तुम्ही त्यांच्या मृत्यूचा उत्सव केला की काय?; मोदींच्या रोड शोवर उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

अटलबिहारींचा पराभव झाला होता. दोनच खासदार भाजपचे होते. पुन्हा 302 वरून 2 झाले तर काय करतील भाजपवाले? यांना कुठे विलीन व्हायला पक्षही राहणार नाही. यांना कोणीही घेणार नाही. हे दगाबाज आहेत. घरात घुसले तर आग लावून पळतात बाहेर, असा घणाघाती हल्ला उद्धव ठाकरे यांनी भाजपवर चढवला.

तुम्ही त्यांच्या मृत्यूचा उत्सव केला की काय?; मोदींच्या रोड शोवर उद्धव ठाकरे यांची सडकून टीका
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 16, 2024 | 7:49 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल मुंबईच्या घाटकोपरमध्ये रोड शो झाला. या रोड शोला प्रचंड गर्दी झाली होती. ढोलताशे वाजवून यावेळी मोदींचं जोरदार स्वागत करण्यात आलं. मोदींच्या या रोड शोवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. दोन दिवसांपूर्वीच घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना घडली. त्यात अनेक लोक मृत्यूमुखी पडले. अन् तुम्ही रोड शो केला? तुम्ही त्यांच्या मृत्यूचा उत्सव केला की काय?; अशा खोचक शब्दात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीव्ही9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांना विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तसेच मोदींच्या रोड शोवर अत्यंत कठोर शब्दात टीका केली. कालच्या रोड शोबद्दल होणं ही वेदनादायी गोष्ट आहे. त्या परिसरात होर्डिंग पडून लोक मृत्यूमुखी पडली. तरीही त्यांनी वाजत गाजत रोड शो केला. ढोलताशा बडवत रॅली काढली. तुम्ही त्यांच्या मृत्यूचा उत्सव केला की काय? किती लोकांना तुम्ही अडवलं…? लोकं वैतागले. मेट्रो बंद करून टाकल्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

एकाधिकारशाही बंद केली पाहिजे

शिवसेनाप्रमुख म्हणायचे, निवडणुका आल्यावर पंतप्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे. कारण त्यांना निवडणुकीच्या काळात सोयी सुविधा दिल्या जातात. त्यांचे चोचले पुरवले जातात. आमचा रोड शो असल्यावर आम्हाला वाहतुकीतून जावं लागतं. ते अयोग्य आहे. लोकांची गैरसोय होते. त्याबद्दल माफी मागतो. पण काल तर मेट्रोच बंद करून टाकली. कल्याणमध्ये त्यांची सभा होती. तिथे अघोषित बंदच होता. नाशिकमध्ये येताना कमर्शिअल फ्लाईट बंद केल्या. हा काय प्रकार आहे? ही एकाधिकारशाही बंद केली पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

नितीशकुमार, चंद्राबाबू हिंदुत्ववादी आहेत काय?

शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचा दावा केला जातोय? नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का? मग भाजपनं हिंदुत्व सोडलंय? चंद्राबाबू काय हिंदूत्ववादी आहेत? मग भाजपनं हिंदुत्व सोडलं का? वाजपेयींच्या काळात ममता, समता सोबत होत्या. मग भाजप काय त्यांच्यात विलीन झाला होता? परत तेच सांगतोय. मुल का रडतंय? त्याला ग्राईप वॉटर तरी द्या. थापा मारल्याने पोट फुगलं असेल, हल्लाच त्यांनी चढवला.

Follow Us