
गुरूवार , 12 जून रोजी अहमदाबद येथे एअर इंडियाचं विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत 270 जणांचा मृतदेह सापडले असून त्यामध्ये विमानातील प्रवासी तसेच मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांचाही समावेश आहे. दरम्यान दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅकबॉक्स हॉटेलच्या छतावर सापडला असून तसेच विमानाचा ELT इमर्जन्सी लोकेटर ट्रान्समीटरही सापडल्याची अधिकृत माहिती एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोतर्फे देण्यात आली आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना इराणनेही तेल अवीवर क्षेपणास्त्रांचा मारा करत जोरदार हल्ला केला असून काही नागरिक जखमी झाले आहेत. भायखळा स्थानक परिसरात पोलिसांच्या गाडीवर झाड कोसळले मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. भायखळा पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळ बागेत उभं असलेलं झाड पहाटे मुळासकट कोसळलं. यासह महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन यासह सर्व क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
मुंबई शहरात पावसाला सुरुवात
सकाळपासून होतं ढगाळ वातावरण
पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
रायगड आणि ठाणे जिल्ह्याला उद्या ऑरेंज अलर्ट
भुजबळांपाठोपाठ आमदार देवयानी फरांदे यांची देखील महापालिका आणि पोलीस प्रशासनावर नाराजी
नाशिकमधील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाला महापालिका आणि पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप
महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच शहरात वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाची समस्या – फरांदे
इगतपुरी तालुक्यातील आहुर्ली जवळ कारचा भीषण अपघात
कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात
अनियंत्रीत कारच्या शेतात घुसून चार पलट्या
अपघातात सहा ते सात जण जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक
जखमींना उपचारासाठी केलं रुग्णालयात दाखल
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे अहमदाबादला पोहोचले आहेत. जिथे ते ट्रॉमा सेंटरला भेट देऊन विमान अपघातात जखमी झालेल्यांची भेट घेत आहेत. यानंतर मल्लिकार्जुन खरगे देखील अपघातस्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी करतील.
अहमदाबाद अपघातस्थळी आणखी एक मृतदेह सापडला आहे. तो विमानाच्या मागील बाजूस अडकला होता. एनडीआरएफ आणि स्थानिक पोलिस अजूनही ढिगाऱ्यांचा तपास करत आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या त्यांच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक उद्या दुपारी 12 वाजता मुंबईतील शिवसेना भवनात होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे पुत्र आणि नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत, पक्षाचे यूबीटी खासदार, आमदार आणि इतर प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीची रणनीती ठरवणे हा या बैठकीचा मुख्य अजेंडा आहे
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025 स्पर्धेत नवा इतिहास रचला गेला आहे. लॉर्ड्सवर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद पटकावले. दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जेतेपद जिंकणारा तिसरा संघ बनला आहे.
भिवंडीमध्ये केमिकलच्या गोदामाला भीषण आग
भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील प्रितेश कॉम्प्लेक्समधील केमिकलच्या गोदामाला भीषण आग
आगीचे कारण अस्पष्ट, अग्निशामक दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल
गोदामामध्ये केमीकलची साठव केल्याची माहिती
ठाणे : दिवा येथे पार्क केलेल्या चारचाकी वाहनांस लागली अचानकपणे आग
कोणालाही दुखापत नाही
पूर्णतः चारचाकी गाडी जळून खाक
घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अग्निशमन दलाच्या मदतीने पूर्णतः आग विझवण्यात आली….
शेतकऱ्यांविषयी महिलांविषयी आणि गरिबांविषयी आमच्या मनामध्ये प्रेम आहे, म्हणूनच आम्हाला सरकारमध्ये बसवलं आहे असे मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
बच्चू कडू यांचे उपोषण आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले आहे, पुन्हा 2 ऑक्टोंबर पासून आंदोलन करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
अहमदाबाद विमान अपघातात जिनल गोसाई आणि वैभव पटेल नावाच्या जोडप्याचा मृत्यू झाला. पण तो सोबत घेऊन जात असलेल्या लाडू गोपाळाच्या मूर्तीला कोणतेही नुकसान झालेले नाही. प्रेमविवाहानंतर दीड वर्षांपूर्वी जिनल आणि वैभव लंडनला गेले होते.
16 तारखेपासून पाणी त्याग करण्याची माझी मानसिकता असल्याचे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू म्हणाले. तब्येत खालावत आहे, सरकार निर्णय घ्यायला वेळ लागत आहे, त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्ते कमी पडणार नाहीत. भावनिक होऊन कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. त्यांनी गोंधळ करू नये असे आवाहन कडू यांनी केले.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांना सत्तेचे वेध लागले आहे. आमदार अस्वस्थ आहे. त्यामुळे ते सत्तेत जाण्यासाठी आग्रही मागणी करत आहेत. तर दुसरीकडे खासदार शरद पवार यांच्या पाठीशी आहेत. पवारांनी भाजपाशी युती नको, अशी भूमिका घेतली आहे.
मराठी नेत्यांनी एकत्र यावं असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले. युतीसाठी आम्ही अजूनही आशावादी असल्याचे राऊत म्हणाले.
पुण्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात गोंधळ उडाला. बच्चू कडू यांच्या उपोषणावरून आंदोलनकर्ते आक्रमक झालेले दिसले. अजितदादांनी त्यांना मुख्यमंत्री आणि कडू यांच्यातील संवादाची माहिती दिली.
