आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीतील नेत्यांना दोन सवाल, बैठकीत काय काय घडलं?
Uddhav Thackeray : आज महाविकास आघाडीकडून आमदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना काय मार्गदर्शन केले याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळाल्या आहेत. अनेक नेत्यांनी पक्षांतर केले. अलिकडेच शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आज महाविकास आघाडीकडून आमदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला 59 पैकी केवळ 35 आमदार उपस्थित होते. अशातच आता या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना काय मार्गदर्शन केले याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
उद्धव ठाकरेंचे दोन सवाल
आज उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक पार पडली. यावेळी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, ‘महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत म्हणतो, पण आपण खरंच एकत्र आहोत का? आपण एकत्रित मुद्दे मांडतो का? असे दोन प्रश्न उपस्थित केले. यापुढे एकत्र राहूनच काम करावं लागेल असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
एकी दिसली पाहिजे – ठाकरे
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, येणाऱ्या काळात विधिमंडळ अधिवेशनात सुद्धा महाविकास आघाडी म्हणून एकी विरोधक म्हणून आपण दाखवली पाहिजे. सोबतच राज्यभरातील सभा, बैठका, आंदोलने सुद्धा एकत्रित करायला हवी आणि आपली एकी राज्यभर दिसायला हवी असे मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले आहे. मात्र आजच्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांच्या फुटीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहितीही समोर आली आहे.
24 आमदारांची दांडी
महाविकास आघाडीच्या एकूण 59 आमदारांपैकी 35 आमदार आजच्या बैठकीला उपस्थित होते. तर 24 आमदारांनी या बैठकीला दांडी मारली आहे. बैठकीला गैरहजर असणाऱ्या आमदारांमध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, अमित देशमुख, रोहित पवार, अभिजीत पाटील, विकास ठाकरे, संदीप क्षीरसागर, जयंत पाटील या बड्या नेत्यांचा समावेश आहे. या आमदारांच्या अनुपस्थितीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.