“शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक हत्या अन् बलात्कार…” कंगना रणौतचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, नव्या वादाला फुटणार तोंड
पुन्हा एकदा कंगना रणौतने शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक हत्या अन् बलात्कार झाल्याचा आरोप कंगनाने केला आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Kangana Ranaut Controversial Statement : बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत या कायमच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी कंगना रणौत यांनी शेतकरी आंदोलनावर एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी तिने शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटले होते. त्यानतंर आता पुन्हा एकदा कंगना रणौतने शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक हत्या अन् बलात्कार झाल्याचा आरोप कंगनाने केला आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
कंगना रणौत काय म्हणाली?
कंगना रणौतने नुकतंच दैनिक भास्कर या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत कंगनाने शेतकरी आंदोलनाबाबत एक वादग्रस्त विधान केलं. “शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या. बरं झालं केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. अन्यथा तिथे मोठं षडयंत्र रचलं जात होतं. ते लोक काहीही करू शकले असते. शेतकरी आंदोलनावेळी देशाचे नेतृत्व मजबूत नसतं, तर या लोकांनी पंजाबमध्ये बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण केली असती. त्यासाठी मोठी योजना तयार होती, असे कंगना रणौत म्हणाल्या.
शेतकरी आंदोलनाच्या नावावर जे काही सुरु होतं, ते सर्वांनी बघितलं आहे. निषेध करण्याच्या नावाखाली हिंसाचार पसरवला गेला, आंदोलनादरम्यान अनेक माणसे मारली गेली, मृतदेहांना लटकवले गेले, अत्याचार झाले. पण केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आंदोलकांना धक्का बसला. कारण त्यांची खूप मोठी प्लॅनिंग होती. त्यांच्यावर सरकारने वेळीच नियंत्रण मिळवले, अन्यथा ते काहीही करू शकले असते, असे कंगना रणौतने म्हटले.
अखिल भारतीय किसान सभा नोंदवणार निषेध
आता कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कंगनाच्या विधानावर काँग्रेससह विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जात आहे. अखिल भारतीय किसान सभेकडून कंगना रणौतने केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात येणार आहे. “संयुक्त किसान मोर्चाच्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या 600 पेक्षा जास्त शेतकरी शहिदांचा, आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी माता भगिनींचा व शेतकऱ्यांचा हा घोर अपमान आहे. या आधीही कंगना यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल अशीच बेताल वक्तव्य केली आहेत. स्वातंत्र्य संग्रामाबद्दलही त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे अखिल भारतीय किसान सभेकडून याचा तीव्र निषेध नोंदवला जाणार आहे”, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले यांनी दिली.
“देशातील स्वातंत्र्य युद्ध आणि या देशात सुरू असलेले शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचे सुनियोजित षडयंत्र आहे. या षडयंत्रामागे असणाऱ्या शक्तींचा देशभरातील शेतकरी, शेतकऱ्यांची पोरं आणि या देशावर प्रेम करणारे नागरिक तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहेत”, असेही अजित नवले म्हणाले.
