विधान परिषद जागा वाटपाचा तिढा कायम असतानाच शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; पहिल्या उमेदवाराने अर्ज केला दाखल
राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अजूनही महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये. शिवसेना शिंदे गट 6 जागांच्या मागणीवर ठाम आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 1 जून आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. मात्र अजूनही महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये. अशा काही विधान परिषदेच्या जागा आहेत, जिथे दोन्ही पक्षांकडून भाजप आणि शिवसेनेकडून दावा करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गट अजूनही 6 जागांवर ठाम आहे, तर भाजपने चार जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान अजूनही जागा वाटपाचा तिढा कायम असताना आता सोलापुरातून मोठी बातमी समोर आली आहे.
महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा कायम असताना आणि जागा वाटप निश्चित झालेलं नसताना देखील शिवसेना शिंदे गटाचे नेते रमेश बारसकर यांनी विधान परिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज्यात शिवसेना-भाजप राष्ट्रवादीची महायुती आहे. मात्र सोलापुरात शिवसेनेला विश्वासात घेतले जात नाही, निधी देखील दिला जात नाही. असा आरोपही यावेळी रमेश बारसकर यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले रमेश बारसकर ?
निवडणूक ही लोकशाहीचा उत्सव आणि जत्रा आहे. त्यात कार्यकर्त्याने सहभाग घेणे कर्तव्य आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र अंतिम निर्णय एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचाच असेल. राज्यात शिवसेना-भाजप राष्ट्रवादीची महायुती आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला विश्वासात घेतले जात नाही, निधी देखील दिला जात नाही. कोणत्याही प्रकारचे प्रतिनिधी नेमताना विश्वासात घेतले जात नाही. आम्हाला वेगळेपणाची वागणूक दिली जाते असा आरोप यावेळी बारसकर यांनी केला आहे.
महाविकास आघाडी सर्व जागा लढवणार
दरम्यान दुसरीकडे महाविकास आघाडीकडून देखील सर्व 17 जागांवर आपले उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार आहे.