संविधानाला हात लावाल तर देश पेटल्याशिवाय राहणार नाही; उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तेव्हाचा जनसंघ नव्हता. माझे आजोबा या लढ्याचे अग्रणी होते. माझे काका श्रीकांत ठाकरे आजोबांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते. हा 60-65 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. जनसंघ संयुक्त महाराष्ट्र कृती समितीत समील झाला. कशासाठी? मिळेल ते घेण्यासाठी. निवडणूक लढायची वेळ आली तेव्हा जनसंघाने आता सारखा जागा वाटपावरून घोळ करून समिती फोडली. समिती फोडण्याचं पाप त्यांनी केलं, असा घणाघाती हल्ला उद्धव ठाकरे यांनी केला.

संविधानाला हात लावाल तर देश पेटल्याशिवाय राहणार नाही; उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा
उद्धव ठाकरे
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 30, 2024 | 8:58 PM

भाजपच्या नेत्यांनी संविधान बदलणार असल्याचं जाहीर विधान केलं आहे. या विधानाचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर समाचार घेतला. घटना बदलण्यासाठी त्यांना बहुमत हवं आहे. महाराष्ट्राच्या सुपुत्राने, दलित कुटुंबात जन्मलेल्या माणसाने म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ही घटना लिहिली आहे. तेच भाजपला खूपत आहे. हा दलित समाजात जन्मलेला माणूस बुद्धिमान कसा असू शकतो? असं त्यांना वाटत आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळे गोमूत्रधारी हिंदुत्वावाद्यांच्या पोटात मुरडा आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सुपुत्राने लढलेली घटना त्यांना बदलायची आहे. त्यांना महाराष्ट्राचा द्वेष आहे. याद राखा. तुम्हाला जाहीर इशारा देतो. घटनेला हात लावाल तर देश पेटल्याशिवाय राहणार नाही. हिंमत असेल तर घटना बदलण्याची तयारी करून दाखवाच, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला.

शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजवर जोरदार हल्ला चढवला. भाजपने 10 वर्षात आरक्षण दिले का नाही? कोर्टाने दिल्लीच्या अधिकाराबाबत केजरीवालांच्या बाजूने निकाल दिला. पण भाजपने लोकसभेत बिल आणलं आणि कोर्टाचा निर्णय बदलला. जर तुम्ही कोर्टाचा निर्णय बदलण्यासाठी विधेयक आणू शकता तर धनगर आणि मराठा समाजाला आरक्षणासाठी असं का केलं नाही? त्यांना आरक्षण का दिलं नाही? तुम्ही आरक्षणाचं विधेयक आणा आम्ही पाठिंबा देतो म्हणून सांगितलं. पण तरीही यांनी काहीच केलं नाही, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

भवानी मातेच्या मंदिरात का गेला नाही?

नरेंद्र मोदी धाराशीवला म्हणजे त्यांच्या भाषेत उस्मानाबादला आले होते. मी मोदींना आवाहन आणि आव्हान करतो. शिवसेनेचं मशाल गीत आहे. त्यात एक घोषणा आहे. जय भवानी, जय शिवाजी. या घोषणा आपण सर्रासपणे देतो. निवडणूक आयोगाने जय भवानी शिवाजी हे शब्द काढायला सांगितले. पण हे शब्द म्हणजे आमचा आत्मा आहे. बिन आत्म्याची ही शरीर भटकत आहेत. त्यांना कशाची चाड नाही. मोदी नाटकं करून आले. तुम्हाला जय भवानीचा मत्सर का? धाराशीवमध्ये येऊन तुम्ही तुळजा भवानीचं दर्शन का घेतलं नाही? देवेंद्र फडणवीसही कधी तुळजा भवानीच्या मंदिरात गेले नाही. तुमचा महाराष्ट्र द्वेष एवढा कसा गेला? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

मोदी म्हणतात रेवन्नाचे हात बळकट करा

कर्नाटकात देवेगौडाचा नातू प्रज्वल रेवन्नाचं सेक्स स्कँडल आलं आहे. मोदी त्याचा प्रचार करत आहेत. रेवन्नाचे हात बळकट करा म्हणून सांगत आहेत. कशाला? आणखी फिल्म काढायला. ही यांची नीती. म्हणून मी यांना भेकड… भाकड जनता पार्टी म्हणतो. मुद्दाम बोलतो. यांनी कोणता विचार दिला नाही. कोणताही आदर्श निर्माण केला नाही. यांनी नेता दिला नाही, विचार दिला नाही. हे स्वातंत्र्य लढ्यात नव्हते, असा हल्लाच त्यांनी चढवला.

Follow Us