Loksabha Election : लोकसभेचे गणित बिघडवणारे महाराष्ट्रातले काही प्रमुख नेते, मतपेटीमधून जनता कुणाला स्वीकारणार?
महाराष्ट्राचे राजकारणच मुळात गुंतागुंतीचे आहे. येथे अनेक जाती, धर्माचे लोक आहेत. अनेकांच्या प्रथा, परंपरा वेगळ्या आहेत. आरक्षणाचा मुद्दा अनेकदा डोके वर काढत आहे. कॉंग्रेसचा पारंपारिक विरोधी पक्ष भाजपने या प्रादेशिक पक्षांना सोबत घेतल्याने कॉंग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मुंबई : देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा वरचष्मा कायम रहाणार आहे. महाराष्ट्रात असलेल्या लोकसभेच्या 48 जागा या इंडिया आघाडीचे की एनडीएचे गणित बिघडविणार हा प्रश्न आहे. राज्यात पूर्वी मतदारांना भावतील असे काही चेहरे होते. यात प्रामुख्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, भाजपचे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे असे एकापेक्षा एक वरचढ नेते होते. या नेत्यांनी आपल्या विरोधात असलेल्या पक्षांवर टीका केली. पण, टीकेची वैयक्तिक पातळी कधी ओलांडली नव्हती. यातील बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे नेते आता हयात नाहीत. तर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन गट पडले. शिवसेनाही दोन पक्षात विभागली गेली आहे. कॉंग्रेसमध्ये प्रमुख मानावा असा चेहरा उरला नाही. तरीही महाराष्ट्रात असे काही प्रमुख चेहरे आहेत की जे सत्तेची गणिते बदलवू शकतात. कोण आहेत ते नेते. त्यांचा राज्यात किती प्रभाव आहे ते जाणून घेऊ…
उत्तरप्रदेश पाठोपाठ देशात सर्वाधिक लोकसभेच्या जागा असणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र. राज्यातल्या या जागा कुणाचाही खेळ बिघडवू शकतात तर कुणाला सत्तेवरही बसवू शकतात. एकेकाळी राज्यात कॉग्रेस प्रबळ होती. पण, महाराष्ट्राचे राजकारणच मुळात गुंतागुंतीचे आहे. येथे अनेक जाती, धर्माचे लोक आहेत. अनेकांच्या प्रथा, परंपरा वेगळ्या आहेत. आरक्षणाचा मुद्दा अनेकदा डोके वर काढत आहे. त्यामुळे येथील प्रादेशिक पक्ष, त्याचे नेते यांनी प्रबळ असलेली कॉंग्रसला धक्का देण्यास सुरवात केली. त्यात कॉंग्रेसचा पारंपारिक विरोधी पक्ष भाजपने या प्रादेशिक पक्षांना सोबत घेतल्याने कॉंग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
महाराष्ट्राचे राजकारण केवळ जातीच्या आधारावर जिवंत नाही. कारण, राज्यात असे अनेक नेते या राज्याने दिले आहेत ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला प्रभाव सोडलाच, पण वेळोवेळी देशाच्या राजकारणावरही आपला प्रभाव टाकला. त्याचप्रमाणे राज्यात आजही असे अनेक नेते आहेत ज्यांच्या चेहऱ्याच्या आधारावर मतांचे राजकारण केले जाते. यातील सर्वात दोन मोठे चेहरे म्हणजे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
भेदक लेखन सोबत घणाघाती वक्तृत्व करणारे बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे यांचे राजकारण हे नेहमी राज्यातील मराठी माणसाला केंद्रित करणारे राहिले. लाखालाखांची सभा घेण्याचा विक्रम हा केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावावर आहे. हिंदुत्व आणि मराठी भाषेचे कट्टर समर्थक असणारे बाळासाहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक तरुण शिवसेनेत सामील झाले. बाळासाहेब यांनी शिवसेनेला कधीही एक जातीय पक्ष किंवा एक धर्मी पक्ष असं होऊ दिले नाही. काहीच राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी मुख्यमंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक केलं. बाळासाहेब यांनी उजव्या डाव्या समजल्या जाणाऱ्या सर्वांशी पंगा घेतला. पुढे, 1990 दरम्यान त्यांनी भाजपसोबत युती केली. त्यावेळी हिंदुत्व हा मुद्दा युतीमधील समान धागा होता. परंतु, बाळासाहेब यांचे हिंदुत्व हे सर्वसमावेशक होते. त्यामुळेच 1995 साली शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री झाला. बाळासाहेब ठाकरे यांचे 17 नोव्हेंबर 2012 या दिवशी निधन झाले. पण, आज 2024 उजाडले तरी त्यांच्या नावाचा दरारा. दबदबा अजूनही कायम आहे. त्याचे नाव घेऊनच शिवसेनेला निवडणुका लढाव्या लागत आहेत.
