लागली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात धुरांचे लोट पहायला मिळाले. या आगीचं कारण अस्पष्ट आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
-
मालेगाव : हर्षवर्धन सपकाळ यांचा पुतळा जाळला
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज व टिपू सुलतान हे समकक्ष असल्याचे वक्तव्य केले होते. सपकाळ यांच्या या वक्तव्या विरोधात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मालेगावात तीव्र आंदोलन छेडत निषेध व्यक्त केला. शहरातील महात्मा गांधी पुतळा परिसरात सपकाळ यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा जाळण्यात आला, तसेच त्यांच्या छायाचित्राला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला.
-
हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा- विजय चौधरी
टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी होऊ शकत नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मानसिकतेची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. टिपू सुलतानांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं म्हणजे देशाचा अपमान आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी असं वक्तव्य करणं म्हणजे समस्त शिवप्रेमींचा अपमान आहे. या वक्तव्यावरून काँग्रेसची मानसिकता स्पष्ट झाली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी केली.
-
टिपू सुलतान आणि औरंगजेब हे विशिष्ट समाजाचे आहेत म्हणून त्यांना विरोध का?- असिफ शेख
मालेगाव- टिपू सुलतान आणि औरंगजेब हे विशिष्ट समाजाचे आहेत म्हणून त्यांना विरोध का? इस्लाम पार्टीचे असिफ शेख यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी अभ्यास करूनच स्टेटमेंट दिलं असेल तर हरकत काय? असं म्हणत असिफ शेख यांनी सपकाळ यांची पाठराखण केली आहे.
-
महाशिवरात्रीच्या दिवशी गोमांस वाहणाऱ्याला शिर्डीत गोरक्षकांकडून चोप
अहिल्यानगर- महाशिवरात्रीच्या दिवशी गोमांस वाहणाऱ्याला शिर्डीत गोरक्षकांनी चोप दिला आणि त्याची गाडीही फोडली. ममदापूर इथून दुचाकीहून शिर्डीत गोमांस घेऊन येत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. शिर्डी शहरातील गोरक्षकांनी गोमांस घेऊन जाणाऱ्याची दुचाकी फोडत त्याला चोप दिला. याप्रकरणी शिर्डी पोलिसांत विनापरवानगी गोमांस वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
-
राहुल गांधींनी तातडीने हर्षवर्धन सपकाळ यांचा राजीनामा घ्यावा- बावनकुळे
हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज आहे. राहुल गांधी यांना काही संवेदना असतील तर राहुल गांधींनी तातडीने हर्षवर्धन सपकाळ यांचा राजीनामा घेतला पाहिजे. त्यांना पदावरून दूर केलं पाहिजे. हर्षवर्धन सपकाळ यांचा राजीनामा घेतला नाही तर राहुल गांधीसुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांचं समर्थन करते आहेत असं होईल, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
-
20 फेब्रुवारीला राज्यभरातील ग्रामपंचायती राहणार बंद
20 फेब्रुवारीला राज्यभरातील ग्रामपंचायती बंद राहणार आहेत. अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं जाणार आहे. ग्रामपंचायती बंद ठेवण्यासह उपोषणाचाही इशारा देण्यात आला आहे. ज्या ग्रामपंचायतींचा कालावधी संपला आहे त्या ठिकाणी प्रशासक म्हणून सरपंचाची नियुक्ती करण्यात यावी अन्यथा निवडणुका घ्याव्यात, स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर जाणाऱ्या सदस्यासाठी सरपंचांना देखील मतदानाचा अधिकार मिळावा, जिल्हा नियोजन समिती सरपंचांना प्रतिनिधी म्हणून संधी मिळावी, निवडणुकीत तीन अपत्यांचा कायदा रद्द करून सुधारित निर्णय घ्यावा या मागण्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं जाणार आहे.
-
पुण्यात काँग्रेस भवनसमोर मोठा तणाव
पुण्यात काँग्रेस भवनसमोर मोठा तणाव… सपकाळांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने….आंदोलनादरम्यान दगडफेक, काँग्रेस कार्यकर्ता जखमी….
-
रोहित पवारांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना पत्र
रोहित पवारांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना पत्र… अजित पवारांच्या विमान अपघाताची व्यापक आणि स्वतंत्र चौकशी करा, पत्रातून मागणी….
