जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?
दिल्लीच्या जंतरमंतरवरील सीजेपी आंदोलनाला हिंसक वळण लागून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्याने जागतिक मीडियात खळबळ उडाली आहे. ब्लूमबर्ग, न्यूयॉर्क टाइम्स, फायनान्शियल टाइम्स आणि गार्डियनने या घटनेचे सविस्तर वृत्त दिले आहे.

दिल्लीच्या जंतरमंतरवर गेल्या महिनाभरापासून कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. गेल्या दोन दिवसापासून या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीमार करण्यात आला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या या लाठीमाराचे देशभर पडसाद उमटले आहेत. केवळ देशातच नाही तर जगभरातील मीडियातही त्याचे पडसाद उमटले आहेत. विद्यार्थ्यांचं रक्त सांडलं, पण त्यांनी मैदान सोडलं नाही, असं जगभरातील मीडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
अमेरिकेन मीडिया आउटलेट ब्लूमबर्गनेही सीजेपीच्या आंदोलनाचं वृत्त दिलं आहे. या आंदोलनाचे प्रमुख नेते सोनम वांगचुक यांना बळाचा वापर करून हटवण्यात आल्याने लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. सोमवारी दुपारपर्यंत संसदेपर्यंत जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर आंदोलकांची मोठी गर्दी जमली होती. या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार करण्यात आला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. दुपारी सीजेपीच्या शिष्टमंडळाने सरकारशी चर्चा केली. त्यांनी सरकारकडे मागण्या दिल्या. पण अद्यापही आंदोलन सुरूच आहे, असं ब्लूमबर्गने म्हटलं आहे.
सार्वजनिकरित्या भयाचं वातावरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात सर्वात जुन्या लोकशाही व्यवस्थेत आंदोलन करणं, विरोध करणं हे मर्यादित झालं आहे. सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्यांना तुरुंगात डांबलं जाण्याचा मोदी सरकारवर आरोप होत आलेला आहे. त्यामुळे सार्वजनिकरित्या भयाचं वातावरण निर्माण झालं आहे, असं न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलं आहे.
पण विद्यार्थी आंदोलनातून हटले नाही…
सध्याच्या आंदोलनाची सुरुवात सीजेपीने केली आहे. केवळ दोन महिन्यातच सीजेपी तरुणांची आवाज बनली आहे. भारताच्या सरन्यायाधीशांच्या एका विधानामुळे हा पक्ष जन्माला आला आहे, असंही न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलं आहे. तसेच रक्त सांडलं, पण विद्यार्थी आंदोलनातून मागे हटले नाहीत, असंही या वृत्तात म्हटलं आहे.
जागे व्हा, आमचं म्हणणं ऐका…
फायनान्शियल टाइम्सनेही सीजेपी आंदोलनावर लिहिलं आहे. सीजेपीच्या आवाहनानंतर मोठ्या संख्येने आंदोलकर सोमवारी सकाळी पायी चालत संसदेच्या दिशेने आले. त्यांच्या हातात झेंडे आणि फलक होते. जागे व्हा, आमचं म्हणणं ऐका… असं या फलकावर लिहिलं होतं. दुपारी तणाव वाढला. सुरक्षा दलाने संसदेच्या मार्गाने जाणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, असं फायनान्शियल टाइम्सने म्हटलं आहे.
नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेत…
गार्डियननेही भारतात झालेल्या या आंदोलनाची दखल घेतली आहे. नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकासारख्या शेजारच्या देशातील तरुणांनी तिथल्या सरकारांना सत्तेतून बाहेर फेकलं आहे. पण भारतात झालेलं हे आंदोलन गेल्या काही वर्षात दुर्लभच झालेलं आहे. मोदी सरकारने गेल्या 12 वर्षात केंद्र आणि राज्य स्तरावर प्रचंड शक्ती मिळवली आहे. टीकाकार आणि विरोधकांवर कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकण्याचा सरकारवर आरोपही लागला आहे, असं गार्डियनने म्हटलं आहे.