राज ठाकरे यांची जादू कायम
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनापूर्वीच त्यांचे पुतणे राज ठाकरे यांनी जानेवारी 2006 मध्ये शिवसेना पक्ष सोडला. त्यानंतर 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची घोषणा केली. पक्षाच्या सुरवातीला राज ठाकरे यांनी आपल्या सभा, झेंडे यावर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव लावले होते. पण, बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आपले नाव वापरण्यास बंदी घातली. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखीच राज ठाकरे यांची वकृत्वशैली असल्यामुळे अनेक तरुण कार्यकर्ते मनसेमध्ये सामील झाले. राज ठाकरे यांनीही बाळासाहेब यांच्याप्रमाणेच आधी मराठीचा मुद्दा आणि त्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. पक्ष स्थापनेनंतर झालेल्या 2009 च्या विधानसभा निवडणुकीत 13 आमदार निवडून आले. मुंबई महापालिकेत 27 नगरसेवक, नाशिक, खेड या महानगर पालिकांवर सत्ता मिळवली. पण, त्यानंतर मनसेला आपला करिष्मा दाखविता आला नाही. मनसेचे उमेदवार निवडून येत नसले तरी त्यांना मिळणाऱ्या मतांची आकडेवारी ही धक्कादायक आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची जादू अजूनही कायम आहे हे नाकारता येत नाही. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठींबा दिला आहे. यामुळे भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उद्धव ठाकरे यांची कसोटी ठरवणारी निवडणूक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 2003 साली शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. त्यानंतर झालेल्या 2004 च्या विधानसभा निवडणुका या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आल्या. त्या निवडणुकीत शिवसेनेच्या 62 जागा निवडून आल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले. शिवसेना म्हणजे आक्रमक, गुंडांची शिवसेना अशी ओळख होती. पण, शिवेसेनेची ही इमेज बदलण्यात उद्धव ठाकरे यशस्वी ठरले. 2014 साली उद्धव ठकारे यांनी भाजपसोबत असलेली युती तोडली. पण, स्वबळावर त्यांनी 63 आमदार निवडून आणले. पुढे, 2019 च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा भाजपसोबत युती केली. 56 आमदार निवडून आले. परंतु, सत्ता वाटपावरून युतीत मतभेद निर्माण झाले आणि ही युती तुटली. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 21 जून 2022 या दिवशी एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे सध्या राजकारणाच्या कठीण टप्प्यातून जात आहेत. मात्र, त्यांच्याशिवाय सध्याच्या राज्याच्या राजकारणाचा विचार करणे चुकीचे ठरेल. एकीकडे त्यांना आपला गट मजबूत करायचा आहे. तर, दुसरीकडे नव्याने राजकारणाचा शुभारंभ करायचा आहे. पक्ष फुटीनंतर होणारी ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. त्यामुळे ही निवडणूक उद्धव ठाकरे तसेच त्याच्यासोबत असणाऱ्या कॉंग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही कसोटी ठरवणारी असणार आहे.
एकनाथ शिंदे यांना जनता स्वीकारणार का?
उद्धव ठाकरे यांनी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी या तीन पक्षांची मिळून महाविकास आघाडी निर्माण केली. महाविकास आघाडीचे ते मुख्यमंत्री झाले. पण, अडीच वर्षानंतर शिवसेनेत मोठे बंड झाले. एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केले. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिली नाही. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. इतकेच नव्हे तर त्यांनी शिवसेना पक्ष आणि शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरही आपला दावा सांगितला. निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणी दरम्यान आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अनेक नेते येऊ लागले. पण, होऊ घातलेल्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना जनता स्वीकारणार का? हा प्रश्न आहे.
