ऑपरेशन सिंदूर फक्त दिखावा, कुठे मारले गेले दहशतवादी?; काँग्रेस आमदाराने सरकारकडे मागितले पुरावे

आम्ही नागरिकांविरुद्धच्या युद्धाच्या विरोधात आहोत. मग ते कर्नाटक असो, पाकिस्तान असो, चीन असो किंवा बांगलादेश असो. ही कृती पहलगाम हल्ल्यातील पीडितांचं दु:ख मिटवू शकत नाही. हा उपायच नाही, असं मंजुनाथ म्हणाले.

ऑपरेशन सिंदूर फक्त दिखावा, कुठे मारले गेले दहशतवादी?; काँग्रेस आमदाराने सरकारकडे मागितले पुरावे
congress mla kothur manjunath
Image Credit source: ANI
| Updated on: May 16, 2025 | 9:48 AM

पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले. याचे पुरावे भारतीय सैन्य दलांनी तर दिलेच, शिवाय सोशल मीडियावरही ‘ऑपरेशन सिंदूर’चे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. असं असूनही आता कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार कोथुर मंजुनाथ यांनी या कारवाईवरच शंका व्यक्त केली आहे. “हा फक्त कारवाईचा ढोंग होता. त्यामुळे पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळाला नाही. त्यांना जो दिलासा मिळायला हवा होता, तो मिळाला नाही”, अशी टीका त्यांनी केली आहे.

मंजुनाथ याविषयी पुढे म्हणाले, “काहीही झालं नाही. फक्त दिखाव्यासाठी वरून तीन-चार विमानं पाठवून परत बोलावण्यात आली. याने पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या 26-28 लोकांना न्याय मिळेल का? अशा प्रकारे त्या महिलांचं दु:ख कमी होईल का? त्यांचा आदर करण्याचा हाच मार्ग आहे का?” 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूरनंतर भारत सरकारने दावा केला होता की पाकिस्तानमध्ये नऊ मोठे दहशतवादी लाँचपॅड नष्ट करण्यात आले आणि त्यात सुमारे 100 दहशतवादी मारले गेले. इतकंच नव्हे तर 22 एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना ठार मारल्याच्या बातमीवरही मंजुनाथ यांनी शंका व्यक्त केली. “100 दहशतवादी मारले गेले हे निश्चितपणे माहीत आहे का? त्यांची ओळख पटली का? 22 एप्रिल रोजी बैसरन खोऱ्यात हल्ला करणारे तेच दहशतवादी होते का”, असे प्रश्न त्यांनी विचारले.

“100 दहशतवादी मारले गेले हे निश्चित आहे का? आपल्या सीमेत घुसलेले हे दहशतवादी कोण होते? त्यांची ओळख काय आहे? सीमेवर सुरक्षा का नव्हती? ते कसे पळू गेले? आपण दहशतवादाची पाळंमुळे शोधून त्यांचा नायनाट केला पाहिजे. हे संपूर्णपणे गुप्तचर यंत्रणेचं अपयश आहे”, अशीही टीका मंजुनाथ यांनी केली. यावेळी त्यांनी माध्यमांवरही प्रश्न उपस्थित केले. “सर्व न्यूज टीव्ही चॅनेल वेगवेगळ्या कथा सांगत आहे. एक म्हणतंय इथे मारलं, एक म्हणतंय तिथे मारलं. प्रत्यक्षात कोण मारले गेले, कुठे मारले गेले आणि किती मारले गेले हे कोणीही सांगत नाही. सरकारकडून कोणतंही स्पष्ट विधान समोर आलं नाही”, असं म्हणत त्यांनी ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न उपस्थित केले.