-
पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला जीवे मारण्याची धमकी
पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला जीवे मारण्याची धमकी… पंकजा मुंडेंवर व्हिडीओ करु नको, असं सांगितलं… करुणा मुंडेंची माहिती… तर मला धमकी देण्यापेक्षा काम करा… करुणा मुंडेंचं उत्तर…
-
पुण्यात राडा, आंदोलनावेळी दगडफेक
पुण्यात भाजप आणि काँग्रेस आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे. आंदोलनावेळी भाजप- काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने मोठा वाद झाला. यावेळी काही आंदोलकांनी दगडफेक केल्याचं दिसून आलं. यामुळे हे आंदोलन आणखी तीव्र झालं आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. हर्षवर्धन सपकाळांविरोधात सध्या आंदोलन सुरु आहे.
-
हर्षवर्धन सपकाळांविरोधात भाजपचं आंदोलन
हर्षवर्धन सपकाळांविरोधात भाजपचं आंदोलन. आंदोलकांकडून घोषणा बाजी आणि दगडफेक झाल्याचं समोर आलं आहे.
-
अहिल्यानगरमध्ये भाजपचे जोडे मारो आंदोलन
भारतीय जनता पार्टी कडून हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ कापणाऱ्यास १० लाखांचे बक्षीस जाहीर केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यात आला. अहिल्यानगरच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर भाजपचे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते व जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब सानप यांची तीव्र प्रतिक्रिया समोर आली.
-
महाशिवरात्रीच्या दिवशी बोकड कापण्याचा राग,गावकऱ्यांचा संताप,तासभर रास्ता रोको
जालन्यातील घनसावंगी तळेगाव रोड वरती महाशिवरात्रीच्या दिवशी गावात बोकड कापल्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी जालना घनसावंगी रोडवरील तळेगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले,गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून आज महाशिवरात्रीच्या दिवशी सांगता असताना बोकड कापल्यामुळे गावकरी आक्रमक झाले आणि त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला.गावकऱ्यांनी प्रशासनाला कल्पना देऊन सुद्धा हा प्रकार झाले म्हणून नागरिक संतप्त झाले होते यावेळी पोलिसांनी संबंधितावर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी तासभरानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेतलं
-
तीन वर्षात तिसरी निविदा,अद्याप वांद्र्यातल्या पुलाला मुहूर्त मिळेना
माहिम फिशरमन कॉलनी ते वांद्रे पूर्व उड्डाणपूल प्रस्तावित आहे. २२० कोटी १७ लाख ४० हजार रुपये खर्चाला मंजूरी मिळाली.२०२२ मध्ये या उड्डाणपुलासाठी निविदाही काढण्यात आली पण तांत्रिक अडचणींमुळे निविदा प्रक्रिया मागे घेतली. जुलै २०२३ मध्ये पुन्हा निविदा काढण्यात आली, पण निविदेला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि निविदेची अंतिम मुदतही संपून गेली होती. आता पुन्हा नव्याने पूल विभागाने निविदा काढलीय. पूल मिठी खाडीवरून जाणार असल्याने CRZ आणि वन विभागाकडूनही घ्यावी लागणारी परवानगी कंत्राटदाराचीच जबाबदारी असेल. पश्चिम द्रुतगती महामार्गावर हा पूल फायदेशीर ठरणार असून, पूल सुमारे दीड ते अडीच किलोमीटर लांबीचा असेल
-
हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार नारायण कुचे यांचा हल्लाबोल
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान च्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटत असून भाजपच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांकडून जोरदार आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर जालन्यात देखील भारतीय जनता पक्षाचे आमदार नारायण कुचे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळालं. टिपू सुलतान हा गंधा माणूस त्याने आई-बहीण असेल आणि जातीजातीत भांडण लावण्याचे काम केलं, असा जोरदार हल्लाबोल भाजप आमदार नारायण कुचे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर केला आहे. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांनी तात्काळ माफी मागावी असा देखील इशारा नारायण कुचे यांनी दिलाय.
-
पुण्यात भाजपचे काँग्रेसविरोधात मोठे आंदोलन
झाले बहु होतील बहु परंतु या सम हाच अशा आशयाचं बॅनर भारतीय जनता पार्टी कडून पुण्यातील काँग्रेस भवनच्या समोर लावण्यात येत आहे. काँग्रेस भवन समोर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांचे आंदोलन सुरू भाजपच्या आंदोलना प्रतिउत्तर म्हणून काँग्रेसचे ही आंदोलन सुरू आहे.
-
हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचे जालन्यात उमटले पडसाद
भाजप च्या पदाधिकाऱ्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. तर काँग्रेसचे ही कार्यकर्ते आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी करत आहेत. भाजप पदाधिकाऱ्यांकडून टिपू सुलतान मुर्दाबाद च्या घोषणा दिल्या. आमदार नारायण कुचे,भास्कर दानवे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन केले.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जालन्यात भारतीय जनता पक्ष्याचे पदाधिकारी आक्रमक दिसले.
