राष्ट्रवादीच्या अध्यक्षा होताच सुनेत्रा पवार भावुक, अजितदादांची आठवण काढत म्हणाल्या, यापुढे पक्ष…

सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांना भावना अनावर झाल्या.

राष्ट्रवादीच्या अध्यक्षा होताच सुनेत्रा पवार भावुक, अजितदादांची आठवण काढत म्हणाल्या, यापुढे पक्ष...
sunetra pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 26, 2026 | 7:13 PM

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईत राष्ट्रवादी पक्षाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर सर्वच महत्त्वाच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावावर सहमती दाखवली. त्यानंतर पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. आता राज्यात नवे सुनेत्रा पवार पर्व सुरू झाले आहे, असे म्हणत भविष्यात राष्ट्रवादी पक्ष चांगली प्रगती करेल, असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. दरम्यान, राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना संबोधित केले. मी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असून पक्षाच्या विढीसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करेन, असे आश्वासन त्यांनी दिले. हे भाषण करताना सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांना भरून आलं.

आपला पक्ष माणसांशी नातं सांगणारा

या अधिवेशनात बोलताना, एखादी गोष्ट करायची ठरवली की अजितदादा ती गोष्ट सिद्ध करून दाखवायचे. आपला राष्ट्रवादी पक्ष देशाच्या मातीशी, माणसांशी नातं सांगणार आहे. जनतेशी नाळ जुळलेला आपला पक्ष आहे. आपल्या देशाची निर्मितीच मुळात संघर्षातून झालेली आहे. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही संघर्षातून स्थापन झाला. संघर्षातूनच हा पक्ष वाढला, अशा भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्या.

ही जबाबदारी अत्यंत कठीण असली तरीही…

आदरणीय अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेल्या अपार दु:खातून आपण अजूनही सावरलेले नाहीत. त्यांच्या जाण्याने आपल्या सर्वांच्याच आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून मीही या पक्षाशी जोडलेली आहे. राजकारण, समाजकारण करताना माझ्यासाठी सगळंकाही नवं नव्हतं. अजितदादांसारख्या वादळासोबत मी 40 वर्षे संसार केलेला आहे. त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत कठीण असली तरी तुमच्या साथीने ही जबाबदारी अजिबात अशक्य नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हा सन्मान माझा नसून प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. हा सन्मान माताभगिनीचा आहे. आदरणीय दादांनी आयुष्यभर शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचा विचार जपला. याची जाणीव आपल्याला आहे. अजितदादांनी या विचारांशी कधीच तडजोड केलेली नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा त्यांनी आयुष्यभर जपला. हाच विचार आपल्यालाही जपायचा आहे, असे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले. तसेच अजितदादांनी ज्या-ज्या गोष्टी केलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टी आपण करायच्या आहेत, असे म्हणत भविष्यात पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने काम करावे, अशी विनंतीही सुनेत्रा पवार यांनी केली.

Follow Us