मराठी शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी वसई-विरार महापालिकेकडून बसची सोय, बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
परिवहन समितीची गुरुवारी (7 ऑक्टोबर) बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत नव्या मार्गावर चर्चा झाली. तसेच मोफत शालेय बस योजना सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
वसई : वसई-विरार शहर महानगरपालिका परिवहन सेवा अनेक मार्गांवर जवळपास 1 लाख प्रवाशांना प्रवास देते. पण गेल्या काही काळात शासनाच्या निर्देशानुसार कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता भारतातील सर्व सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर शासनाच्या निर्देशान्वये परिवहन सेवा 5 जानेवारी 2021 पासून मे.एस.एन.एन. (भागीदारी संस्था) या अभिकर्त्यामार्फत BOOM (Buy, Own, Operate & Maintain) बेसिसवर रॉयल्टी तत्वावर पूर्वरत करण्यात आलेली आहे. दरम्यान, परिवहन समितीची गुरुवारी (7 ऑक्टोबर) बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत नव्या मार्गावर चर्चा झाली. तसेच मोफत शालेय बस योजना सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. संबंधित बैठकीत सभापती प्रतिशे पाटील यांच्यासह सर्व परिवहन समितीचे सदस्य उपस्थित होते.
परिवहन समितीने घेतलेले महत्त्वाचे निर्णय :
1) वसई-विरार शहर महानगरपालिका परिवहन सेवेत (इंग्रजी माध्यम वगळून) सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी 7 ऑक्टोबरपासून शालेय फेऱ्या संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून मागणी आल्यानंतर त्वरित चालू करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले.
2) वसई-विरार शहर महानगरपालिका परिवहन सेवेत नालासोपारा ते कळंब, विरार (प.) ते नवापुर, विरार (प.) ते अंबाडी, वसई(प.) ते पाचूबंदर या मार्गांवर आजपासून बससेवा सुरु करण्याबाबत निर्णय झाला.
3) वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील परिवहन सेवेमार्फत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, कर्करोग पिडीत आणि रक्तशुद्धीकरण (डायलेसीस) करुन घेणाऱ्या नागरिकांना मोफत परिवहन सेवा देण्यात येते. त्याचा आढावा घेण्यात आला.
4) ज्या मुलांचे आई-वडील कोव्हीड-19 आजारामुळे मृत पावलेले आहेत, जी मुले महानगरपालिकेच्या बेघर हाऊसमध्ये वास्तव्यास असून अनाथ आहेत, शहरातील ज्यांचे आई-वडील हयात नाहीत अशी अनाथ मुले व कुटुंबातील कमावणारी व्यक्ती ज्यात आई किंवा वडील यांपैकी कोणीही मृत पावल्यास (उर्वरित पालन पोषण करणारी व्यक्ती कमविती नसेल तर) अशा सर्व मुलांना शिक्षण पूर्ण होईपर्यंत परिवहन सेवेमध्ये मोफत प्रवास सुविधा देण्यात येणार आहेत.
5) आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या म्हणण्याप्रमाणे पुढील काळात ग्रामीण भागाला शहरी भागाशी जोडण्याच्या मार्गांवर परिवहन सेवेचे नवीन मार्ग चालू करण्यात येतील.
शहरात रस्ते दुरुस्तीची कामे करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध ठाणे महानगरपालिकेची कडक कारवाई
दुसरीकडे ठाण्यात शहरातील रस्त्यांचे निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध कडक कारवाई केली आहे. राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील रस्ते दुरुस्तीची कामे करणाऱ्या मे. बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि या ठेकेदारास पावसाळ्यात रस्ता वाहतूक योग्य न राखल्यामुळे तसेच गुणवत्तापूर्ण काम न केल्याप्रकरणी 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी दिली आहे.
हेही वाचा :