विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणबाबत धक्कादायक माहिती, स्वतःच्या बापालाच… क्राइम रेकॉर्ड समोर
Vidyanand Bapat Santosh Chavan : विद्यानंद बापट यांना आज पुण्यात मारहाण झाल्याची घटना घडली होती. संतोष चव्हाण याने बापट यांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. चव्हाण याच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

गणेशोत्सवात लाऊडस्पीकर आणि डीजेच्या वापराला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना आज पुण्यात मारहाण झाल्याची घटना घडली होती. संतोष चव्हाण याने बापट यांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने संतोष चव्हाण याला अखेर अटक केली आहे. आता मारहाण करणाऱ्या संतोष चव्हाणची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे समोर आले आहे.
संतोष चव्हाणने वडिलांना केली होती मारहाण…
राऊतवाडी परिसरात राहणाऱ्या चव्हाणवर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये पाच ते सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी मारामारी आणि कट रचण्यासारख्या गंभीर प्रकरणांमध्ये पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. तो गणेश मंडळाचा कार्यकर्ता असून, सराईत गुन्हेगार म्हणूनही त्याची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, सुमारे तीन वर्षांपूर्वी संतोष चव्हाण याने स्वतःच्या वडिलांनाही मारहाण केली होती. या घटनेनंतर त्याच्या वडिलांनी त्याच्यासोबतचा संपर्क तोडल्याची माहिती आहे.
दरम्यान, आज सकाळी विद्यानंद बापट यांना मारहाण केल्यानंतर संतोष चव्हाण हनुमान नगर परिसरात गेला होता. तेथे त्याने काही मित्रांची भेट घेतली. त्यानंतर त्याने आपला मोबाईल फोन बंद केला. त्यामुळे पोलिसांना त्याचा ठावठिकाणा शोधण्यात अडचणी येत होत्या. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हलवत संतोष चव्हाण याचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
विद्यानंद बापट यांना पोलिस संरक्षण
विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती समोर आल्यानंतर सरकारकडून तातडीने हालचाली करण्यात आल्या आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्त देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या संदर्भात पुणे महापालिकेतील भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी विद्यानंद बापट यांना यापुढे पोलिस संरक्षण देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सरकारने गंभीर दखल घेतली असून, त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
