मोठी बातमी! भाच्यावर हल्ला होताच ममता बॅनर्जी संतापल्या, म्हणाल्या ‘शासक बनले मारेकरी…’
बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या भाच्यावर हल्ला करण्यात आला आहे. सोनारपूर येथे एका कार्यकर्त्याच्या घरी जात असताना हा हल्ला झाला आहे. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पोस्ट लिहित भाजपवर टीका केली आहे.

तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झालाल आहे. पक्षाच्या एका हत्या झालेल्या कार्यकर्त्याच्या घरी जात असताना अभिषेक बॅनर्जी यांना विरोधाचा सामना करावा लागला. भर रस्त्यात त्यांचे कपडे फाडले, त्यांच्या अंगावर अंडी फेकत हल्ला झाल्याचाही आरोप आहे. या हल्लाचा बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल प्रमुख ममता बॅनर्जी यांनी तीव्र निषेध केला आहे.
सोनारपूर येथील या घटनेवर ममता बॅनर्जी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ‘X’ हँडलवर लिहिताना त्या म्हणाल्या की सत्तेत बसलेले लोकच आता मारेकरी बनले आहेत. भाजपला याची लाज वाटायला हवी. दुसरीकडे, राष्ट्रीय पातळीवरील विरोधी गट ‘इंडिया’ आघाडीच्या मित्रपक्षांनीही या संपूर्ण घटनाक्रमावर आवाज उठवला आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या ‘X’ हँडलवरून भाजपचा तीव्र निषेध केला.
RULERS BECAME KILLERS- shame on you BJP https://t.co/DHNsnDAc9a
— Mamata Banerjee (@MamataOfficial) May 30, 2026
भाजपने टीएमसीचे आरोप फेटाळले
मात्र, या घटनेवर भाजपचे म्हणणे आहे की सोनारपूरच्या घटनेशी त्यांचा काहीही संबंध नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य म्हणाले की, या घटनेत भाजपचा कोणताही सहभाग नाही. गेल्या पाच वर्षांत दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात तृणमूलने ज्या प्रकारचे अत्याचार केले आहेत, ते पाहता जर भाजपने ठरवले असते तर तृणमूलचे नेते आज घराबाहेर पाऊलही टाकू शकले नसते. भाजपने जो संयम बाळगला आहे, त्याचाच हा परिणाम आहे की तृणमूलचे नेते आज अशा प्रकारे फिरू शकत आहेत.
टीएमसीकडून हल्ल्याचा निषेध
तृणमूल काँग्रेसने सोशल मीडियावर निवेदन जारी करत अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. त्यांच्या ‘X’ वरील पोस्टमध्ये लिहिले होते की, एका क्रूर हल्ल्याचा सामना केल्यानंतरही अभिषेक बॅनर्जी यांनी संजू कर्मकार यांच्या शोककुल कुटुंबाची साथ सोडली नाही. आमच्या अखिल भारतीय सरचिटणीसांनी भाजप पुरस्कृत गुंडांसमोर गुडघे टेकले नाहीत. त्याऐवजी ते भाजप समर्थित या गुंडांचे शिकार झालेल्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. सहानुभूतीचे राजकारण आणि द्वेषाचे राजकारण यातील हाच मूलभूत फरक आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांना उद्देशून या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, आजच्या घटनेने पुन्हा एकदा तुमच्या राजकारणाचा खरा चेहरा उघड केला आहे. तुमचे राजकारण धमकावणे, हिंसाचार आणि सुडाच्या भावनेवर आधारित आहे.
अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपला धरले जबाबदार
या घटनेनंतर अभिषेक बॅनर्जी यांनी आरोप केला की हा हल्ला भाजप समर्थित गुंडांनीच घडवून आणला आहे. ते म्हणाले की, आपण पक्षाचे कार्यकर्ते संजू कर्मकार यांना भेटायला गेलो होतो, जे कथितरित्या निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराचे बळी ठरले होते. त्यांनी असा दावाही केला की हल्ल्याच्या वेळी तिथे पोलीस उपस्थित नव्हते. टीएमसी खासदाराने म्हटले आहे की, ते या प्रकरणाबाबत कलकत्ता उच्च न्यायालयात दाद मागतील आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल आर.एन. रवी यांनाही या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती देतील.
