पत्रकारांना मारण्याची धमकी देताच सुषमा अंधारे संतापल्या, संजय दिना पाटलांना चांगलंच सुनावलं; म्हणाल्या, पैसा…
या राज्यात मुली सुरक्षित नाहीत. महिला सुरक्षित नाहीत. लोकलमधील प्रवासी सुरक्षित नाहीत. लोकप्रतिनिधींना विधिमंडळाच्या परिसरात धक्काबुक्की होते. म्हणजेच लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचेही काही खरे नाही. अधिकाऱ्यांना खुल्या धमक्या दिल्या जात आहेत. आता पत्रकारांनाही धमकी दिली जात आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

Sanjay Dina Patil : ठाकरे गटाला सोडून बंडखोरी करत संजय दिना पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. दरम्यान पक्षबदल केल्यानंतर तीनच दिवसांनी संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पत्रकारांना खुलेआम धमकी दिलेला व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. या प्रकरणानंतर आता ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय दिना यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय दिना यांच्या डोक्यात सत्ता गेली आहे. गृहमंत्र्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
माणूस किती बदलू शकतो हे चित्र समोर
जोपर्यंत हे लोक आमच्यासोबत होते तोपर्यंत शिस्तीत होते. आता त्यांची शिस्त बिघडली आहे. संजय दिना यांच्याबाबत मला जास्त आश्चर्यकारक वाटत आहे. अवघ्या तीन दिवसांत पैसा आणि सत्ता किती डोक्यात जाऊ शकते. माणूस किती बदलू शकतो हे चित्र समोर दिसत आहे, असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला..
संजय दिना हे कमिश्नरलाही जुमानत नाहीयेत
तसेच, संजय दिना पाटील यांनी अर्वाच्य भाषेत पत्रकारांना धमक्या दिल्या. याची सर्वाधिक उत्तर ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतली पाहिजेत. त्याच कारण असं आहे की, संजय दिना हे बोलताना कोणत्या कमिश्नरकडे जायचं ते जा असं बोलून गेले. संजय दिना हे कमिश्नरलाही जुमानत नाहीयेत. कमिश्नर ज्या खात्यात काम करतात ते गृहखातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. या खात्याचे पालक गृहमंत्री देवेंद्र फडणीस आहेत. फडणवीस यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांना शिंदेंचे खासदार कस्पटासमान लेखले जात आहे. यावर गृहखात्याने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असी मागणीही त्यांनी केली.
आता पत्रकारांनाही धमकी दिली जात आहे
या राज्यात मुली सुरक्षित नाहीत. महिला सुरक्षित नाहीत. लोकलमधील प्रवासी सुरक्षित नाहीत. लोकप्रतिनिधींना विधिमंडळाच्या परिसरात धक्काबुक्की होते. म्हणजेच लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचेही काही खरे नाही. अधिकाऱ्यांना खुल्या धमक्या दिल्या जात आहेत. आता पत्रकारांनाही धमकी दिली जात आहे, असे म्हणत राज्याचं गृहखातं कोणाला सुरक्षा देण्यासाठी काम करत आहे. संजय दिना यांच्यासारखे उन्मत्त, गुंडगिरी करणाऱ्या लोकांना वाय प्लस सुरक्षा दिलेली आहे. या लोकांनी दिवसा पत्रकारांचे खून पाडावेत, यासाठीच दिना पाटील यांना सुरक्षा दिलेली आहे का? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
