AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बाळासाहेब असतानाच ठाकरे बंधूंनी…’, माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी काय म्हटले?

आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात सुप्रिया सुळे यांनी यायला पाहिजे, अशी आमची पहिल्यापासूनच भावना आहे.

'बाळासाहेब असतानाच ठाकरे बंधूंनी...', माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी काय म्हटले?
राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे
| Updated on: Jun 09, 2025 | 1:09 PM
Share

मनसे नेते राज ठाकरे असो की शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे हे दोघेही राजकारणातल्या बुडत्या नावेत बसलेले आहेत. त्यामुळे दोघेही कोणाच्या नावेत बसले तरी ती नाव बुडणारच आहे. दोघे एकत्र आले तरी त्यांचा राजकीय उद्धार होणारच नाही, अशी प्रतिक्रिया दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली. दोन ठाकरे बंधूंना एकत्र करण्यासाठी शिवसेनेत ज्येष्ठ नेते कोणी शिल्लक राहिले नाहीत. यामुळे त्यांना नातेवाईकांचा आधार घ्यावा लागत आहे, असे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले.

महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी एकत्र येणे हे ठाकरे बांधूनचे ढोंग आहे. दोघांना मराठी माणसांबद्दल काही देणे घेणे नाही. हे दोघे महानगरपालिकेसाठी एकत्र येत असल्याचा आरोप शहाजी बापू पाटील यांनी केला. ते म्हणाले, बाळासाहेब असताना ठाकरे बंधूंनी भांडण करायला नको होते. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांना झालेला आत्मक्लेष आता हे दोघे एकत्र येऊन काही भरून काढणार नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांना घरातल्या भांडणात खूप भोगावे लागले. आता तुम्ही दोघे एकत्र येऊन काही फरक पडणार नाही.

गजानन कीर्तिकरांना दिले उत्तर

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते गजानन कीर्तिकर यांनी राज, उद्धव यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावे, असे वक्तव्य केले होते. त्याचा समाचार घेताना शहाजी बापू म्हणाले, गजानन कीर्तिकर यांचे वय झाले आहे. त्यांना काही गोष्टी लक्षात येत नाहीत. यामुळे ती अशी वक्तव्य करत आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे राम, लक्ष्मण, भरत यांच्याप्रमाणे जोड्या आहेत, असे त्यांनी म्हटले.

सुप्रियांनी मोदींच्या मंत्रिमंडळात यावे

महाराष्ट्राचा बाप हा महाराष्ट्राची जनता आहे, असे म्हणत सगळ्यांचा बाप म्हणून भाजपच्या मुख्यमंत्री बसलाय या नितेश राणेंच्या वक्तव्याला शहाजी बापू यांनी उत्तर दिले. पवार कुटुंबाबद्दल ते म्हणाले, शरद पवार यांचे ज्येष्ठत्व मान्य करून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच एकत्र यायला पाहिजे होते. मोदींच्या मंत्रिमंडळात सुप्रिया सुळे यांनी यायला पाहिजे, अशी आमची पहिल्यापासूनच भावना आहे.