Weather Forecast : अल निनोचा धोका टळला? पावसाबाबत गुड न्यूज, काय आहे नवा अंदाज?
महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिली होती, परंतु आता गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचे पुन्हा एकदा आगमन झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे.

राज्यात 1 जुलै ते 8 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस झाला. थोड्याच दिवसांमध्ये जास्त पाऊस झाल्याने अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. परंतु त्यानंतर दहा ते बारा दिवस पाऊसच न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र आता गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर यंदा राज्यात पावसाचं प्रमाण कसं राहील, या पुढील काळात किती पाऊस पडले आणि अल निनोचा प्रभाव कितपत पावसावर होईल? या सर्व पार्श्वभूमीवर पर्यावरण आणि हवामान तज्ज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
पावसाचं प्रमाण कसं असणार?
चोपणे यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला, हे जे 2026 वर्षे आहे ते कमी पावसाचं वर्ष आहे. याचं महत्त्वाचे कारण क्लाइमेट चेंज हवामान बदल आहे, तसेच पावसावर अल निनोचा देखील प्रभाव आहे. हिंद महासागर आणि अरबी समुद्राचं देखील तापमान वाढलं आहे. परंतु असं असताना देखील जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात चांगला पाऊस पडला, याच कारण म्हणजे आपल्याकडे बंगालची खाडी आणि अरबी समुद्र अगदी जवळ -जवळ असल्यामुळे या भागात चांगला पाऊस पडतो, अनेकदा अल निनोचा प्रभाव असताना देखील चांगला पाऊस पडलेला आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान जुलैमध्ये महाराष्ट्रातल्या पूर्व मध्य भागामध्ये जवळपास 200 ते 250 मिलिमीटर पाऊस पडला, मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात देखील चांगाला पाऊस झाला. यंदा सतत पाऊस आपल्याकडे राहणार नाही, दर आठवड्यामध्ये आपल्याकडे दोन ते तीन दिवस पाऊस राहणार आहे. या महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता कमी आहे. मात्र ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. याच कारण म्हणजे आपल्याकडे अरबी समुद्र आणि बंगालची खाली जवळ-जवळ आहे. यंदा सरासरीपेक्षा काही प्रमाणात पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे.
