मोठी बातमी! पवना नदीत बुडून तीन तरुणांचा मृत्यू, पुणे हादरलं
उन्हाळ्याची सुट्टी आणि विकेंडच्या निमित्ताने मावळ परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील तीन तरुणांचा पवना नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मावळ तालुक्यातील थूगाव परिसरात ही घटना घडली आहे.

मोठी बातमी समोर येत आहे. उन्हाळ्याची सुट्टी आणि विकेंडच्या निमित्ताने मावळ परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील तीन तरुणांचा पवना नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मावळ तालुक्यातील थूगाव परिसरातील पवना नदी पात्रात ही घटना घडली आहे. प्रथमेश शिंदे, अश्विन भालेराव आणि आयान शेख अशी मृत तरुणांची नावं आहेत. हे तिघेही पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. याचदरम्यान ही घटना घडली आहे. सध्या वाढत असलेल्या उकाड्यामुळे त्यांना नदीच्या पात्रात पोहण्याचा मोह झाला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, शिवदुर्ग मित्र मंडळ यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केलं. मात्र या तरुणांना वाचवण्यात यश आलं नाही. या दुर्दैवी घटनेत या तिघांचाही मृत्यू झाला आहे, त्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. पर्यटनासाठी आलेल्या या तरुणांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे नदी-नाल्यात पोहताना पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी, असं आवाहन या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, विकेंड असल्यामुळे हे तरुण मावळ परिसरात फिरण्यासाठी आले होते. मात्र तिथे आपल्यासोबत काय घडणार आहे, याची थोडी सुद्धा कल्पना या तरुणांना नव्हती. कडाक्याच्या उन्हामुळे त्यांना नदीच्या पाण्यात पोहोण्याचा मोह झाला आणि इथेच मोठा घात झाला. हे तरुण नदीत उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. घटना लक्षात आल्यानंतर घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आलं. मात्र त्यांना वाचवण्यात अपयश आलं. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबईत तीन मुलांना बुडताना वाचवलं
दरम्यान दुसरीकडे मुंबईतून देखील अशीच एक घटना समोर आली आहे. मुंबईतील अक्सा चौपाटीवर शाळेला सुट्टी लागल्यानंतर तीन मुलं समुद्रात अंघोळीसाठी गेली होती, मात्र ही मुलं अचानक बुडू लागली, ही घटना लक्षात येताच जीवरक्षक नथुराम सूर्यवंशी आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं, या मुलांना वाचवण्यात यश आलं आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशा घटनांमध्ये राज्यात दिवसे नं दिवस मोठी वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे.
