Parth Pawar: पार्थ पवारांना केंद्रात मंत्री करा, बड्या नेत्याचं थेट पत्र; राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी?
Sunil Tatkare-Praful Patel-Parth Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्रिकरणाची हळई पुन्हा ऐकू आली आहे. दोन्ही बाजूने पुन्हा नकारघंटा वाजवली जात असली तरी बड्या घडामोडी घडत असल्याचे संकेत आहेत. त्यातच पार्थ पवारांना केंद्रात मंत्री करा अशी मागणी बड्या नेत्याने केली आहे.

Sunil Tatkare-Praful Patel-Parth Pawar: जयंतराव पाटील राज्याचे नवीन अर्थमंत्री होणार असा दावा समोर येत आहे. त्यापाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादी 15 दिवसात एकत्र येतील असेही सांगितले जात आहे. दोन्ही बाजूने नकारघंटा वाजवली जात असली तरी राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. राजकीय भेटीगाठीतून बरेच काही संकेत मिळत आहेत. त्यातच आता पार्थ पवार यांना केंद्रात मंत्री करण्याची मागणी रेटल्याने दिल्लीपासून मुंबईपर्यंत राजकीय धमाका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काय आहे महत्त्वाची अपडेट?
खासदार पार्थ पवारांना मंत्री करा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदय आहेर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिले आहे. राज्यसभा खासदार पार्थ पवार यांना केंद्रीय मंडळात समावेश करण्याच्या संदर्भात तुम्ही केंद्रात शिफारस करा अशी मागणी या पत्रातून केली आहे. पार्थ पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याची शिफारस करण्यात आली आहे. प्रदेश उपाध्यक्ष उदय आहेर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांच्या नावाची शिफारस केली आहे.
काय आहे त्या पत्रात?
आठ कारण देऊन पार्थ पवार मंत्री होणे का गरजेचं याचा उदय आहेर यांनी खुलासा केला आहे.
१) पार्थ पवार हे खऱ्या अर्थाने २१ व्या शतकातील उमद्या तरुणांचे व्हिजनरी नेतृत्व आहे.
२) हिंदी आणि इंग्रजी या भाषांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. याचा उपयोग देशपातळीवर निश्चितपणाने सरकारला व पक्ष वाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होईल.
३) पार्थ पवार यांचे उच्च शिक्षण लंडन येथे झाले आहे. त्यामुळे जगभरात होणाऱ्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि इतरही क्षेत्रातील बदल तसेच नाविन्याबद्दल पार्थदादांना पूर्ण आकलन आहे.
४) २१ व्या शतकातील तरुणांचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाईल. त्यामुळे देशभरातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आकृष्ट होण्यास मदत होणार आहे.
५) भारतीय जनता पार्टी देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. याबद्दल आपल्या कुणाच्याही मनात अजिबातच शंका नाही. पण, त्याच सोबत शिव, शाहू, फुले व आंबेडकरांचा विचार मानणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील देशभरात वाढायला आणि रुजायला हवा जेणेकरून शिव, शाहू, फुले व आंबेडकर यांचा वैचारिक वारसा आपल्याला पार्थदादांच्या माध्यमातून देशभर घेऊन जाता येईल असा विचार करणे पक्ष व देश हिताचे आहे, गैर नाही. शेवटी आपण भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष आहोत आणि भविष्यातही असणार आहोत.
६) पार्थ पवार यांच्याकडे राजकिय परिपक्वता नाही, असे चित्र निर्माण करण्याचे काम दुर्दैवाने मागील काळात झाले आहे. यामध्ये तुलना करून छत्रपती संभाजी महाराजांचे अनादर करण्याची धारिष्ट माझ्यासारखा शिवप्रेमी कदापिही करणार नाही. मात्र, इतिहासाकडून आपण नेहमीच काहीतरी शिकायला हवे. इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांना देखील अशाच पद्धतीने राजकिय कामकाज जमणार नाही, असे सांगून किंवा बदनाम करून त्यांना स्वराज्याचे छत्रपती होण्यापासून रोखण्याचे काम त्या काळातील अनाजीपंतांनी केले होते. तसेच कृत्य आपल्यातीलच काही “अनाजीपंत” करत आहेत. पार्थदादा हे राजकीय दृष्ट्या पक्षाला किंवा जनतेला न्याय देऊ शकणार नाहीत असा भ्रम दुर्दैवाने आपल्यातीलच काही लोकांकडून पसरविला जात आहे. हे “ओपन सिक्रेट” आहे. फक्त 38 वर्षाचे वय असणाऱ्या युवा नेतृत्वाबद्दल असे गैरसमज पसरवून एखाद्याचे राजकीय करियर सुरू होण्याआधीच संपविण्याचे पाप आदरणीयं अजितदादांच्या निधनानंतर काही लोकांकडून जाणीवपूर्वक केले जात आहे. म्हणून पार्थ पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी देऊन आरोप करणाऱ्यांना व गैरसमज पसरविणाऱ्यांना सडेतोड उत्तर आपण द्यायला हवे.
७) सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर जाणीवपूर्वक पार्थ पवार यांना हिणवून त्यांचे ‘मोरल डाऊन’ करण्याचे काम जाणीवपूर्वक करण्यात आले. त्यामुळे त्यांना उचित ठिकाणी संधी देण्यात यावी याविषयी माझे सातत्याने अजितदादांसोबत बोलणे होत होते. दादांना देखील माझे सर्व मुद्दे पटले होते आणि त्यांनी देखील पार्थदादांना मोठी संधी देण्याचे ठरविले होते. दादांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न या निमित्ताने आपण पुढे नेऊन पूर्ण करावे.
८) देशातील तरुण वर्ग राजकारणापासून मोठ्या प्रमाणात दूर गेलेला आहे राजकीय घडामोडींमध्ये तरुण वर्गाला फारसा रस उरलेला नाही. हे खेदाने नमूद करावेसे वाटते. मात्र, अशा परिस्थितीत त्यांच्यातीलच एक तरुण “त्या” वर्गाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आणि जबाबदारी पार्थ पवार योग्य पद्धतीने पार पाडतील असे या पत्रात म्हटले आहे. या पत्रानंतरच पटेल, तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पार्थ पवार यांची तक्रार केली असा दावा उदयकुमार आहेर यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
