Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून पक्षातील या नेत्याच्या मुलाला संधी मिळणार का?
Vidhan Parishad Election : महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शरद पवार पक्षाने उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार असतील, तर आमचा पाठिंबा असेल असं आधीच जाहीर केलं आहे. विधान परिषदेची ही जागा मविआमध्ये ठाकरे गटाकडे जाईल.

येत्या 12 मे रोजी विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. विधान परिषदेवर एक उमेदवार निवडून आणण्यासाठी 28 मतं आवश्यक आहेत. पक्षीय बलाबल लक्षात घेता विधानसभेत भाजपकडे 131 आमदार आहेत. शिवसेनेचे 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 40 आमदार आहेत. आमदारांचं संख्याबळ पाहता भाजपचे 5, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार निवडून येऊ शकतो. विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या 8 उमेदवारांचा विजय निश्चित आहे. महाविकास आघाडी काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे शिवसेना असे तीन पक्षांचे मिळून 46 आमदार आहेत. म्हणजे मविआचा फक्त एक आमदार विधान परिषदेवर जाऊ शकतो.
महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शरद पवार पक्षाने उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार असतील, तर आमचा पाठिंबा असेल असं आधीच जाहीर केलं आहे. विधान परिषदेची ही जागा मविआमध्ये ठाकरे गटाकडे जाईल. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा स्वत: विधान परिषदेवर जाणार की, दुसऱ्या कोणाला संधी देणार हे लवकरच समजेल.
जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेसाठी कोणाच्या नावाची चर्चा?
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातूनही विधान परिषदेवर उमेदवार पाठवले जातात. मागच्या अडीच वर्षांपासून 17 जागा रिक्त होत्या. आता जळगावातून विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या इच्छुकांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. भाजपकडून नंदूकुमार अडवाणी, नंदकिशोर महाजन, अमोल शिंदे यांची नावं चर्चेत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.
भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे दोन्ही पक्ष विधानपरिषदेच्या जागेवर दावा करणार असल्याची सूत्रांची माहिती.दोन्ही पक्षांत एकच उमेदवार देण्यावर एकमत झाले, तर ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जाईल अशी माहिती आहे.भाजप आणि शिवसेना यांच्यात जागा वाटपाचा तिढा न सुटल्यास आणि दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार कायम ठेवल्यास जिल्ह्यात ‘मैत्रीपूर्ण’ पण थेट लढत होण्याची शक्यता आहे.
