
राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने विजय मिळवला आहे. मुंबईत भाजपला 89 आणि शिवसेनेला 29 जागा मिळाल्या आहेत. तर ठाकरे बंधुंना 71 आणि काँग्रेसला 24 जागा मिळाल्या आहेत. तर इतर आणि अपक्षांचा आकडा 12 इतका आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेत महायुतीचा हिंदू मराठी महापौर बसणार आहे. या निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे यांनी युती केली होती. मात्र या युतीचा फारसा प्रभाव निकालावर झालेला नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 65 जागा मिळाल्या आहेत. यामुळे ठाकरेंच्या हातातून मुंबईची सत्ता निसटली आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या निकालावर भाष्य केले आहे.
उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत मतदारांचे आभार मानले. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने कागदावरती शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाहीत हे कालच्या मुंबई महापालिकेच्या आणि राज्यातील इतर निकालांनी दाखवून दिलं आहे. भारतीय जनता पक्ष हा कागदावरती आहे, पण जमिनीवरती नाहीये. तो जर जमिनीवर असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते. त्यांना पुसली जाणारी शाई वापरावी लागली नसती. यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता. नियम बदलावे लागले नसते.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज देखील साधे साधे शिवसैनिक जे निवडून आलेले आहेत, ते साधे आहेत. प्रचंड पैशाच्या धबधब्यासमोर निष्ठा कशी कशी लढू शकते आणि जिंकू शकते हे या शिवसैनिकांनी दाखवले आहे. मी सर्व मुंबईकरांना खास धन्यवाद देतो. मला मुंबईकरांकडून आणखी अपेक्षा नक्कीच होती. 25 वर्षे आम्ही जी काही सेवा केली, सुधारणा केल्या, त्या आम्ही सर्वांसमोर ठेवलेल्या होत्या. कोविड काळात जे काही काम केले त्या मुंबई मॉडेलची जगभरात प्रशंसा झाली. हे सगळं पाहिल्यानंतर असं आम्हाला वाटलं होतं की मुंबईकर अधिक आशीर्वाद आम्हाला देतील. आता मोठ्या प्रमाणावर आशीर्वाद जरी दिले नसले तरी जे दिलेत ते भरपूर दिले आहेत असं विधानही उद्धव ठाकरेंनी केले आहे.