Rain | राज्यात पुन्हा पाऊस अन् थंडी, आयएमडीने दिले अपडेट
unseasonal rain | राज्यातील काही भागांत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. हिवाळ्याच्या दिवसात कुडकुडणाऱ्या थंडीऐवजी पडणाऱ्या पावसाने शेतीचे नुकसान होत आहे.

सुनील ढगे, नागपूर, दि. 7 जानेवारी 2024 | राज्यात पुन्हा पावसाचे संकट आहे. पुढील तीन दिवस विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी तुरळक आणि किरकोळ पाऊस पडणार आहे. नागपूर हवामान विभागाने राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तविला आहे. सध्या राज्यात दिवसभर ढगाळ वातावरण आहे. मात्र हवा असल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. हिवाळ्याच्या दिवसांत कुडकुडणाऱ्या थंडी ऐवजी पावसाच्या इशाऱ्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे.
तापमानात वाढ होणार
यंदा थंडी फारशी पडली नाही. आता दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे. थंडी गेली असताना 8 जानेवारीला राज्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता सुद्धा वर्तविण्यात येत आहे. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज असल्याने कापणी केलेले धान तूर तसेच कापूस सुरक्षित ठिकाणी साठवण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
मुंबईत गारवा, तापमान नीचांकावर
मुंबईचा पारा १७ अंशांवर आला आहे. मुंबईत यंदा मोसमातील नीचांक तापमान आहे. तसेच आजपासून दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण राहणार आहे. मुंबईच्या किमान तापमानात घसरण होत आहे. शनिवारी मुंबईचे किमान तापमान १७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. यंदाच्या मोसमातील किमान तापमानाचा हा आतापर्यंतचा नीचांकी आकडा आहे. ७ आणि ८ जानेवारीपासून रात्री आणि पहाटे थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. ७ ते ९ जानेवारी यादरम्यान मुंबई परिसरात काहीसे ढगाळ वातावरण राहील. ९, १० आणि ११ जानेवारी यादरम्यान तापमानात आणखी घसरण होऊन थंडीत वाढच होणार आहे.
परभणीत कमी पावसामुळे ऊस लागवड कमी
परभणीच्या पाथरी तालुक्यात यावर्षी कमी पावसाचा फटका उसाच्या लागवडीवर झालाय. तालुक्यात दरवर्षी 10 हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड होत असताना यंदा मात्र केवळ 6 हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली आहे. उसाची लागवड कमी झाल्याने परिसरातील दोन साखर कारखान्याच्या गाळप कमी होण्याची स्थिती निर्माण झाली.
मनमान, चांदवडमध्ये पाऊस
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाने मनमाड शहर परिसरासह चांदवड आणि ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी रात्री पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात ढगाळ वातावरण होते. मात्र रात्री अचानक पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा फटका द्राक्षे, डाळिंब बागा सोबत कांदा, गहू, हरभरा पिकाला बसणार असल्यामुळे शेतकरी चिंतीत आहे. इचलकरंजी शहरामध्ये अचानक अवकाळी पाऊस झाला.
