‘शिवाजी कोण होता?’ वादात नवा ट्विस्ट; संजय गायकवाडांच्या घरावर मोर्चा नेताच प्रकाशक म्हणाले…
कॉ. गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता?' पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादावर प्रकाशक प्रशांत आंबी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या शिवीगाळ प्रकरणानंतर हा वाद अधिकच तापला. आंबी यांनी सांगितले की, पुस्तकाचा उद्देश महाराजांचा अनादर करणे नसून, ते संविधानिक मार्गाने आपली बाजू मांडत आहेत. पुस्तकाचे शीर्षक हे आदरभावाने असून, तो एकेरी उल्लेख नाही.

दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकावरून निर्माण झालेला वाद सध्या चर्चेत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून शिवीगाळ केली, त्यानंतर हे प्रकरण आणखीनच तापलं. काल कोल्हापूरमध्ये आंबी व समर्थकांनी घटनेचा निषेध करत आंदोलन केलं, तसेच पुतळा जाळण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी आंदोलकांना रोखत त्यांची धरपकड केली. गेल्या काही दिवसांपासून या पुस्तकावरून सुरू असलेला वाद शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. अशातच आज पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी समोर येत स्वत:ची भूमिका स्पष्ट केली आहे.
तुम्ही सगळे पाहताय 22 तारखेला मला त्यांचा (संजय गायकवाड) कॉल आला, तेव्हाही माझ्या तोंडून एकही असंविधानिक शब्द निघाला नाही. मी कोल्हापूर जिल्ह्यात असणाऱ्या राजेंद्रनगर झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेलो आहे, मला त्यांच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त घाणेरड्या शिव्या येतात. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक पोचवत असताना किंवा चळवळीच काम करत असताना आपण खूप जबाबदारीने वागायला लागतं. त्यामुळे कोणताही चुकीचा शब्द माझ्याकडून गेलेला नाही. तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही जे जे करतोय ते संविधानिक मार्गानेच करतोय. काल आम्ही गृहमंत्र्यांचा जो पुतळा जाळणार होतो, तोसुद्धा अधिकार या देशाच्या घटनेने आम्हाला दिला आहे. आणि आज आम्ही मोर्चा त्यांच्या घरावर काढणार आहोत, तेही संविधानिक पद्धतीनेच करणार आहोत असं प्रशांत आंबी यांनी सांगितलं.
महाराजांचा अनादर करण्याचा हेतू नाही
एकेरी उल्लेखचा प्रश्न म्हणाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आदर आहे तो फक्त एखाद्या शीर्षकावरून किंवा जय शिवाजी जय भवानी म्हटल्यामुळे आपण त्यांचा एकेरी उल्लेख करतो , असा अर्थ होत नाही.‘शिवाजी कोण होता ?’ हे कॉ. गोविंद पानसरेंचं जे पुस्तक आहे, त्याच्या वाचनाची जेव्हा सुरूवात होईल, तेव्हा आत जसा कंटेंट असोल, जसा उच्चार असेल तशाच पद्धतीने वाचन होईल. कारण शिवाजी महाराजांचा अनादर करणे हा या पुस्तकाचा उद्देश नाही तर जसं आपण आईला ए आई म्हणतो, म्हणजे एकेरी हाक नसते. किंवा जय भवानी जय शिवाजी ही घोषणा देतो, तेव्हा एकेरी हाक मारत नाही, अरे देवा म्हणतो, म्हणजे देवाला काही आपल्याला एकेरी हाक मारायची नसते. त्याप्रमाणे, त्या आी याच भावनेतूनच हे पुस्तक लिहीलं आहे, त्यामुळे महाराजांचा अनादर करण्याचा कोणताही हेतून ना लेखकांचा होता ना प्रकाशक म्हणून माझा आहे, असं प्रशांत आंबी म्हणाले.
