आम्ही काय भीक मागतोय का? ऊसाचे बिल द्या… शेतकर्यांनी थेट तलावात घेतल्या उड्या… जलसमाधी आंदोलनाने प्रशासनाला धडकी
Sugarcane Farmers Jalsamadhi Protest: सोलापूरमध्ये थकीत देयके न मिळाल्याने ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. इशारा देऊनही चालढकल करणाऱ्या प्रशासनाचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी धडाधड तलावात उड्या घेतल्या. या प्रकारामुळे प्रशासन घामाघू्म झाले. शेतकऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.

Sugarcane Farmers Jalsamadhi Protest: गोकुळ साखर कारखान्याने ऊस बिल थकवल्याच्या निषेधार्थ सोलापुरात शेतकरी आक्रमक झाले. आम्ही काय भीक मागत आहोत का, असा संतप्त सवाल करत काही शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराज तलावात धडाधड उड्या घेतल्या. शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन सुरू झाले. त्यावेळी प्रशासनाची एकच भांबेरी उडाली. पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. काही अधिकारी तलावात उतरले. हे सर्व जण शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण शेतकरी संतप्त झालेले आहेत. त्यांचे रौद्ररूप यावेळी दिसून आले.
पोलिसांचे बॅरिकेट्स दूर सारून उड्या
शेतकरी आज जलसमाधी आंदोलन करणार असा इशारा अगोदरच देण्यात आला होता. त्यादृष्टीने पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतली होती. मागण्या मान्य न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तलावाकडे मोर्चा वळवला. पोलिसांनी त्यांना अडवण्यासाठी अगोदरच बॅरिकेट्स लावले होते. शेतकरी मोठ्या संख्येने आले होते. त्यांनी बॅरिकेट्स दूर सारून तलावाकडे धाव घेतली. या तलावात शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले.
गेल्या 17 दिवसांपासून शेतकऱ्यांचं उपोषण
गोकुळ कारखान्याने 130 कोटी रुपये ऊस बिल थकवल्याने मागील 17 दिवसापासून शेतकर्यांचे उपोषण सुरू आहे. पण प्रशासन कुंभकर्णी झोपेतून उठले नाही. निगरगठ्ठ अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना अखेर जलसमाधी आंदोलनाचा मार्ग निवडावा लागला. प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नसल्याने शेतकऱ्यांनी आज जलसमाधी आंदोलन सुरू केले. उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी आज शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलावात जलसमाधी आंदोलन सुरू केले.
शेतकर्यांची आरपारची लढाई
दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्रा येथील गोकूळ साखर कारखान्याकडे थकलेल्या ऊसबिलांच्या मागणीसाठी शेतकरी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाले आहेत. गेल्या 17 दिवसांपासून शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे. तर गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांना प्रशासनाचा निषेध म्हणून अर्धनग्न आंदोलनही केले होते. पण अधिकारीच इतके निर्ढावलेले आहेत की त्यांच्यावर या आंदोलनाचा काडीचाही परिणाम झाला नाही. तहसीलदार असो की पोलिस प्रशासन कोणीही त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शांततापूर्ण ठिय़्या आंदोलन सुरू आहे. कारखान्यानेही दखल न घेतल्याने शेतकऱ्यांचा संयम आज सुटला. त्यांनी शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलावात (कंबर तलाव) सामूहिक जलसमाधी आंदोलन केले. प्रशासनासोबत आता शेतकऱ्यांनी आरपारची लढाई सुरू केली आहे. गोकूळ साखर कारखान्याने सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ऊस बिले थकवली आहेत. हक्काच्या पैशांसाठीच शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ आली आहे.