84 वर्षाचे शरद पवार पुन्हा मैदानात
महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांच्या नावाची नोंद आहे. राज्याचे चार वेळा मुख्यमंत्रीपद शरद पवार यांनी भूषविले आहे. गेल्या 60 वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ते सक्रिय आहेत. तर, देश पातळीवरही त्यांनी संरक्षण मंत्री, कृषी मंत्री म्हणून काम केले आहे. पूर्वी कॉंग्रेसवासी असलेले शरद पवार यांनी 1999 साली स्वतःचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्थापन केला. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला राज्यात सर्वाधिक 71 जागा मिळाल्या. त्यामुळे पक्षाचा मुख्यमंत्री होण्याची संधी असूनही शरद पवार यांनी कॉंग्रेसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर केली. मात्र, या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसला फार मोठे यश मिळाले नाही. शरद पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील पितामह म्हटले जाते. पुतणे अजित पवार यांच्या बंडामुळे शरद पवार पुन्हा राजकारणात सक्रीय झाले आहेत. निवडणुकीचा प्रदीर्घ अनुभव असणारे शरद पवार यांच्यामध्ये राजकारणाला कलाटणी देण्याची क्षमता आहे. सरकारमध्ये कोणीही असो, प्रत्येक वेळी पवार फॅक्टरच निर्णायक ठरला आहे. आजही इथल्या राजकारणात काही मोठं घडलं तर त्यात पवारांची भूमिका महत्त्वाची असते.
अजित पवार
शरद पवार यांच्याविरोधात बंड करून त्यांचे पुतणे अजित पवार यांनी राज्यात एकच खळबळ माजविली. महाराष्ट्राचे सर्वाधिक म्हणजेच पाच वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळालेले अजित पवार हे एकमेव नेते. बारामती हा अजित पवार यांचा पारंपारिक मतदार आहे. याच मतदारसंघातून 1991 साली अजित पवार लोकसभेत निवडून गेले होते. मात्र, त्यानंतर ते राज्याच्या राजकारणात रमले. 1995 पासून 2019 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री होते. मात्र, शिवसेनेत बंड झाले आणि ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे अजित पवार यांच्याकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद आले. मात्र. अजित पवार यांनीही राष्ट्रवादीत बंड करून 2 जुलै 2023 रोजी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला. त्याचप्रमाणे अजित पवार यांनीही चुलते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला. विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळावर निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह सोपवले. चुलते शरद पवार यांच्याप्रमाणेच अजित पवार यांच्याकडेही राजकीय गणिते बदलण्याची क्षमता आहे.
भाजपचे राज्यातील सर्वात तरुण नेतृत्व देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रात भाजपची गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन ही जोडी गाजत होती. प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर गोपीनाथ मुंडे राज्यात एकाकी पडले. बीड हा गोपीनाथ मुंडे यांचा बालेकिल्ला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या सरकारच्या कार्यकाळात गोपीनाथ मुंडे यांना केंद्रात मंत्री करण्यात आले. मात्र, त्यांचा अपघाती मृत्यू झाला. याच काळात राज्यात देवेंद्र फडणवीस नावाचे भाजपमध्ये एक तरुण नेतृत्व तयार होत होते. 1997 मध्ये ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर झाले. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अशी पदे त्यांना मिळाली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आणि भाजपचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान देवेंद्र फडणवीस यांना मिळाला. कायद्याची पदवी प्राप्त केलेले देवेंद्र यांनी बिझनेस मॅनेजमेंटचाही अभ्यास केला आहे. कॉलेज काळापासून ते अभाविपचे सक्रिय सदस्य होते. हिदुत्वाचे कट्टर समर्थक आणि संघाचे अत्यंत जवळचे समजले जाणारे फडणवीस यांच्याकडे उत्तम नेतृत्व कौशल्य आहे. तसेच, आक्रमक भाषणशैलीही आहे.
शेतकरी, दलित आणि ओबीसींचे राजकारण करणारे प्रकाश आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे या लोकसभेत महत्वाचा फॅक्टर असणार आहेत. शेतकरी, दलित आणि ओबीसींचे राजकारण करणारे प्रकाश आंबेडकर हे नेहमीच महाराष्ट्र राजकारणात चर्चेचा विषय राहिले आहेत. 1994 मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस आणि भाजप, शिवसेना या पक्षांना आव्हान देण्यासाठी ‘अकोला पॅटर्न’ राबविला होता. त्यावेळी त्यांनी काही दलितेतर पक्ष आणि संघटना यांच्याशी युती करत ‘भारिप-बहुजन महासंघाची’ मोट बांधली. तोच प्रयोग त्यांनी 2018 मध्ये राबविला. लोकसभा निवडणुकीपूर्वी सुमारे 100 लहानमोठ्या पक्षांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी निर्माण केली. लोकसभेच्या 48 जागा वंचितने लढविल्या. पण, केवळ औरंगाबाद ही जागा जिंकली. मात्र, कॉंग्रेसचे किमान 8 हून अधिक उमेदवार वंचितमुळे पराभूत झाले होते हे विशेष.