झुकणार नाही, वाकणार नाही आम्हाला कापलं तरी…, आदित्य ठाकरेंचा मुंबईतून भाजपवर हल्लाबोल, दिपकेंच्या आंदोलनावरून वातावरण तापलं
दिल्लीमध्ये अभिजीत दिपके यांचं आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा देण्यात आला आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

दिल्लीमध्ये अभिजीत दिपके यांचं आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचूक यांना रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर आता स्वत: अभिजीत दिपके उपोषणाला बसले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे. अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाकडून सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची उपस्थिती आहे, या सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
नीटचा पेपर फुटला. २२ विद्यार्थ्यांनी उपोषण केलं. त्यासाठी उपोषण सुरू आहे तो निक्कमा मंत्री आहे. त्यांचा राजीनामा हवा आहे. त्या मंत्र्याला कोणतं सोनं लागलंय की त्यांना पंतप्रधान काढू शकत नाही. देशातील युवा रस्त्यावर उतरला आहे. सर्व विद्यार्थी आले आहेत. आपलं काही विषयावर एकमत होऊ शकणार नाही. पण देशाच्या भवितव्यांसाठी आपल्याला एकत्र यावंच लागेल यावर आपलं एकमत होऊ शकतं. मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी सर्व रस्त्यावर उतरले आहेत. नीटचा पेपर लीक होतो. टीईटीचा पेपर फुटतो. प्रत्येकवर्षी आंदोलन करावं लागतं. अनेक शाळांची दुरावस्था आहे. वीज नाही, बाथरूम नाही. सरकारला शिक्षणाची गरज वाटत नाही, असा घणाघात यावेळी आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजपचा एकच कारभार आहे देशाला अशिक्षित ठेवा. अंधभक्त बनवा. शिक्षणापासून वंचित ठेवा. आम्ही अंधभक्त राहू तर या देशाच्या मातीचे राहू. आम्ही अंधभक्त राहू तर फुले शाहू आंबेडकरांचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर शिवरायांचे राहू. आम्ही भाजपसमोर झुकणार नाही. वाकणार नाही. कापलं जरी आम्हाला आम्ही भाजपचे गुलाम होणार नाही.
आम्हीही भाजपसोबत होतो. एकदा फसलो. दुसऱ्यांदा फसलो. तिसऱ्यांदा फसणार नाही. देश बदलण्यासाठी ज्यांना कौल मिळाला होता आज तेच संविधान बदलायला निघाले आहे. त्यांच्या विरोधात लढायचे आहे. देशात अनेक गोष्टी घडत आहेत. इस्रोच्या १०० शास्त्रज्ञांनी राजीनामा दिला आहे. जगात वेगवेगळ्या कंपन्यात लोक जात आहेत. आपल्याकडे इस्रोचे शास्त्रज्ञ राजीनामा देत आहेत. यांना इस्रो सांभाळता येत नाही. दुसऱ्या पक्षाचे खासदार फोडण्यात मग्न आहेत, असंही यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
२०२२ पर्यंत देशाची परिस्थिती बदलणार होते. हर घर नळ देणार होते. कुठे आहे ते? सोनम वांगचुक यांना अटक केली होती एनआयएने. लडाखमध्ये ते उपोषणाला बसले होते. आम्हाला पूर्ण राज्य बनवून द्या अशी मागणी केली होती. पण त्यांना स्टेटहूड त्यांना द्यायचं नाही. कारण तिथल्या जमिनी त्यांना अदानींना द्यायच्या होत्या. त्यामुळेच त्यांनी वांगचुक यांना आत टाकलं होतं. आता शांत बसायचं नाही. आपलं एकमत होणार नाही. वेगवेगळ्या विचाराचे आपण असू शकतो. पण आपण देशासाठी एकत्र आलो पाहिजे. देशविरोधी भाजपसारख्या पक्षाला बाहेर काढलंच पाहिजे. मंदिर लुटणारे आहेत. विद्यार्थ्यांना लुटत आहेत. इथेनॉलच्या माध्यमातून लुटत आहेत. ही लूट थांबवायची आहे, असा हल्लाबोल या सभेमध्ये आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