भाजपासोबत जाण्यास शरद पवार तयार नसल्याचे समोर येत आहे. भाजपासोबत युती करायची नाही असे पवारांचे मत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कुटुंबातील लोकांनी प्रशासन आणि माध्यमांवर आपला राग व्यक्त केला. मृतासाठी मुंबईहून अहमदाबादला पोहोचलेले मुस्लिम कुटुंब संतप्त आहे. ते म्हणतात की आम्ही २ दिवसांपासून अहमदाबादमध्ये आहोत पण आम्हाला अद्याप मृतदेहाची ओळख पटवता आलेली नाही. जावेद अली त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसह मुंबईहून लंडनला जाणाऱ्या विमानाने प्रवास करत होते पण गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर त्यांची विमान प्रतीक्षा यादीत होती. या घटनेत जावेद अलीसोबत त्यांची पत्नी आणि मुलांचाही मृत्यू झाला.
जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रम शुभारंभ कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गणेश कला क्रीडा येथे उपस्थितीत… शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून पुणे जिल्ह्यातील ३०३ केंद्रांमधील ३०३ शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे… या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री दादा भुसे उपस्थितीत… पुण्यातील स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे…
मंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल… शहरातील मुख्य चौक असलेल्या मुंबई नाका परिसरातील अतिक्रमण आणि विद्रूपी करणावरून भुजबळ आक्रमक… सांगून देखील अधिकारी ऐकत नसल्याने भुजबळांनी अधिकाऱ्यांना झापले… मंत्री छगन भुजबळांकडून नाशिकच्या द्वारका सर्कलची पाहणी… शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी द्वारका सर्कल कमी करण्याची सुरू आहे काम… या पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांना भुजबळ यांनी धरले धारेवर… द्वारका सर्कलमुळे गेल्या दिवसापासून होत आहे वाहतूक कोंडी…
बीडमध्ये जून महिन्यातच 11 प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. मान्सून पूर्व झालेल्या पावसानं बीडकरांची तहान भागली आहे. मे महिन्यात जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे वर्षभराची पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता आहे.
पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने मंदिर परिसरातील कॉरिडरला बाधितांचा पाठिंबा आहे की विरोध आहे हे पाहण्यासाठी आज मतदान घेतले जात आहे. त्या मतदानास सुरुवात झाली आहे.
बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आज सात दिवस पूर्ण झाले आहे. सात दिवसांपासून पोटात अन्नाचा एकही कण नसल्याने बच्चू कडू यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. बच्चू कडू यांच्या प्रकृतीबाबत तिवसा ग्रामीण रुग्णालयाचा अहवाल आला आहे.
धाराशिव – बार्शी येथील व्यापाऱ्याकडून वाशी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला 13 लाखांचा गंडा घालण्यात आला.
धाराशिवच्या वाशी तालुक्यातील सोनारवाडी गावातील शेतकऱ्यांची व्यापाऱ्याकडून फसवणूक झाली. बार्शी येथील व्यापारी संदीप भाऊराव मोरे व मन्नत रामलिंग तोडकरी या दोघांविरुद्ध येरमाळा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बार्शी येथील व्यापाऱ्याकडून वाशी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला 13 लाख रुपयाला गंडा घातला आहे. धाराशिवच्या वाशी तालुक्यातील सोनारवाडी गावातील शेतकऱ्यांची व्यापाऱ्याने फसवणूक केली आहे.
सोलापूर – पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील अरळी गावचा पूल वाहून गेला. पूल वाहून गेल्याने गावकऱ्यांचे वाहत्या पाण्यात आंदोलन सुरू आहे.
सर्वत्र पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बोरी नदीतून प्रचंड प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे अरळी-दर्शनाळ-मुस्ती मार्गावरील पुलाचा भराव वाहून गेल्याने गावच्या सरपंच, उपसरपंचासह स्थानिकांनी भर पाण्यात उतरून आंदोलन केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केंद्रीय गट अध्यक्ष समिती स्थापन केली. या समितीमध्ये बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, कर्णबाळा दुनबळे व इतर 180 लोक आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही समिती कार्य करणार आणि पक्ष बांधणी करणार आहे,
नागपूरच्या भिवापूर येथे लग्नातील जेवणातून 100 जणांना विषबाधा झाली आहे. लग्नातून जेवण करून घरी आल्यानंतर त्रास झाल्याची माहिती समोर येत आहे. 100 पैकी 32 जणांवर उमरेडमध्ये उपचार सुरू आहेत, इतरांची प्रकृती स्थिर आहे.
या घटनेनंतर लग्नातील जेवणासह पाण्याचे नमुने हे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
अमरावती – बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा सातवा दिवस असून आंदोलन स्थळी 200 पेक्षा अधिक पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे.
अन्नत्याग आंदोलन स्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून बच्चू कडू आज काय भूमिका घेणाऱ्याकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. दरम्यान मंत्री उदय सामंत हे आज बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत.
भायखळा पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळ बागेत उभं असलेलं झाड पहाटे मुळासकट थेट पोलिसांच्या वाहनावर पडलं, मात्र लोखंडी गेट आणि जाळ्यांमुळे मोठं नुकसान टळलं. घटनास्थळी गर्दी नसल्याने जीवितहानी झाली नाही; मात्र गर्दीच्या वेळेस झाड पडलं असता तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
पोलीस आणि प्रवाशांनी झाड पडल्याची माहिती अग्निशामक दलाला दिली असून थोड्या वेळातच अग्निशामक दलाकडून झाड हटवण्याचे काम सुरू होणार आहे.
अहमदाबद येथे एअर इंडियाचं विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत 270 जणांचा मृतदेह सापडले असून त्यामध्ये विमानातील प्रवासी तसेच मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांचाही समावेश आहे. दरम्यान दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅकबॉक्स हॉटेलच्या छतावर सापडला आहे.