-
भाजप युवा मोर्चाचं नागपुरात आंदोलन
भाजप युवा मोर्चाचं नागपुरात आंदोलन करण्यात आलं. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ आंदोलन केलं. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन केलं. टिपू सुलतान ची तुलना करताना शिवाजी महाराज सारखा योद्धा म्हणून उल्लेख केला होता. त्याविरोधात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन सुरू आहे.
-
अमरावतीच्या कांतानगरमधील न्यायाधीशांच्या निवासस्थानी मध्यरात्री चोरी….
अमरावतीच्या कांतानगर मधील न्यायाधीशांच्या निवासस्थानी मध्यरात्री चोरी झाली आहे. पाच न्यायाधीश आणि चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरी रात्री चोरी झाली आहे. नलदमयंती आणि शहानुर अपारमेंट मध्ये चोरीची घटना घडली असून लाखोंचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. रात्री पोलीस बंदोबस्त असताना देखील चोरांनी शिरकाव केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
-
छत्रपती शिवाजी महाराज यूथ असोसिएशनतर्फे लंडन येथे अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ शोकसभा
त्रपती शिवाजी महाराज युवक संघठना तर्फे आज लंडन येथे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ भावपूर्ण शोकसभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचा तसेच महाराष्ट्र भवन, लंडनसाठी जाहीर करण्यात आलेल्या ५ कोटी रुपयांच्या मदतीचाही उल्लेख करण्यात आला. त्यांच्या कार्याचा आढावा घेताना उपस्थितांनी विविध आठवणींना उजाळा दिला.
-
विरारच्या श्री शेषनागलिंग मंदिरात महाशिवरात्रि निमित्ताने भाविकांची तुफान गर्दी
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरारच्या श्री शेषनागलिंग मंदिरात महाशिवरात्रि निमित्ताने भाविकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. दर्शनासाठी भाविकांच्या 5 ते 6 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आरास करण्यात आली आहे. मंदिर परिसरात कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.
-
नाशिकमध्ये भाजपचे आंदोलन
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपकडून आंदोलन केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे एकेरी उल्लेख केल्याने भाजप आक्रमक झाले आहे. आमदार देवयानी फरांदे काँग्रेसच्या कार्यालयावर भाजप पदाधिकाऱ्यांसह चालत जात आहेत.
-
न्यायाधीशांच्या निवासस्थानी मध्यरात्री चोरी
अमरावतीच्या कांतानगर मधील न्यायाधीशांच्या निवासस्थानी मध्यरात्री चोरी झाली आहे. पाच न्यायाधीश आणि चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरी रात्री चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. रात्री पोलीस बंदोबस्त असताना देखील चोरांनी शिरकाव केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण उपस्थित केले जात आहेत.
-
मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी कार्यकारी अभियंता निलंबित
मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी एमएमआरडीएने कार्यकारी अभियंत्याला निलंबित केले असून उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. त्याच बरोबर मुलुंड पोलिसांनी कंत्राटदार आणि सल्लागार कंपनीच्या पाच अधिकाऱ्यांना अटक केली आहे. शनिवारी दुपारी मुलुंड येथील एलबीएस रोडवर मेट्रोच्या कामादरम्यान झालेल्या अपघाताप्रकरणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. या चौकशी समितीच्या अहवालानंतर दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.
-
धाराशिवमध्ये पोलिसांसमोरच दोन गटात हाणामारी
धाराशिवच्या कळंब शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकात पोलिसा समोरच दोन गटात हाणामारी झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीवरुन हानामारी झाल्याची माहिती असून कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. भर चौकात पोलिसांन समोरच राडा, पोलिस हाणामारी होत असताना होते भांडण मिटवण्याच्या भुमीकेत.
-
भारत-पाकिस्तान सामना भाजपचा खेळ; संजय राऊतांची टीका
भारत-पाकिस्तान सामना भाजपचा खेळ. या सामन्यातून सगळ्यांना शेकडो कोटी रुपये मिळतात. मागच्या सामन्यातून 25 हजार कोटी पाकिस्तानमध्ये गेले. हा पैसा हल्ले करणाऱ्यांपर्यंत पोहोचतात अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
-
नाशिकमध्ये स्फटिक शिवलिंगाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील बोरटेंभे परिसरात असलेल्या ‘राज राजेश्वरी धाम’ या मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील अद्वितीय ‘स्फटिक शिवलिंग’, जे संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव स्फटिक शिवलिंग मानले जाते. पहाटेच्या सुमारास या स्फटिक शिवपिंडीला आकर्षक सजावट करून विधिवत महाआरती करण्यात आली, ज्याचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्तांनी गर्दी केली आहे. महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भक्तांसाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने ३०० किलो साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद तयार करण्यात आला आहे. संपूर्ण भारतात मोजक्याच ठिकाणी असलेल्या या स्फटिक शिवलिंगाच्या दर्शनाने भाविक तृप्त होत असून परिसर शिवनामाच्या जयघोषाने दुमदुमला आहे.
