Rohit Pawar : इतकी वर्ष पवार कुटुंबाने पवनराजे हत्याकांड प्रकरणात जे टाळलं, त्याच भूमिकेला आज रोहित पवारांनी दिला छेद
Rohit Pawar : "शाहू, फुले ,आंबेडकर यांचे विचार नुसता वाचण्यापुरता नसतो, तर तो जगायचा असतो. म्हणूनच रस्त्यावर उतरून लढत आहे" असं रोहित पवार बोलले. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा या मागणीसाठी रोहित पवार छत्रपती संभाजी नगरला मोर्चा काढणार आहेत.

नुकतीच उद्धव ठाकरे गटात फूट पडली. 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर सुद्धा आहेत. विकासकाम आणि राजकीय भवितव्य याचा विचार करुनच ओमराजे निंबाळकर यांनी हे पक्षांतर केलं. धाराशिवमध्ये विकासकामांसाठी खासदार निधी कमी पडतो आणि पंचायत समित्या, नगरपालिका, जिल्हा परिषदांमध्ये ठाकरे गटाची झालेली पिछेहाट ही ओमराजे निंबाळकर यांच्या बंडखोरीमागे कारणं होती. ओमराजे निंबाळकर यांनी राजकीय आडाखे बांधून हे पक्षांतर केलं असलं, तरी ते सर्वांच्या रडारवर आले आहेत. सोशल मीडियावर त्यांची फॉलोइंग कमी झाली. विरोधी पक्षाकडून सातत्याने त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच आमदार रोहित पवार ही आहेत. त्यांनी ओमराजे निंबाळकर यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
“या भागातील काही लोक खोट्या शपथ खातात. पण मी तसा खोट्या शपथा खाणारा नाही. ते आधी हिरो होते. पण आता सत्ता पक्षात गेल्याने झिरो झालेत. मला ही भविष्य आहे. पण आम्ही सत्ता पक्ष मध्ये गेलो नाही” असं रोहित पवार म्हणाले. “शाहू, फुले ,आंबेडकर यांचे विचार नुसता वाचण्यापुरता नसतो, तर तो जगायचा असतो. म्हणूनच रस्त्यावर उतरून लढत आहे” असं रोहित पवार बोलले.
छत्रपती संभाजी नगरला मोर्चा काढणार
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा या मागणीसाठी रोहित पवार छत्रपती संभाजी नगरला मोर्चा काढणार आहेत. त्याच मोर्च्याच्या पूर्वतयारीसाठी रोहित पवार आज मराठवाडा दौरा करत आहेत. धाराशिव, लातूर, बीडचा आज दौरा करणार आहेत, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रोहित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून, शिवसेना पक्षात जाणाऱ्या ओमराजे निंबाळकर यांना टोला लगावला. सत्ताधारी पक्षात जाण्यावर भाष्य केले.
पवार कुटुंबीयांनी बोलणं टाळलं होतं
पवनराजे हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक खळबळजनक मागणी केली. “या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून हे संपूर्ण प्रकरण पुन्हा ओपन करावं” अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. पवन राजे हत्याकांडावर पवार कुटुंबीयांनी बोलणं टाळलं होतं. मात्र आज रोहित पवारांनी यावर आपलं मत व्यक्त केलं. “काही खासदारांनी न्याय मिळण्यासाठी देखील पक्षांतर केलं. मात्र दुसऱ्या दिवशी निकाल वेगळाच लागला .पक्षांतर करण्यासाठी न्यायव्यवस्थेचा वापर होत असेल तर ही गोष्ट लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे” असं मत व्यक्त करत रोहित पवार यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला. कोर्टाने या प्रकरणातील मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील यांची निर्दोष सुटका केली आहे. पद्मसिंह पाटील हे सुनेत्रा पवार यांचे बंधु आहेत.
