आम्ही अमित शाहांच्या गटासोबत कसे जाणार? संघाच्या बालेकिल्ल्यातून संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर थेट हल्लाबोल

sanjay raut news : संजय राऊत यांनी नागपुरातून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंची शिवसेना ही अमित शहांचा गट असल्याची टीका केली.

आम्ही अमित शाहांच्या गटासोबत कसे जाणार? संघाच्या बालेकिल्ल्यातून संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर थेट हल्लाबोल
| Updated on: Jul 17, 2026 | 2:32 PM

आमदार रवी राणा यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येतील असा दावा केलाय. रवी राणा यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास राज्यातील राजकीय ३६० डिग्री फिरण्याची शक्यता आहे. परंतु रवी राणा यांचा दावा खासदार संजय राऊत यांनी फेटाळून लावला आहे. आम्ही अमित शाहा यांच्या गटासोबत कसे जाणार, असा सवाल करत संजय राऊतांनी करत शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. ते नागपुरातून बोलत होते.

रवी राणांचा दावा राऊतांनी फेटाळला 

रामरक्षा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी नागपुरात हजर आहेत. संजय राऊत देखील आजच नागपूरला पोहोचले आहेत. नागपुरात पोहोचल्यानंतर संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. दोन्ही शिवसेना एकत्र येतील, या रवी राणा यांच्या भाकीतावर संजय राऊत म्हणाले, ‘दोन्ही शिवसेना…आम्ही गद्दारांसोबत कसं जाणार? शिवसेना एकच आहे. अमित शाहांच्या गटासोबत आम्ही कसे जाणार? दिवंगत अजित पवारांनी स्थापन केलेला गट देखील अमित शाहांचाच गट आहे. त्यामुळे त्यांना सारखे भेट घेऊन आदेश घ्यावा लागतो’.

‘काल चोरीचा माल घेऊन अमित शहा यांच्याकडे गेले. त्यांना तिकडे जायची गरज काय? तुम्ही शिवसेना असल्याचा दावा करतात, मग वारंवार अमित शहांच्या दारात जाऊन लाचारासारखं उभं राहायची गरज काय? आम्ही लाचार नाहीत. आमची बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे,असे राऊतांनी सांगितले.

दोन्ही गट अमित शहा यांचे आहेत – संजय राऊत 

संजय राऊत पुढे म्हणाले, ‘आमचं आंदोलन हे राष्ट्रीय कार्यक्रम आहे. मातोश्री हिंदुत्वाचे स्थान आहे. आम्ही सर्व पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण दिले आहे. संघालाही आम्ही निमंत्रण दिले आहे. राम आमचेच नाहीत, ते सर्वांचे आहेत. शिवसेना एकच आहे. ते 2 गट अमित शाह यांचेही आहेत. परवाही ते चोरीचा माल घेऊन अमित शाह यांच्याकडे गेले होते. त्यांना जाण्याची काय गरज होती, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

‘श्रीरामाच्या नावाने हजारो रुपये लुटले गेले, हे चिंतेचा विषय आहे. ही आमच्यासाठी शरमेची बाब आहे. या चोरीबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शोक शब्द वापरला आहे. त्यांनी घटनेवर शोक व्यक्त केला आहे. खरोखर हा शोक व्यक्त करण्याचा प्रकार आहे, असे खासदार संजय राऊत पुढे म्हणाले.

Follow Us