-
नागपूर पोलिसांचे ऑपरेशन थंडर, ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश
नागपूर शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांतर्फे ऑपरेशन थंडर राबविले जात आहे. या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत १ कोटी २ लाख ४० हजार रुपये किमतीची ५१२ ग्रॅम एमडी (MD) पावडर जप्त केली आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मोपेडवरून जाणाऱ्या संजय गंगवानी या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणातील एक आरोपी सध्या फरार आहे. नागपूर पोलिसांनी गेल्या काही दिवसांत कारवाया वाढवल्या असून, या मोठ्या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
-
दहावी-बारावी परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त होणार, शिक्षण मंडळाचे कडक पाऊल
राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने अत्यंत कठोर उपाययोजना जाहीर केल्या आहेत. परीक्षेत कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना मदत करणाऱ्या व्यक्तीवर आता थेट अजामीनपात्र फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. बारावीची परीक्षा सुरू झाली असून, येत्या २० फेब्रुवारीपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून सहा विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली असून, त्यात शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय पोलीस आणि महसूल विभागाची स्वतंत्र पथकेही संवेदनशील केंद्रांवर लक्ष ठेवणार आहेत. विशेष म्हणजे, ज्या केंद्रांवर कॉपीचे प्रकार आढळतील, त्या केंद्रांची मान्यता कायमची रद्द करण्याची तरतूदही यंदा करण्यात आली आहे.
-
त्र्यंबकेश्वर नगरीत भक्तीचा महापूर, ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक दाखल
नाशिक येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या विशेष दिनानिमित्त संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. प्रभू त्र्यंबकेश्वराचे रूप अधिकच मनमोहक दिसत आहे. पहाटेपासूनच देशभरातून आलेल्या हजारो भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने आणि स्थानिक पोलिसांनी सुरक्षेचे तसेच दर्शनाचे चोख नियोजन केले आहे. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात संपूर्ण त्र्यंबक नगरी भक्तिमय झाली असून, भाविकांच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.
-
परळीचे वैद्यनाथ मंदिर रोषणाईने उजळले, आकर्षक सजावटीने वेधले लक्ष
बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानल्या जाणाऱ्या परळी येथील श्री वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसरावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा आणि विशेष सजावटीमुळे हे पवित्र क्षेत्र अधिकच तेजस्वी दिसत आहे. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमला आहे. महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावर प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. मंदिर प्रशासनाने भक्तांच्या सुलभ दर्शनासाठी आणि सुरक्षेसाठी जय्यत तयारी केली आहे. सात दिवसांच्या या यात्रेनिमित्त विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
-
कल्याणमध्ये MIDC ची जलवाहिनी फुटली, लाखो लीटर पाणी वाया
कल्याण ग्रामीण परिसरातील हेदुटणे गावाजवळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (MIDC) १६०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटल्याने परिसरात हाहाकार उडाला आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे तब्बल ३० ते ४० फूट उंचीचे पाण्याचे फवारे हवेत उडत असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या घटनेमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत असून परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. ही जलवाहिनी मुख्य असल्याने ठाणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी या धक्कादायक दृश्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले असून दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.
-
भीमाशंकर नगरी रोषणाईने उजळली, पण भाविकांविना पार पडला सोहळा
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर आणि महादेव नगरी विद्युत रोषणाईने लखलखली आहे. मात्र, सध्या मंदिरात सुरू असलेल्या विकास आराखड्यांतर्गत दुरुस्ती आणि सुशोभीकरणाच्या कामांमुळे यंदाचे दर्शन भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत यंदाची शासकीय महापूजा परंपरेनुसार पार पडली. श्रावण महिन्यापर्यंत मंदिराचे सर्व काम पूर्ण करून भाविकांसाठी भव्य मंदिर खुले करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले असून, भाविकांनी या बदलांसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले आहे.
-
अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर दर्शनासाठी खुले, भाविकांची मोठी गर्दी
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर अंबरनाथ येथील ऐतिहासिक आणि प्राचीन शिवमंदिरात भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. यंदा सुरक्षेच्या आणि गर्दीच्या नियोजनाच्या दृष्टीने प्रशासनाने भाविकांना गाभाऱ्यात न सोडता बाहेरूनच दर्शनाची व्यवस्था केली आहे. आपल्या लाडक्या देवाचे दर्शन घेण्यासाठी रात्री १२ वाजल्यापासूनच भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला आहे. मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या सुविधेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
Published On - Feb 15,2026 8:57 AM
