Pune rave party case : प्रांजल खेवलकर यांना जामीन, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नाथाभाऊंची जावयाला क्लीन चीट
एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यात झालेल्या एका रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली होती. दरम्यान त्यांना आता जामीन मंजूर झाला आहे, यावर खडसे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, काही दिवसांपूर्वी पुण्यातील खराडी परिसरात झालेल्या एका रेव्ह पार्टी प्रकरणात पुणे पोलिसांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक केली होती, अखेर प्रांजल खेवलकर यांना आज जामीन मिळाला आहे. प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळाल्यानंतर आता एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. महाराष्ट्रात अत्यंत खालच्या पातळीवर राजकारण सुरू आहे, असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे?
प्रांजल खेवलकर यांना ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती, आज त्यांना व या प्रकरणातील सर्वांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे असं लक्षात येतं की त्यांनी कुठलंही ड्रग्स सेवन केलेलं नव्हतं. तरीही त्यांना खोट्या आरोपाखाली रेव्ह पार्टीच्या नावाखाली अडकवण्यात आलं. प्रत्यक्षात रेव्ह पार्टी झालीच नव्हती. माझ्या जवयाला क्रमांक एकचा आरोपी करण्यात आल, त्यांच्यावर कुठलाही गुन्हा आधी नव्हता, असं खडसे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, कोणीतरी त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. आज त्यांना जामीन मिळाला, पुढे खटला चालेल, त्यातून ते निर्दोष सुटतील. मात्र महाराष्ट्रात अत्यंत खालच्या पातळीवर राजकारण सुरू आहे, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी पुण्याच्या खराडी परिसरात सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला होता. या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी रंगेहात पकडलं होतं. प्रांजल खेवलकर यांना अटक केल्यानंतर राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती, वातावरण तापलं होतं. आरोप-प्रत्यारोप झाल्याचे देखील पहायला मिळाले. एकनाथ खडसे यांनी यावरून भाजपवर गंभीर आरोप केले होते, त्यानंतर त्यांच्याविरोधात मोर्चा देखील काढण्यात आला होता. अखेर आता या प्रकणात खेवलकर यांना आज जामीन मिळाला आहे. जामीन मिळताच खडसे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
