अखेर राऊतांच्या अपशब्दामुळे भडका उडाला? बंडखोर खासदारांचं सर्वात मोठं पाऊल; ठाकरेंचं टेन्शन वाढलं!
ठाकरे गटात बंडखोरी होणार, याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. 16 जूनच्या रात्री हे बंडखोर खासदार आपापल्या पद्धतीने दिल्लीत जात होते. ही माहिती मिळताच बंडखोरी रोखण्यासाठी ठाकरे यांच्या पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत, अनिल देसाई दिल्लीला गेले.

Uddhav Thackeray Shiv Sena Split : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठी फूट पडली आहे. त्यांच्या 9 पैकी 6 खासदारांनी बंड केले आहे. या खासदारांनी आपला वेगळा गट स्थापन केल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे अजूनही काही खासदार परत येऊ शकतात, अशी आशा बाळगून ठाकरे यांच्या पक्षाचे संजय राऊत, विनायक राऊत, राजाभाऊ वाजे, अनिल देसाई हे नेते दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. परंतु आता ठाकरे गटाचे टेन्शन वाढवणारी माहिती समोर आली आहे. बंडखोर खासदार एकत्र मिळून आता लोकसभा अध्यक्षांकडे जाणार आहेत.
नेमकं काय घडणार?
ठाकरे गटात बंडखोरी होणार, याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. 16 जूनच्या रात्री हे बंडखोर खासदार आपापल्या पद्धतीने दिल्लीत जात होते. ही माहिती मिळताच बंडखोरी रोखण्यासाठी ठाकरे यांच्या पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत, अनिल देसाई दिल्लीला गेले. त्यांच्याकडून या बंडखोर खासदारांना परत बोलवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु खासदार परत येणार नाहीत, हे समजताच राऊत यांनी अतिशय आक्रमक भूमिका मांडली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी बंडखोर खासदारांना कोट्यवधी रुपये दिल्याचा आरोप केला.
राऊतांनी पत्रकार परिषदेत दिली शिवी
त्यानंतर राऊत तसेच ठाकरेंच्या बाजून असणाऱ्या सर्व खासदारांनी पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेच संजय राऊत यांनी अतिशय आक्रमकपणे बंडखोर खासदारांवर टीका केली. या खासदारांविषयी बोलताना त्यांनी एका शिवीचाही वापर केला. विशेष म्हणजे ही शिवी कापू नका. ती तशीच राहू द्या, असेदेखील माध्यमांना सांगितले. आता राऊत यांची हीच शिवी ठाकरे यांच्या पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बंडखोर खासदारांनी आता एक निर्णय घेतला आहे.
बंडखोर खासदार नेमकं काय करत आहेत?
सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेनंतर ठाकरे गटाचे बंडखोर खासदार नाराज झाले आहेत. ज्या प्रकारे खासदारांबद्दल अपशब्द वापरण्यात आले आहेत, त्यामुळे हे खासदार दुखावले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आता याचाच परिणाम म्हणून उद्याच हे सर्व खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासमोर अभे राहून आपले मत मांडणार आहेत. त्यामुळे आता उद्या काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.