Sanjay Raut : ‘पाच मिनिटात बॉडी गायब होते’, संजय राऊतांचा महाराष्ट्राला हादरवून सोडणारा गौप्यस्फोट, गडचिरोलीत नेमकं काय घडतय?
Sanjay Raut : "सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला तर आई-वडिलांना खांद्यावर टाकून ते प्रेत घरापर्यंत न्यावं लागतं. हे आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे आहेत. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस कसल्या विकासाच्या गोष्टी करताय तुम्ही, कोणाला मूर्ख बनवता?" अशी टीका संजय राऊत यांनी केली.

गडचिरोली जिल्ह्यातील आश्रम शाळेत काल तीन मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. तीन मुलींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.याच मुद्यावरुन आज खासदार संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरलं. सर्पदंशाने विद्यार्थिनीच्या झालेल्या मृत्यूवर बोलताना संजय राऊत यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला. “भाजपचे जे मोठे देणगीदार आहेत, त्यांनी गडचिरोलीतली जंगलं तोडली. गडचिरोलीतल्या नद्या प्रदूषित केल्या, डोंगर तोडले, त्यामुळे जल, जमीन, जंगल ही आदिवासींची जी घोषणा होती, आम्ही याचे मालक आहोत, तो आदिवासी विस्थापित झाला. डोंगरावरचे वाघ, बिबटे, जंगली प्राणी, साप हे आदिवासींच्या शाळांमध्ये, घरांमध्ये घुसून आदिवासींचे बळी घेतायत. तुम्ही गडचिरोलीतला नक्षलवाद संपवला म्हणता म्हणून आदिवासींचे मृत्यू थांबलेले नाहीत” असा दावा संजय राऊत यांनी केला. “गडचिरोलीचा कसला विकास करताय तुम्ही, आदिवासींना उपचार मिळत नाहीत आणि गडचिरोलीला स्टील सिटी करायला निघालेत. तीन विद्यार्थीनीच्या मृत्यूवर राज्य सरकार हळहळत नसेल, तर या सारखं निदर्यी सरकार नाही” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“या राज्यातल्या सरकारी शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा यांची अवस्था बघा. मी आश्रम शाळेविषयी बोलतोय. काय मिळतं तुमच्या विकासामुळे?. गडचिरोलीतला खाण उद्योग आहे, हजारो, लाखो वाहनं चालतात. आतापर्यंत 150 आदिवासी त्या वाहनाखाली चिरडून मेलेत. एफआयआर नको म्हणून त्यांचे मृतदेह गायब केले जातात. रक्ताचं थारोळं साचतं. एखाद्या आदिवासीची बॉडी पाच मिनिटात हलवली जाते. पाण्याचे फवारे मारुन लगेच रक्त साफ केलं जातं. असे आतापर्यंत 1500 लोक मेलेत” असा हादरवून सोडणारा गौफ्यस्फोट संजय राऊत यांनी केला.
मला सांगा यासाठी विकास हवाय का तुम्हाला?
“दीड ते एक वर्षातला आकडा आहे. खाण मालकाच्या दबावाखाली जिल्ह्याचा कलेक्टर याची कुठली नोंद ठेवत नाही. 1500 लोक मेलेत. मुख्यमंत्री काय करतायत? आदिवासी विकास मंत्री काय करतायत? मला सांगा यासाठी विकास हवाय का तुम्हाला? आदिवासींना काय मिळतय? विस्थापित केलय तुम्ही, कसला रोजगार आणताय? किती रोजगार मिळालाय तिथे? भाजपने त्यांच्या देणगीदारांना गडचिरोलीतली जंगलं, नद्या उद्धवस्त करायला दिलेत. ज्या तीन मुलींचा मृत्यू झाला तो रेकॉर्डवर आहे” असं राऊत म्हणाले.
फडणवीस कसल्या विकासाच्या गोष्टी करताय तुम्ही
“आश्रम शाळांना निधी दिला जातो, कुठे जातो तो, कोण खातं, कोणाचे लोक आहेत?” असे प्रश्न राऊतांनी विचारले. “ही सर्पदंशाची घटना समोर आली. पण आतापर्यंत असंख्या मुलं-मुली, विंचू, साप चावल्याने मरण पावली आहेत. आदिवासी पाड्यांवर रुग्णवाहिका नाहीत. झोळीतून रुग्णांना, प्रेत न्यावी लागतायत” या भीषण वास्तवाकडे राऊत यांनी लक्ष वेधलं.