महाप्रसादाचा कार्यक्रम संपला, पोटदुखी जुलाब उलट्या सुरु झाल्या, शेवटी डॉक्टर म्हणाले…
एका ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होता, तिथं दूषित पाण्यातून किंवा खाण्यातून लोकांना पोटदुखी जुलाब उलट्या सुरु झाल्या. त्यानंतर लोकांची पळापळ सुरु झाली. कुणाला काहीचं कळत नव्हतं अशावेळी डॉक्टरांनी लोकांना मदत केली.
सातारा : सातारा (SATARA) जिल्ह्यातील माण (MAAN)तालुक्यात मोही येथे एका महाप्रसादाच्या कार्यक्रमात दूषित पाण्यातून बाधा झाल्याने 121 जणांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास अचानक सुरु झाला. घाबरलेली लोकं इकडं तिकडं पळू लागली. कोणाला काय करावं काहीचं सुचतं नव्हतं. अशावेळी लोकांना शिंगणापूर (SHINGNAPUR HOSPITAL) प्राथमिक आरोग्य केंद्र आणि काही खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्या गावात घेण्यात आलेल्या महाप्रसादातील आमरस आणि पाण्याचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. लोकांना नेमका कशामुळे त्रास झाला हे स्पष्ट झालेलं नाही. लोकांच्यावरती अद्याप उपचार सुरु असून पुण्यातील तपासणी अहवालाकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
नेमकं काय झालंय
मोही गावात चव्हाणवस्ती परिसरात असलेल्या शंभू महादेवाच्या मंदिरात महाप्रसाद भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसाद घेण्यासाठी गावातील जवळपास 300 नागरिक उपस्थित होते. महाप्रसाद घेतल्यानंतर रात्री काही जणांना पोटदुखी, जुलाब, उलट्या अशा प्रकारचा त्रास होऊ लागला. त्यापैकी 29 रुग्ण दुसऱ्या दिवशी सकाळी मोही येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आले. एकाच प्रकारची लक्षणे असलेले रुग्ण आल्याने खासगी डॉक्टरांनी याबाबतची माहिती शिंगणापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली. त्यानंतर शिंगणापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य यंत्रणेने याबाबतची माहिती घेऊन जुलाब,उलट्यांचा त्रास असलेल्या 52 रुग्णांना शिंगणापूर आणि मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून औषधोपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
पुणे अहवालाकडे सगळ्यांचं लक्ष
महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या अनेक घटना घडल्या आहेत. महाप्रसाद किंवा भंडारा कार्यक्रम ठेवल्यानंतर काही लोकं विशेष काळजी घेतात. परंतु काल जो काही प्रकार झाला आहे. तो अत्यंत भयानक आहे. पुणे येथील प्रयोगशाळेत अहवाल आल्यानंतर नेमका हा प्रकार कशामुळे झाला हे सिध्द होणार आहे.