जंतर-मंतरने बना दी जोडी! आंदोलनाला गेले अन् लग्न करून आले.. ‘नीट’वाली लव्हस्टोरी
दिल्लीतल्या जंतर-मंतर याठिकाणी आंदोलनात एखादी लव्ह-स्टोरी सुरू होईल, याची कोणी कल्पनाही केली नसेल. परंतु बिहारच्या मोहन श्रीवास्तवला याच आंदोलनात त्याचं प्रेम आणि आयुष्याची जोडीदार मिळाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतल्या जंतर-मंतर याठिकाणी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात एखाद्याची लव्ह-स्टोरी सुरू होईल, याची कोणी कल्पनाही केली नसेल. पण प्रत्यक्षात असं घडलंय. नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करायला गेलेल्या बिहारच्या मुलाने दिल्लीच्या मुलीशी चक्क लग्न केलं आहे. या दोघांच्या प्रेमकहाणीत जंतर-मंतरवरील आंदोलनाचा खूप मोठा वाटा आहे. कारण याच आंदोलनात दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. सोशल मीडियावर सध्या या जोडप्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या दोघांची कहाणी कोणत्याही ‘फिल्मी स्टोरी’पेक्षा कमी नाही.
बिहारचा मोहन श्रीवास्तव गेल्या पंधरा दिवसांपासून जंतर-मंतर याठिकाणी आंदोलन करत होता. आंदोलनाच्या ठिकाणी खाण्यापिण्याची कोणतीच सोय नसताना दिल्लीतली एक तरुणी त्याच्यासाठी सतत काही ना काही खायला आणत होती. कधी लौंगलता, कधी सिंघाडा.. असं दररोज काही ना काही ती खायला आणायची आणि मलाच द्यायची, असं मोहनने सांगितलं. एकेदिवशी मोहन तिला म्हणाला, “फक्त खायलाच देशील का, पाणी कोण देणार?” तेव्हा ती तरुणी हसली आणि दुसऱ्याच दिवशी पाण्याची मोठी बाटली मोहनसाठी घेऊन आली. तेव्हा दोघांमध्ये जंतर-मंतर याठिकाणीच काही गप्पागोष्टी झाल्या. विशेष म्हणजे त्या तरुणीनेही ‘नीट’ची परीक्षा दिली होती. म्हणूनच ती आंदोलनात सहभागी होण्यासाठी तिथे गेली होती.
पहा व्हिडीओ-
This could be a prank from Bihar. But it ends so authentically with a question, that is so steeped in reality. pic.twitter.com/t1EBCziYhy
— Smita Prakash (@smitaprakash) July 26, 2026
या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला होता. यात मोहनच्या डोक्याला जबर मार लागला आणि तो बेशुद्ध पडला. तेव्हा त्या तरुणीने त्याला रुग्णालयात दाखल करून त्याची देखभाल केली. जेव्हा मोहन शुद्धीवर आला, तेव्हा भावूक झालेल्या तरुणीने तिच्या भावना व्यक्त केल्या. “मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही”, अशा शब्दांत तिने प्रेमाची कबुली दिली. तेव्हा मोहननेही त्याचं प्रेम जाहीरपणे बोलून दाखवलं. त्यानंतर दोघांनी थेट मंदिरात जाऊन लग्नगाठ बांधली. परंतु आता आई या लग्नाचा स्वीकार करत नसल्याची तक्रार मोहनने पत्रकाराशी बोलताना केली.
तुम्ही जंतर-मंतरवर आंदोलन करायला गेलेलात की लग्न करायला, असा सवाल विचारला असता तरुणी म्हणाली, “प्रेम काही बोलून होत नाही. ते कुठेही कसंही होऊ शकतं.” नीट पेपरफुटीप्रकरणी देशभरात आंदोलन पेटलं असताना त्यात अशी एखादी प्रेमकहाणी फुलणं, हे जेन-झींच्याच जमान्यात होऊ शकतं, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.
