दिवा रेल्वे फाटकाचा फटका! मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत; कल्याण स्थानकात प्रवाशांची गर्दी
Diva Railway Junction : दिवा रेल्वे स्थानकादरम्यानच्या फाटकाने यापूर्वी सु्द्धा अनेकदा तीन तेरा वाजलेला आहे. ही समस्या एकदाची सोडवण्याची रेल्वे प्रवाशांची मागणी आहे. यावेळी सुद्धा फाटक 25 मिनिटे बंद न झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाले. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचा नेहमी बोजावारा उडत असल्याने प्रवाशांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे.

दिवा रेल्वे फाटकाचा फटका प्रवाशांना बसला. मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत झाली. यामुळे कल्याण स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली. दिवा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे फाटक तब्बल 25 मिनिटे बंद न झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होती. वाहतूक कोंडीमुळे फाटक बंद करण्यात विलंब झाल्याचा रेल्वे प्रशासनाने दावा केला आहे. डाऊन मार्गावरील लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम झाला. अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. अप मार्गावरील काही गाड्याही गेल्या तासभरापासून विलंबाने धावत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे.
रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी
वाहतूक कोंडीमुळे फाटक बंद करण्यात विलंब झाल्याचा रेल्वे प्रशासनाने दावा केला आहे. रेल्वे फाटक तब्बल 25 मिनिटे बंद न झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. या सर्व घडामोडींचा लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला. गाड्या उशिराने धावत असल्याने कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली आहे. सध्या अप मार्गावरील गाड्या सुमारे 20 मिनिटे उशिराने, तर डाऊन मार्गावरील वाहतूकही विलंबाने सुरू असल्याची रेल्वे प्रशासनाने माहिती दिली आहे.
पुल करेल का वाहतूक कोंडीतून सुटका?
दिवा रेल्वे स्थानकातील फाटक बंद करून त्याजागी पूल उभारण्याच्या प्रस्तावाला 2012-13 मध्ये मंजुरी देण्यात आली होती. उड्डाणपुलांचे रेल्वे रुळांवरील भागाचे काम पूर्ण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण अशा अतिशय वर्दळीच्या मार्गावर दिवा रेल्वे फाटक आहे. दिवा स्थानकाजवळील गेट क्रमांक 29 हा सर्वाधिक गर्दीचा बिंदू आहे. दिवा रेल्वे जंक्शनमधून धीम्या आणि जलद अप-डाऊन लोकल, अप-डाऊन मेल, एक्सप्रेस, मालगाड्या तर दिवा मेमू गाड्यांची वाहतूक होते. अनेकदा रेल्वे फाटक खुले झाल्यानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. ही वाहन कोंडी फुटेपर्यंत रेल्वेगाड्यांचा खोळंबा होतो. रोज साधारणपणे येथील फाटक 30 ते 40 वेळा उघड-बंद होते. या सर्व गोष्टींचा फटका प्रवाशांना बसतो. मध्य रेल्वे वारंवार विस्कळीत होते. यावर एकदाचा तो तोडगा काढण्याची मागणी करण्यात येत आहे.
