पितृपक्ष संपताच शिवसेना ठाकरे गटाला बसणार मोठा हादरा? बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ
पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहेत. मात्र त्याचपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याचा दावा मोठ्या नेत्याकडून करण्यात आला आहे, या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, यापूर्वी घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवन येथे ठाकरे गटांच्या शाखाप्रमुखांची बैठक पार पडली होती. तर दुसरीकडे मनसेप्रमुख राज ठाकरे देखील आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे.
दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं आगामी महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक देखील पार पडली, या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल परब देखील उपस्थित होते, तर शाखाप्रमुखांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी देखील युतीबाबत मोठं विधान केलं आहे, चर्चा सुरू आहे, मनसेबाबत युतीचा निर्णय लवकरच घेऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
आज दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आमची महत्त्वाची बैठक होत आहे, सध्या पितृपक्ष सुरू आहे, तो संपताच मोठे गौप्यस्फोट आणि धक्के हे दिलेच जातील, असा दावा शितल म्हात्रे यांनी केला आहे, म्हात्रे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, राज ठाकरे युतीबाबत एक चक्कार शब्द देखील काढत नाहीत, मात्र उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याने त्यतून ही वक्तव्य होत आहेत. दिघे साहेबांबाबत राऊत जे काही बोलत आहेत, त्यांच्या बोलण्याकडे आम्ही फारसं गांभीर्याने पहात नाहीत. ज्यांनी कफन आणि खिचडीतून पैसे खाल्ले त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोलाही यावेळी म्हात्रे यांनी लगावला आहे.
