मनोज जरांगेंचा मुंबईत येण्याचा इशारा, उदय सामंत यांचं मोठं विधान, म्हणाले 12 तारखेच्या आधीच…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरूच आहे. त्यांच्या उपोषणाचा आज 13 दिवस असून, त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे आता आरक्ष मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी देखील हालचाली सुरू झाल्याचं दिसून येत आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज 13 वा दिवस आहे. दरम्यान येत्या 12 सप्टेंबरनंतर आम्ही मुंबईत येणार असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या इशाऱ्यानंतर आता सरकारचं टेन्शन वाढलं आहे. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं, यासाठी सरकार दरबारी हालचालींना वेग आला आहे. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, ते नंदुरबारमध्ये बोलत होते.
नेमकं काय म्हणाले उदय सामंत?
मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही कुठेही कमी पडत नाही आहोत. ही जी आम्ही मेहनत घेत आहोत, ती मार्ग काढण्यासाठीच घेत आहोत. आम्ही मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्या पूर्ण करत आहोत. मात्र हे करत असताना कोणाच्याही ताटातील कोणालाही देणार नाही. ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही, याची दक्षता महायुती सरकार घेत आहे, असं यावेळी सामंत यांनी म्हटलं आहे. दरम्यान सध्या दिले जाणारे प्रमाणपत्र कुठेही ओबीसीच्या वाट्याचे दिले जात नाहीये. निजामाची सत्ता असताना ज्या नोंदी मराठा कुणबी मिळाल्या नव्हत्या, त्या शिंदे समितीने शोधून काढल्या आणि त्यांना आपण प्रमाणपत्र देत आहोत, असंही ते यावेळी म्हणाले.
मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये येणार आहेत, त्यांनी आरक्षणावर मार्ग न निघाल्यास येत्या 12 सप्टेंबरनंतर मुंबईत येण्याचा इशारा दिला आहे, यावर देखील उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 12 सप्टेंबर कशाला, त्याच्या अगोदरच आम्ही मनोज जरांगे पाटील यांचं उपोष थाबंवण्याचा प्रयत्न करू. आम्ही शासनाच्या वतीने विनंती करतो की, जरांगेंनी उपोषण थांबवावे. राज्यात गणेशोत्सव आणि इतर सण-उत्सवात नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी आंदोलनकर्त्यांनी आणि मनोज दादांनी काळजी घेतली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे, असं यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
