‘त्या कठीण काळातही माझ्या वडिलांनी कुठलाही विचार न करता…’, श्रीकांत शिंदे नेमकं काय म्हणाले?

"घराणेशाहीवर बोलायचं झालं तर वरळीची जागा स्वत:च्या मुलासाठी जिंकता आली पाहिजे यासाठी दोन सिटींग आमदारांचा बळी घेतला, जे जिंकून आली असते. स्वत:चा मुलगा निवडून आला पाहिजे म्हणून दोघांसोबत कॉम्प्रमाईज केलं, मुलगा निवडून आल्यानंतर मग दोघांना एमएलसी दिलं", अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

त्या कठीण काळातही माझ्या वडिलांनी कुठलाही विचार न करता..., श्रीकांत शिंदे नेमकं काय म्हणाले?
Chetan Patil | Updated on: Jan 13, 2024 | 8:39 PM

मयुरेश जाधव, Tv9 मराठी, कल्याण | 13 जानेवारी 2024 : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेक ठिकाणी सडकून टीका केली. त्यांच्या या टीकेला शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. कल्याण लोकसभा मतदारसंघात 2014 मध्ये शिवसेनेच्या तत्कालीन खासदाराने राजीनामा दिला होता. शिवसेनेला त्यावेळी उमेदवार मिळत नव्हता. त्यावेळी आपल्या वडिलांनी (मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी) मागचापुढचा कोणताही विचार न करता मुलाला उमेदवार म्हणून घोषित केलं, असं श्रीकांत शिंदे म्हणाले. श्रीकांत शिंदे यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलेच बरसले.

“जेव्हा यांना 2014 मध्ये लोकसभेसाठी उमेदवार सापडत नव्हता, जेव्हा शिवसेनेचा खासदार पक्ष सोडून गेला तेव्हा ही कल्याण लोकसभेची जागा कशी निवडून येईल? असा मोठा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला होता. त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठलाही विचार न करता मला उभं केलं, त्यावेळी खूप कठीण परिस्थितीत निवडणूक लढलो, आपण सर्व त्याचे साक्षीदार आहोत. तेव्हा यांना कुठला उमेदवार मिळाला नव्हता. तेव्हा विचार केला नाही की, आपल्या घरातला कुणालातरी उभं केलं पाहिजे किंवा प्रचाराला ताकद लावली पाहिजे”, असा घणाघात श्रीकांत शिंदे यांनी केला.

‘घराणेशाही नाही तर पक्षाला जेव्हा गरज लागली तेव्हा…’

“मला वाटतं २०१४ ची निवडणूक झाली. त्यावेळी अडीच लाख मतांच्या फरकाने लोकांनी निवडून दिलं. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत साडेतीन लाखांच्या मतांच्या फरकाने लोकांनी निवडून दिलं. आता २०२४ येतंय. तेव्हा तुम्ही काउंट करा की, किती लाखांच्या फरकाने लोकं निवडून देतील. आमच्याकडे घराणेशाही नाही तर पक्षाला जेव्हा गरज लागली तेव्हा विपरीत परिस्थितीत आम्ही पक्षाच्या बाजूने उभं राहिलो. विपरीत परिस्थितीत आम्ही कल्याण लोकसभेत निवडून आलो”, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.

‘घराणेशाहीवर बोलायचं झालं तर…’

“घराणेशाहीवर बोलायचं झालं तर वरळीची जागा स्वत:च्या मुलासाठी जिंकता आली पाहिजे यासाठी दोन सिटींग आमदारांचा बळी घेतला, जे जिंकून आली असते. स्वत:चा मुलगा निवडून आला पाहिजे म्हणून दोघांसोबत कॉम्प्रमाईज केलं, मुलगा निवडून आल्यानंतर मग दोघांना एमएलसी दिलं. ज्या ठिकाणी कार्यकर्ता आला असता. मुलगा निवडून यायला हवा म्हणून केंद्रातही त्याच मतदारसंघाच्या नेत्याला मंत्रीपद दिलं. हे काय म्हणणार? घरामध्येच सगळी पदं द्यायची, पक्षप्रमुख पद घरी, युवासेनाप्रमुख पद घरीच, परत आजूबाजूचे नातेवाईकपण घरी”, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली.

‘ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही’

“अशा गोष्टी पक्षात नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज देखील कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. ते मुख्य नेताची जबाबदारी सांभाळत आहेत. ते मला कधीच कोणत्या प्रमुखाचं पद देणार नाहीत आणि मी घेणार नाही. लोकसभेत आज राहुल शेवाळे नेतृत्व करत आहेत. श्रीरंग आप्पा बारणे यांना पीठासीन अधिकारी झाले. सर्व ज्येष्ठ नेते पक्षाचं काम करत आहेत. ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही”, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us