Air India Crash : अहमदाबाद दुर्घटनेतील विमानाच्या इंजिनबाबत एअर इंडियाचा मोठा खुलासा
अहमदाबादमधील विमान दुर्घटनेप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यात चूक कोणाची होती, विमानाचं इंजिन बिघडलं होतं का, त्याची देखभाल केली नव्हती का, पायलटची चूक होती का, अशा प्रश्नांवर आता एअर इंडियाने आपली बाजू मांडली आहे.

12 जून 2025 रोजी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण केलेलं बोइंग 787-8 विमान अवघ्या काही क्षणांतच खाली कोसळलं. जवळपास चार दशकांमधील ही भारतीय विमान कंपनीशी संबंधित सर्वांत मोठी दुर्घटना होती. यामध्ये 240 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. हे विमान ज्या मेडिकल कॉलेज हॉस्टेलवर कोसळलं होतं, तिथेही अनेकांनी आपले प्राण गमावले. विमानाच्या इंजिनची वेळोवेळी देखभाल केली नव्हती का, यात पायलटची काही चूक होती का, एअर इंडिया कंपनीचा निष्काळजीपणा होता का.. असे अनेक प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित केले जात आहेत. या घटनेच्या जवळपास सात दिवसांनंतर एअर इंडियाकडून त्यांची बाजू स्पष्ट करण्यात आली आहे. “विमान सुस्थितीत होतं आणि पायलटसुद्धा अत्यंत अनुभवी होते. आम्ही या प्रकरणाची चौकशी पूर्ण होण्याची प्रतीक्षा करत आहोत. या अपघाताचं कारण काय असू शकतं याबद्दल कोणत्याही निष्कर्षावर न पोहोचणं चांगलं”, अशी प्रतिक्रिया ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी दिली. ...
