सोलापुरात मोठा ट्विस्ट… जन्म तारीख चुकीची… भाजप उमेदवाराच्या अडचणीत वाढ; तर बोगस सही करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज बाद
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या अर्जात चुकीची जन्मतारीख टाकल्याने आक्षेप नोंदवला गेला आहे. तर राष्ट्रीय समाज पार्टीच्या उमेदवाराने बोगस सह्या केल्याने त्याचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला.

पुणे विधान परिषदेतील उमेदवार विक्रम काकडे यांच्या अर्जात काही त्रुटी आढळल्याने खळबळ उडालेली असतानाच आता सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. सोलापूर विधान परिषदेतील भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे. राऊत यांनी अर्जात चुकीची जन्म तारीख टाकल्याचा आक्षेप आहे. तर राष्ट्रीय समाज पार्टीच्या उमेदवाराच्या अर्जावर बोगस सही असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांची उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. यावर आता निवडणूक आयोग काय उत्तर देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अपक्ष उमेदवार रमेश बारसकर यांनी राजेंद्र राऊत यांच्या अर्जावर आक्षेप घेतला आहे. भाजप उमेदवार राजेंद्र राऊत हे 2019-24 मध्ये आमदार असताना शासकीय निवासस्थानचा त्यांनी गैरवापर वापर केला का? या संदर्भातील माहिती लपवल्याचा आक्षेप बारसकर यांनी घेतला आहे. तसेच उमेदवारी अर्जात राऊत यांनी नावापुढे श्री लावल्याचे तसेच जन्मतारीख चुकीचे नमूद केल्याचा आक्षेपही बारसकर यांनी घेतला आहे. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी एस कार्तिकेयन यांच्यासमोर या हरकती संदर्भात सुनावणी झाली असून दुपारी निर्णय अपेक्षित आहे.
उमेदवारी अर्ज बाद
दरम्यान, सोलापूर विधान परिषद निवडणुकीत सूचक आणि अनुमोदकाच्या बोगस सह्या केल्या झाल्याचं दुसरं प्रकरण समोर आलं आहे. न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार अशोक वाघमोडे यांनी बोगस सह्या केल्याची माहिती समोर आली आहे. न्यू रासप पक्षाचे उमेदवार अशोक वाघमोडे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे.
आरती वाकसे, दिपाली वाघमोडे, जयश्री एकतपुरे, मनीषा मेटकरी, प्रतीक्षा मेटकरी, केरप्पा पांढरे, सिंधूताई आलदार, गणेश बनकर, शोभा फुले, विजय इंगोले या नगरसेवकाच्या बोगस सह्या केल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. बोगस सह्या विरोधात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस कार्तिकेयन यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे अशोक वाघमोडे यांना निवडणूक अधिकाऱ्यांकडून वारंवार उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. मात्र अशोक वाघमारे अद्याप सुनावणीसाठी उपस्थित राहिले नाहीत.
14 उमेदवारी अर्ज वैध
दरम्यान, धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज पार पडली. छाननीनंतर दाखल झालेले सर्व 14 अर्ज वैध ठरले असून एकूण 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत.
महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी सर्वाधिक 4 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काँग्रेसचे महेश देशमुख यांनी 2 अर्ज, तर अर्चना विनोद गंगणे यांनी 2 अर्ज दाखल केले होते. उर्वरित उमेदवारांनी प्रत्येकी एक अर्ज भरला होता. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये अहमदखान सय्यद नूर राज सय्यद, सहालबिन आमेर चाऊस, सचिन भारतराव पवार, संजय पांडुरंगजी मुंदडा, महालिंगे मिलिंद गणपती आणि शरद रामभाऊ यादव यांचा समावेश आहे.
आता उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असून त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. कोण माघार घेणार, कोण बंडखोरी कायम ठेवणार आणि अखेर किती उमेदवार मैदानात राहणार याकडे लक्ष लागले आहे. भाजपचे बसवराज पाटील विरुद्ध काँग्रेसचे महेश देशमुख अशी थेट लढत होणार का? उद्याच्या माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
सांगलीत अपक्ष अडचणीत
सांगली-सातारा विधान परिषद अर्ज छाननी प्रक्रिया सुरू आहे. यावेळी भाजपचे धैर्यशील कदम यांनी अपक्ष उमेदवाराच्या अर्जावर आक्षेप घेतला. अपक्ष उमेदवार किशोर धुमाळ यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला. धुमाळ यांच्याकडून अनुमोदक-सूचक म्हणून बोगस सह्या केल्याचा आरोप आहे. अनुमोदक आणि सूचक म्हणून करण्यात आलेल्या स्वाक्षऱ्या बोगस केल्याचा कदम यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे. अर्ज छाननी प्रक्रिये बाबत 4 वाजता निर्णय देणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
